Nashik News : आपली मराठी भाषा अभिजातच, भाषेला जपणं महत्वाचं, जेष्ठ साहित्यिक भारत सासणे यांचं प्रतिपादन
Nashik News : मराठी भाषा 72 पेक्षा अधिक देशांमध्ये बोलली जात असून 2200 वर्षापूर्वी नाणेघाटात शीलालेख आढळून आला आहे.
Nashik News : मराठी भाषेवर (Marathi Bhasha) आजवर अनेक आक्रमणे झाली, ही सर्व आक्रमणे पचवून आपली मराठी भाषा समर्थ झाली आहे. मराठी भाषा आपल्या धमन्यांतून वाहत असल्याने ती अभिजातच असून तिला फक्त जपणं महत्वाचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे (Bharat Sasane) यांनी केले.
आज नाशिक (Nashik) शहरात मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Gaurav Din) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे आज सकाळपासूनच शहरात विविध कार्यक्रमाची रेलचेल पाहायला मिळाली. यात महाकवी कालिदास कलामंदिरात देखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आपले होते त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक सासणे मराठी भाषेच्या उत्पतीबद्दल बोलतांना म्हणाले की, आपली मराठी भाषा ही 2500 वर्षे जुनी भाषा असल्याचे विविध पुरावे 80 प्राचीन ग्रंथात आढळून येतात. भाषा शास्त्रज्ञांनी 200 प्रमुख भाषांची 12 गटात विभागणी केली असून मराठी भाषा 72 पेक्षा अधिक देशांमध्ये बोलली जाते. त्याचबरोबर 2200 वर्षापूर्वी नाणेघाटात शीलालेख आढळून आला आहे. हा शीलालेख ब्राम्ही भाषेत असून या शीलालेखावर मराठीचा उल्लेख आढळून येतो. याचाच अर्थ आपली मराठी भाषा ही प्राचीन असल्याचे सिध्द होते.
मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबाबत बोलतांना सासणे म्हणाले की, मराठी भाषेवर सीमाभागात अनेक आक्रमणे झाली. ही सर्व आक्रमणे पचवून आपली मराठी भाषा समर्थ झाली आहे. भाषा लुप्त झाली की, संस्कृती लुप्त होते, याकरीता मराठी भाषा जपणे आवश्यक आहे. आपण मराठी भाषेविषयीचा आपल्यातील न्युनगंड काढून टाकून अभिमान बाळगला पाहिजे. तरुण पिढीत इंग्रजीचा वापर वाढला आहे, तरुण वर्ग मराठी भाषेपासून दूर जात आहे. तरुणांनी इंग्रजीबरोबर मराठी भाषाही शिकली पाहिजेत. त्यांच्यात मराठीचा व्यासंग वाढण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान, गणिती शब्दांना पर्यायी मराठी शब्द आणणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. शिवाय उपजिविकेसाठी मराठी भाषा आवश्यक असल्याचे तरुणांना सांगणे आवश्यक आहे. आपली मराठी भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी मराठी वाचनालये सुरु झाली पाहिजेत. तसेच मराठी शाळाही सुरु राहिल्या पाहिजेत. मराठी भाषा आपल्या धमन्यातून वाहत असल्यामुळे ती अभिजात आहेच. तीला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलतांना विभागीय आयुक्त गमे म्हणाले की, कुसुमाग्रंजांच्या भूमीत आपले वास्तव्य आहे, हे आपले भाग्य आहे. नाशिक शहरातील लघु नाट्यमंदिरांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. विशेष पोलीस महानिरिक्षक बी. जी. शेखर पाटील म्हणाले, एका शब्दाचे अनेक अर्थ निघणारी आपली सर्वगुणसंपन्न मराठी भाषा आहे. आपल्या वागण्यात, बोलण्यात व संस्कृतीत बदल झाले असले तरी आपलेपण जपण्यासाठी आपली मराठी भाषा जपणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. फडके यांनी मराठी भाषेची सध्याची स्थिती यावर आपले विचार मांडले. यावेळी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक श्री. महाजन, वाघ, देशमुख यांनी आपले विचार मांडले.