एक्स्प्लोर
आता ठाकरे सरकार, मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी मांडला. या ठरावाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या सर्व आमदारांनी एकमताने अनुमोदन दिले.

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची घोषणा झाल्यानंतर सर्वांचे आभार मानले - सौजन्य : राजेश वऱ्हाडकर
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर मुख्यमंत्रीपदासाठी बहुमताचा आकडा असलेल्या 'महाराष्ट्र विकास आघाडी'कडून उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. महाविकासआघाडीच्या नेतेपदी उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून त्यांच्या नावाचा ठराव राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी या बैठकीत ठेवला. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी या ठरावाला अनुमोदन दिले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी मांडला. या ठरावाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या सर्व आमदारांनी एकमताने अनुमोदन दिले. ज्यांच्यासोबत 30 वर्ष मैत्री केली त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही पण जे 30 वर्ष विरोधक होते त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. यावेळी शरद पवार, सोनिया गांधी यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे त्यांनी आभार मानले. आपण सगळी मैदानातली माणसं आहोत, त्यामुळे आपल्या खेळायचं कसं हे सांगायची गरज नाही, असे ठाकरे यावेळी म्हणाले. विजयानंतर बाळासाहेबांची आठवण येत आहे, असेही ते म्हणाले. गरज सरो आणि वैद्य मरो अशी भाजपची वर्तणूक होती, असेही ते म्हणाले. शिवसेना आणि भाजपमध्ये काही ठरलंच नाही असं देवेंद्र फडणवीस यांचे वाक्य आज मनाला लागले. मी खोट्याची साथ देणार नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईल. भाजपला सेनेबद्दल द्वेष आहे. गरजेवेळी सेनेचा वापर केला, असेही ते म्हणाले. मला संघर्षाच्या वेळी नाही तरी संघर्षातून विजय मिळाल्यावर बाळासाहेब यांची आठवण येते. जीवनात कमावले काय आणि गमावले ते काय हे आज समजले, असेही ठाकरे यावेळी म्हणाले. आपले सरकार हे एक कुटुंब आहे . सर्व सामान्य माणसाला माझे सरकार आहे असे वाटले पाहिजे, असेही ते म्हणाले. सरकार स्थापन झाल्यावर शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार असल्याचे देखील ते म्हणाले. मोठ्या भावालाही दिल्लीमध्ये जाऊन भेटणार असल्याचे ठाकरे म्हणाले. या बैठकीत सुरुवातीला दोन ठराव मांडण्यात आले. यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत आभार मांडण्याचा ठराव पहिल्यांदा मांडला गेला. यानंतर 'महाराष्ट्र विकास आघाडी' म्हणून आघाडी स्थापन करण्याचा ठराव एकनाथ शिंदे यांनी मांडला. 'महाराष्ट्र विकास आघाडी' म्हणून आघाडीच्या नावाला राजू शेट्टी, अबू आझमी, बच्चू कडू, कपिल पाटील यांनी अनुमोदन दिलं.
आणखी वाचा























