![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Eknath Shinde: आम्ही मोदींना सांगितलं '400 पार'च्या घोषणेमुळे कार्यकर्ते रिलॅक्स झाले; आता विधानसभेला गाफील राहू नका: एकनाथ शिंदे
Maharashtra Politics: ४०० पारमुळे कार्यकर्ते गाफील हे मी मोदींनाही म्हणालो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. उबाठापेक्षा आपला स्ट्राईक रेट चांगला. महाविकास आघाडीला फेक नरेटिव्हमुळे यश मिळाले, असे शिंदे यांनी म्हटले.
![Eknath Shinde: आम्ही मोदींना सांगितलं '400 पार'च्या घोषणेमुळे कार्यकर्ते रिलॅक्स झाले; आता विधानसभेला गाफील राहू नका: एकनाथ शिंदे bjp 400 paar slogan party workers get relax causes setback for Mahayuti in Lok Sabha Election Maharashtra Eknath Shinde: आम्ही मोदींना सांगितलं '400 पार'च्या घोषणेमुळे कार्यकर्ते रिलॅक्स झाले; आता विधानसभेला गाफील राहू नका: एकनाथ शिंदे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/15614d1893ba3e6781fd9df144055d2a1718589228239954_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 'चारसो पार'च्या नाऱ्यामुळे लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याची स्पष्ट कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. तुम्ही गाफील राहू नका. आपण सर्व कार्यकर्ते आहात, एक-एक मत आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत माझ्या एका मताने काय होणार, आपण जिंकणारच आहोत, असा विचार करुन गाफील राहता कामा नये. आम्ही पंतप्रधान मोदीजींसोबत (PM Modi) 400 पारच्या घोषणेबाबत बोललो. या घोषणेमुळे कार्यकर्ते रिलॅक्स झाले, असे मी त्यांना सांगितले. पण आता तसं करायचं नाही. आपले मोदीजी पंतप्रधानपदी बसलेले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोणी कितीही जंग जंग पछाडले तरी मोदीजी त्यांच्यावर भारी पडतील, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. ते रविवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या विजयसंकल्प मेळाव्यात बोलत होते.
नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या त्यात आपण जिंकलो आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे यांना चिंता नाही, विजय आपलाच आहे. महायुती म्हणून आपण ही निवडणूक मनावर घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला ठरलेला आहे, भिवंडी अपवाद ठरला. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी फेक नरेटिव्ह लोकांपर्यंत पोहोचवले, त्यामध्ये ते यशस्वी ठरले. फेक नरेटिव्ह पसरवण्यात काही स्वयंसेवी संस्थांचाही (NGO) हात होता. सगळ्याच स्वयंसेवी संस्था वाईट नाहीत. पण काही स्वयंसेवी संस्थांमध्ये शहरी नक्षली घुसले आहेत. हे सर्वजण मोदी द्वेषाने पछाडलेले आहेत. या एनजीओंनी देखील मोदी हटावचा नारा दिला होता, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
महाविकास आघाडीने जास्त जागा जिंकल्या असल्या तरी मतांची टक्केवारीतील फरक फार कमी आहे. आज मुंबईतही आपल्याला त्यांच्यापेक्षा 2 लाख मतं जास्त आहेत. आज आपला स्ट्राईक रेट उबाठा पेक्षा जास्त आहे. राज्यातील मतांच्या टक्केवारीत आपण थोड्या फरकानेच मागे आहोत. लोकसभा निवडणुकीत 30 जागांवर विजय मिळाल्यानंतर आम्ही 180 जागा जिंकणार, असे मविआ म्हणत आहे. असे गणित कुठे असते का, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला.
कोकणात साडेसहा पैकी साडेपाच जागा महायुतीने जिंकल्या: देवेंद्र फडणवीस
लोकसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळाल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. आम्ही महायुतीला तडीपार करू, पण जनतेनं त्यांनाच कोकणातून तडीपार केले. कोकणातील साडेसहा जागांपैकी साडेपाच जागा आपण जिंकल्या. साडेसहा यासाठी मावळची थोडी जागा कोकणात येते म्हणून, महायुतीच्या 5.5 जागा निवडून आल्या. केवळ भिवंडीची जागा निवडून येऊ शकली नाही, तिकडे काय घडले ते सर्वांनाच माहीत आहे. जे मुंब्र्यात घडले तेच भिवंडीत घडले, असो ते आपण सुधारु, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
आणखी वाचा
राज्यासाठी एकनाथ शिंदे प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री, पण आमच्यासाठी फडणवीसच 'लीडर' : गणेश नाईक
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)