एक्स्प्लोर
मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्या; खासदार संभाजीराजेंची मागणी
उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्याच निर्णयात आरे आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले. त्यापाठोपाठ नाणार प्रकल्प आंदोलनातीलही गुन्हे मागे घेण्यात आले. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्हेही मागे घेण्यात यावेत, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. सोबतच कोल्हापुरातील 'शिवाजी विद्यापीठासाहित' महाराष्ट्रातील सर्वच सार्वजनिक स्थळांचे नामकरण हे 'छत्रपती शिवाजी महाराज' असे करण्याचीही मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसात आरे आणि नाणार आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे निर्णय घेतले आहेत. आरे आणि नाणार प्रमाणेच भीमा कोरेगाव प्रकरणातील आंदोलकांवरचे गुन्हेही मागे घ्यावेत, अशी मागणी आता सुरु झाली आहे. भाजपचे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मागणी केली आहे. काय म्हटलंय पत्रात - "सर्व प्रथम मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल आपले अभिनंदन. माझे हे आपल्या नावे पहिलेच पत्र आहे. महाराष्ट्रातील जनमानसात छत्रपती शिवाजी महाराजांचे किती मोठे स्थान आहे, हे आपणास माहितच आहे. काही दिवसांपासून महाराजांच्या नाम उच्चारावरुन मोठी चर्चा होत आहे. मग ते अमिताभ बच्चन प्रकरण असो की केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांचं. त्या दोन्ही वेळी शिवभक्तांची बाजू घेत जाब विचारला होता. यावर कायमस्वरुपी उपाय योजना करणे आवश्यक आहे. सुरुवात म्हणून आपण सार्वजनिक स्थळांचे नामविस्तार करणे आवश्यक आहे. ज्यांचे नाव 'शिवाजी' असे आहे. आपणास अजून एक विशेष विनंती की, मराठा आरक्षणाकरीता महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरुन लढली. त्यात अनेक ठिकाणी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. अनेक आंदोलकांवर विनाकरण गुन्हे नोंदवले गेले आहेत. मी माजी मुख्यमंत्र्यांनी याबाबत पत्र लिहून चर्चा केली होती. आपणास ही विनंती की, आपण उपरोक्त विषयांवर तत्काळ निर्णय घेऊन आदेश निर्गमित करावेत". आपल्या समाजाला न्याय मिळावा म्हणून आंदोलन करण्यात आले होतं. त्यादरम्यान, त्यांच्याकडून काही चुका घडल्या असतील तर त्या समाजाच्या हितासाठी होत्या. त्यामुळे गुन्हे मागे घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. ही मागणी मागच्या सरकारच्या वेळी सुद्धा केली होती. त्यांनीही काही गुन्हे मागे घेतले होते, पण सरसकट गुन्हे मागे घ्यावेत, अशी आमची मागणी असल्याचं खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे. तर, कुणाचा वाईट हेतू नसला तरी अनेकदा शिवाजी असं म्हटलं जातं. अमिताभ बच्चन आणि कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडून सुद्धा हा उल्लेख घडला होता. त्याबद्दल मी जाब विचारला. शिवाजी विद्यापीठ हे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, तर, शिवाजीनगर हे छत्रपती शिवाजी महाराज नगर असं व्हायला हवं. दिल्लीत सुद्धा अनेक ठिकाणी एकेरी उल्लेख होत असल्याचं त्यांनी सांगितले. मला संभाजी म्हटलं तरी चालेल पण थोर लोकांचा उल्लेख तरी व्यवस्थित करण्याची विनंती यावेळी संभाजीराजे यांनी केली. नितीन राऊतांसह धनंजय मुंडेंचीही मागणी - मंत्री नितीन राऊत आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्हे मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. भीमा कोरेगाव आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे, असं नितीन राऊत यांनी सांगितलं. तर धनंजय मुंडे यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भाचं पत्र पाठवलं आहे. संबंधित बातम्या : आरे, नाणारप्रमाणे भीमा कोरेगाव आंदोलन प्रकरणातील गुन्हे मागे घ्या; नितीन राऊत, धनंजय मुंडेंची मागणी Maratha Reservation I मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्या - खासदार संभाजीराजे I एबीपी माझा
Before You Go
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj






















