Amol Mitkari: मोठी बातमी: मेधा कुलकर्णींचं वक्तव्य म्हणजे संविधान बदलाच्या चर्चेला बळ देणारं: अमोल मिटकरी
Amol Mitkari Vs Medha Kulkarni: आपल्या पुरोहिताची, मंत्राची चेष्टा करणाऱ्या अमोल मिटकरीसोबत मी स्टेजवर बसणार नाही; खासदार मेधा कुलकर्णी यांनीच बारामतीच्या सभेचा सांगितला किस्सा. मेधा कुलकर्णींनी ब्राम्हण समाजाची माफी मागावी.

अकोला: खासदार मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्याचा आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार समाचार घेतला आहे. सांगलीच्या एका कार्यक्रमात खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी आपण मिटकरींच्या (Amol Mitkari) व्यासपीठावर कधीच जाणार नसल्याचे म्हटले होते. मात्र, मेधा कुलकर्णींची ही माहिती खोटी असल्याचे अमोल मिटकरी यांनी सांगितले. उलट मेधा कुलकर्णी यांनी ब्राह्मण समाजाविषयी (Brahmin community) केलेले वक्तव्य संविधान बदलाच्या चर्चेला अधिकृत दुजोरा देणारे ठरु शकते, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले.
लोकसभेदरम्यान बारामतीच्या एका कार्यक्रमात व्यासपीठावर मेधा कुलकर्णी असल्याने आपणच त्या व्यासपीठावर गेलो नसल्याचं मिटकरी यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात खोटं बोलणाऱ्या खासदार मेधा कुलकर्णींनी ब्राम्हण समाजाची माफी मागावी, असेही मिटकरी म्हणाले.
अमोल मिटकरींनी मेधा कुलकर्णींना नेमकं काय प्रत्युत्तर दिलं?
लोकसभा आणि राज्यसभा ही दोन्ही सभागृह भारतीय संविधानाच्या चौकटीत येतात. ज्यावेळेस एखादी व्यक्ती या दोनपैकी एखाद्या सभागृहाची सदस्य होते, त्यावेळी त्याला शपथ दिली जाते. ती शपथ महत्त्वाची असते. ही शपथ घेतल्यानंतर संबंधित व्यक्ती एखाद्या समाजाची राहत नाही तर संपूर्ण देशाची होते. पण ही शपथ घेतल्यानंतरही कोणी एखाद्या समाजापुरतं वागत असेल तर भारतीय राज्यघटनेच्या विचारधारेला छेद देण्यासारखं ते आहे. असाच काहीसा प्रकार काल सांगलीत राज्यसभेच्या खासदारांकडून घडला.
आपल्या भाषणात राज्यसभेच्या खासदारांनी बारामतीमधील एक किस्सा सांगितला. मी अमोल मिटकरींसोबत स्टेज शेअर करणार नाही, असे त्यांनी सांगितले. बारामतीच्या प्रचारावेळी योगायोगाने एक युवक मेळावा होता. त्या मेळाव्याला सुरज चव्हाणही उपस्थित होते. ते आणि मी एका गाडीने गेलो. त्यावेळी अगोदरच या सन्माननीय सदस्या स्टेजवर बसल्या होत्या. जेव्हा आयोजकांकडून मला कळालं तेव्हा मी सांगितलं की, जे लोक स्वत:ला एका समाजापुरतं मानतात, अशा लोकांसोबत मला स्टेजवर बसायचे नाही. त्यामुळे मीच तेथून निघून गेलो. इतक्या दिवसानंतर त्या आठवणींना उजाळा देताना लोकांच्या टाळ्या मिळवण्यासाठी त्यांनी सांगलीत ते वक्तव्य केले. मात्र, एका पदावर असताना त्या एका समाजाच्या ध्येयधोरणांसाठी काम करत असतील तर हे भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत तत्त्वांना छेद देणारी आहे. असंच जर चालू राहिलं तर लोकांच्या मनात राज्यघटनेविषयी जी शंका आहे, त्याला अधिकृत दुजोरा मिळेल. त्यामुळे खासदारांनी केलेले वक्तव्य साफ चूक आहे. स्टेजवर त्या आल्या नाहीत, हे चूक आहे. मीच स्टेजवर गेलो नाही, हे निर्विवाद सत्य आहे, असे अमोल मिटकरी यांनी सांगितले.
आणखी वाचा

























