अंजली दमानिया थेट अंतरवाली सराटीत, मनोज जरांगेंची भेट, सोबतीला धनजंय देशमुख; काय झाली चर्चा?
आम्ही आतापर्यंत कधीही भेटलो नव्हतो, फक्त फोनवर चर्चा झाली होती. म्हणून मी आज ठरवून भेटू घेतली, सगळ्यात चांगल्या माणसांना भेटायला कधीच काही प्रॉब्लेम नसतो, असे अंजली दमानिया यांनी म्हटलं.

जालना : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणाचा लढा लावून धरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज जालन्यात जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर मनोज जरांगे (Manoj jarange) पाटील यांनी आणि अंजली दमानियांनी थेट धनंजय मुंडेंचे नाव घेऊन त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच, त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली होती. तर, गेल्याच आठवड्यात कळंब येथील महिलेची हत्या झाल्यानंतर अंजली दमानिया यांनी ट्विट करुन संबंधित महिलेचा वापर करुन दिवंगत संतोष देशमुख यांचे चारित्र्यहनन करण्याचा डाव होता, असे म्हटले होते. त्यामुळे, संतोष देशमुख प्रकरणावरुन या भेटीला वेगळं महत्व आहे. मात्र, दोन-तीन दिवसांपूर्वी एका सभेमध्ये दादांना चक्कर आली होती, त्यावेळी मी ठरलं होतं की आपण भेट घेऊन दादांच्या तब्येतीची विचारपूस करावी. त्यामुळे, आज भेट घेऊन मनोज दादांची विचारपूस केल्याचं अंजली दमानिया (Anjali damania) यांनी भेटीनंतर स्पष्ट केलं.
आम्ही आतापर्यंत कधीही भेटलो नव्हतो, फक्त फोनवर चर्चा झाली होती. म्हणून मी आज ठरवून भेटू घेतली, सगळ्यात चांगल्या माणसांना भेटायला कधीच काही प्रॉब्लेम नसतो, असेही दमानिया यांनी या भेटीनंतर बोलताना म्हटले. दमानिया ह्या आज जालना दौऱ्यावर असून त्यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. तर, या अगोदरच या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हेदेखील उपस्थित होते. या भेटीत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती आहे.
संतोष देशमुख खून प्रकरणाबाबत काही चर्चा झाली का, असा प्रश्न विचारला असता, याला पुढची दिशा कशी द्यायची यावर चर्चा झाली. मला त्या चार्टशीटमध्ये सगळंच्या सगळं अर्धवट वाटत आहे. आरोपी सुदर्शन घुलेच स्टेटमेंट जेव्हा माध्यमांसमोर आलं, मला ते पूर्णपणे अर्धवट वाटलं. कारण, त्यात खुनानंतर पुढे काय झालं, तो कुठे गेला, कोणाच्या मदतीने बाहेर राहिला, तेव्हा कराडशी त्याचं बोलणं झालं की नाही याबाबत चकार शब्द सुद्धा स्टेटमेंटमध्ये लिहिलेलं नाही, असे अंजली दमानिया यांनी म्हटलं.
सहआरोपींमुळे धागेदोरे थेट धनंजय मुंडेंपर्यंत
पोलिसांनी असं अर्धवट स्टेटमेंट का घेतलं, मी मागे म्हटलं होतं की 10 लोकं आहेत, त्यांना सहआरोपी करणं गरजेचं होतं. व्हिडिओमध्ये राजेश पाटील दिसले, प्रशांत महाजन दिसले, हे सगळं असताना सुद्धा या कोणालाच, शिवलिंग मोराळे असो बालाजी तांदळे असो असे असंख्य लोक आहेत. डॉक्टर वायबसे असो कोणालाही सह आरोपी केलेलं नाही. यांना जर सहआरोपी केल तर याचे धागेदोरे थेट धनंजय मुंडे पर्यंत जातात, म्हणून हे मुद्दाम केलं गेलं नाही, असा आरोपही दमानिया यांनी केला आहे.
भेटीनंतर जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया
तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ताई मुंबईहून जालन्यात आल्या होत्या. अंजली ताईंच्या कामाचा आवाका मोठा आहे, तरी पण त्यांनी ठरवलं भेटायला जाऊ आणि त्या भेटीसाठी आल्या. बीडला शिक्षकाच्या कार्यक्रमांमध्ये माझं अंग गार पडलं होतं, त्यानिमित्ताने ताई तब्येतीची विचारपूस करायला, मला भेटायला आल्या दुसरं काही नव्हतं, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी भेटीनंतर दिली आहे.
हेही वाचा
उद्धव ठाकरेंनी 2019 पेक्षा मोठा अपराध काल केला, UT म्हणजे युज अँड थ्रो, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल!
























