Balasaheb Thorat on Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात माजी मंत्र्यांचं मोठं वक्तव्य; बाळासाहेब थोरात स्पष्टच बोलले, 10 वर्षाचं सगळंच काढलं
Balasaheb Thorat on Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची नव्यानं चौकशी करण्याची मागणी तिच्या आई-वडिलांनी केलीय. यावरून बाळासाहेब थोरातांनी मोठं वक्तव्य केलंय.

Balasaheb Thorat on Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची (Disha Salian Death Case) नव्यानं चौकशी करण्याची मागणी तिच्या आई-वडिलांनी केलीय. दिशाचा सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे. दिशा सालियनच्या मृत्यूची स्वतंत्र, निष्पक्ष, पारदर्शक चौकशी करा अशी मागणी दिशाचे वडील सतीश सालियन यांनी याचिकेद्वारे केली आहे. दिशावर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचा आरोप करतानाच या प्रकरणात आदित्य ठाकरेंची (Aaditya Thackeray) चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. आदित्य ठाकरे, दिनो मोरिया, सूरज पांचोली, एकता कपूर, सचिन वाझे, रिया चक्रवर्ती, इम्तियाज खत्री, शोविक चक्रवर्ती, आदित्यचे सुरक्षा रक्षक हिमांशू शिक्रे या सर्वांचे 3 ते 20 ऑगस्ट 2020 चे कॉल रेकॉर्ड चेक करा, टॉवर लोकेशनही तपासून घ्यावे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. आता यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले बाळासाहेब थोरात?
संगमनेर तालुक्याची कामधेनू समजल्या जाणाऱ्या भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा 58 वा गळीत हंगामाची सांगता आज करण्यात आली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यानंतर बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. दिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेबाबत विचारले असता बाळासाहेब थोरात म्हणाले की, 2014 पासून देशात आरोपांचं, दबावाचं राजकारण सुरू आहे. या सगळ्या गोष्टीमागे राजकारण असण्याची शक्यता आहे. हा दबावतंत्राचा एक भाग असू शकतो, हे मला माझ्या अनुभवावरून वाटते, असे त्यांनी म्हटले.
हे सरकारच अपयशी
नागपूरात औरंगजेबच्या कबरी प्रकरणात विश्व हिंदू परिषदेने काढलेल्या मोर्चानंतर सोमवारी सायंकाळी दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली. या घटनेत दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक झाल्याने या जमावाला आवरताना पोलीस आणि नागरिक ही जखमी झाले आहेत. याबाबत विचारले असता बाळासाहेब थोरात म्हणाले की, एकीकडे प्रत्येक देश विकासासाठी धडपड करतोय. आम्ही मात्र इतिहासात जाऊन जुन्या कबरी उचकत आहोत. जातीभेद, धर्मभेद आपल्याला मागे घेऊन जात आहेत. हे पूर्ण सरकारच अपयशी आहे. परभणी, बीड व आता नागपूरमध्ये देखील अशा घटना घडत आहे, अशी टीका त्यांनी यावेळी राज्य सरकारवर केली आहे.
बाळासाहेब थोरातांची पत्नीच्या जन्मदिनी मिश्कील टिप्पणी
दरम्यान, बाळासाहेब थोरात यांच्या पत्नी कांचन थोरात यांचा वाढदिवस असल्याने सांगता सभेच्या मंचावरच त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यानंतर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी मिश्किल टिपण्णी केल्याने सभेत मोठा हास्यकल्लोळ झाला. आज प्रथमच कांचनचा वाढदिवस मोठा साजरा झाला. कांचन नशीबवान आहे. मात्र मी तिच्या पेक्षा जास्त नशीबवान आहे. तुमची परिस्थिती मला माहित नाही. मात्र, मला कधीही त्रास नाही. घरातलं सगळं ती सांभाळते, कितीही काहीही असो पण घरात चुकून कटकट नाही. याला देखील नशीब लागतं. तुम्ही टाळ्या वाजवता याचा अर्थ मला कळतोय. तुमचंही चांगलंच असेल, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी यावेळी केली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

