Modi Cabinet 3.0: रक्षा खडसेंचा मंत्रिमंडळातील प्रवेश म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या कपटी राजकारणाला दिल्लीची चपराक; 'सामना'च्या अग्रलेखातून टीका
PM Modi cabinet: पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकारचा शपथविधी रविवार पार पडला. यामध्ये रक्षा खडसे यांना अनपेक्षितपणे मंत्रिपदाची संधी देण्यात आली. यासाठी विनोद तावडे यांनी श्रम घेतल्याचा दावा 'सामना'तून करण्यात आला आहे.
![Modi Cabinet 3.0: रक्षा खडसेंचा मंत्रिमंडळातील प्रवेश म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या कपटी राजकारणाला दिल्लीची चपराक; 'सामना'च्या अग्रलेखातून टीका BJP leadership slams Devendra Fadnavis Politics by giving chance to Raksha Khadse in Narendra Modi NDA cabinet 3.0 Modi Cabinet 3.0: रक्षा खडसेंचा मंत्रिमंडळातील प्रवेश म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या कपटी राजकारणाला दिल्लीची चपराक; 'सामना'च्या अग्रलेखातून टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/10/b99773ed2531ebd2fbcfe38a72e1410a1717985979501954_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: नरेंद्र मोदी यांनी रविवारी संध्याकाळी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदी पुन्हा पंतप्रधान झाले व त्यांच्यासोबत भाजप आणि घटक पक्षांतील काही सदस्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामध्ये महाराष्ट्रातून रक्षा खडसे (Raksha Khadse), मुरलीधर मोहोळ यांना संधी मिळाली. खडसे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेश हा महाराष्ट्रातील फडणवीस (Devendra Fadnavis) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या कपटी राजकारणाला दिल्लीने लगावलेली चपराक आहे. त्यासाठी विनोद तावडे यांनी विशेष श्रम घेतल्याचे दिसत आहे, असे भाष्य ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात आम्ही ठरवू तेच मंत्री होतील, असे देवेंद्र फडणवीस वगैरे लोकांना वाटत होते. यावेळी ते घडले नाही. नारायण राणे, भागवत कऱ्हाड यांना मंत्रिमंडळातून नारळ देण्यात आला आहे, अशी टिप्पणी सामनातून करण्यात आली आहे.
चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांना मोदी-शाहांची भीती; 'सामना'तून जोरदार टीका
केंद्रीय मंत्रिमंडळात तेलुगू देसम आणि जनता दल युनायटेडचे मंत्री समाविष्ट केले आहेत. पण तेलुगू देसम दोन मुख्य मागण्या आहेत. एक म्हणजे अमित शाह यांच्याकडे गृहमंत्रीपद असता कामा नये व लोकसभेचे स्पीकरपद तेलुगू देसमकडे असावे. या दोन्ही मागण्या म्हणजे मोदी सरकारचे कान आणि नाक कापण्यासारख्या आहेत. तेलुगू देसमला अशी भीती वाटणे स्वाभाविक आहे. कारण सरकार स्थिरस्थावर झाल्यावर अमित शाह हे त्यांचा जुनाच खेळ सुरु करतील व संसदेतला तेलुगू देसम पक्ष फोडतील. नितीश कुमार यांनाही तेच भय आहे. त्यामुळे लोकसभेच्या 'स्पीकर'पदी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा नेता असावा, अशी मागणी जोर धरत आहे. याचा अर्थ नवे सरकार हे अविश्वासाच्या पायावर बनत आहे. मोदी हे रालोआच्या नेत्यांना मिठ्या मारण्याचे नाटक करीत असले तरी त्यामागे त्यांचा स्वार्थ आहे. हे लोक विश्वास ठेवण्यासारखे नाहीत असेच नितीश व चंद्राबाबूंना वाटत आहे आणि हेच सरकारच्या अस्थिरतेवर शिक्कामोर्तब आहे, असा अंदाज 'सामना'तून व्यक्त करण्यात आला आहे.
मोदी नकरात्मक व्यक्ती, त्यांनी देशात नकारात्मक ऊर्जा निर्माण केली: सामना
बहुमत गमावलेल्या मोदी यांनी शपथ सोहळय़ाचा थाट मोठाच केला. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात त्यांनी शपथ घेतली. जणू काही 'चारशेपार'चा नारा खरा करून ते शपथ घेत आहेत, असाच सगळा मामला होता. प्रत्यक्षात त्यांनी पराभूत मनाने शपथ घेतली हेच सत्य आहे. देशभरातून भाजपच्या कार्यकर्त्यांना गर्दी करण्यासाठी दिल्लीत बोलावले व माहौल निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मोदी यांच्या समोर संसदेत या वेळी एक मजबूत विरोधी पक्ष आहे. मोदी यांच्या शपथ सोहळय़ावर 'इंडिया' आघाडीने बहिष्कार टाकला व त्याबद्दल मोदींचे चमचे विरोधकांना लोकशाहीत संसद, परंपरा यांचे ज्ञान देत आहेत. यापैकी कोणत्या परंपरा मोदी यांनी पाळल्या ते आधी सांगा. मोदी पंतप्रधान असताना विरोधी पक्षांचे दीडशे खासदार निलंबित करून रिकाम्या बाकांसमोर भाषणे ठोकण्याचा पराक्रम मोदी यांनी केला. संसदीय लोकशाहीचे कोणते संकेत मोदी किंवा त्यांच्या लोकांनी पाळले? मोदी यांची 'रालोआ'च्या नेतेपदी निवड झाल्यावर त्यांनी जुन्या संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात केलेल्या भाषणाने सगळयांचीच निराशा झाली. पहिल्याच भाषणात मोदी यांनी काँगेस व इंडिया आघाडीस टीकेचे लक्ष्य केले. याची गरज नव्हती. जो माणूस स्वतः निवडणूक हरला आहे. वाराणसी मतदारसंघात कसाबसा विजय मिळाला. बहुमत गमावले तरी स्वतःचे झाकून दुसऱ्यांचे वाकून पाहण्याची त्यांची खोड काही जात नाही. मोदी हे देशाला दिशादर्शक असे काही बोलतील ही अपेक्षा फोल ठरली. मोदी हे एक नकारात्मक विचारांचे व्यक्तिमत्त्व असून दिवसरात्र ते त्याच नकारात्मक विचारांच्या गुंत्यात वावरत असतात. त्यांच्या वाणीत व विचारात विष आहे आणि त्यामुळे देशात दहा वर्षापासून नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली हे मान्य करावेच लागेल, असे 'सामना'त म्हटले आहे.
मोदी-शाहांना इतरांचे चांगले झालेले बघवत नाही: सामना
मोदी व शहा यांना दुसऱ्याचे बरे झालेले पाहवत नाही. अशा नकारात्मक विचारांच्या व्यक्ती देश व समाजाचे कधीच कल्याण करू शकणार नाहीत. या नकारात्मक ऊर्जेचा प्रकोप गेल्या दहा वर्षापासून देश भोगत आहे. नकारात्मक ऊर्जा ही देशात अस्वस्थता, भय, वाद, भांडणे घडवून आणते. नकारात्मक ऊर्जा लोकांची विचार करण्याची शक्ती मारते. त्यांना मूकबधिर बनवते. लोकांना उदास, आळशी व कडू बनवते. मोदी यांनी देशात नकारात्मक ऊर्जा निर्माण केली. कारण ते स्वतः त्याच विचारांचे आहेत. मोदी-शहा यांनी सत्तेचा वापर देशातील आनंद, उत्साह, विकास मारण्यासाठी केला. लोकांना मूर्ख, अंधभक्त बनवून राज्य करणे व त्यासाठी टाळया-थाळया वाजवणे हे नकारात्मकतेचे लक्षण आहे. कर भला तो हो भला, ही मोदींची वृत्ती नाही. म्हणूनच नितीश कुमार व चंद्राबाबू हे मोदींच्या सहवासात आले तरी त्यांना मोदींचे भय वाटत आहे. कामाख्या देवीस रेडयाचा बळी दिला जातो तसा आपला बळी जाईल कार या भयाने सगळेच पछाडले आहेत. कारण देशात नकारात्मक ऊर्जेचे तिसरे पर्व सुरू झाले. ग्रहण लागल्यावर जी उदासीनता येते तसेच वातावरण आहे, थोडे थांबायला हवे, असे 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)