Sanjay Gandhi National Park : वनसंरक्षकांच्या विरोधात स्थानिकांचं आंदोलन, मनमानी कारभाराचा आरोप
Sanjay Gandhi National Park: आदिवासी कुटुंबांकडे घरांचे पुरावे आणि कागदपत्रे असतानाही त्यांच्या घरांवर तोडक कारवाई करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

Sanjay Gandhi National Park : मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात वनसंरक्षक अनिता पाटील यांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात स्थानिक नागरिकांनी आंदोलन छेडले आहे. उद्यानालगत असलेल्या अभिनव नगर या उचभ्रू वस्तीत नागरिकांनी एकत्र येत आपल्या नाराजीचा तीव्र स्वर व्यक्त केला. आंदोलकांचा आरोप आहे की, वनसंरक्षकांच्या आदेशानुसार त्यांच्या जागेत सुमारे 2250 चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. या मुद्द्यावरून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. सोमवारी झालेल्या आंदोलनात पालिकेचे नगरसेवक राज सुर्वे देखील सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांकडे मागणी
या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी तातडीने लक्ष घालून योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलक आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे. सरकारने लवकर निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.
आदिवासी घरांवर कारवाईचा आरोप
स्थानिक आदिवासी बांधवांच्या मते, अनिता पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून परिसरात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. अनेक वर्षांपासून येथे राहणाऱ्या आदिवासी कुटुंबांकडे घरांचे पुरावे आणि कागदपत्रे असतानाही त्यांच्या घरांवर तोडक कारवाई करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या कारवाईमुळे काही दिवसांपूर्वी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि दगडफेकीची घटना देखील घडली होती.
स्थानिकांच्या रोजगारावरही परिणाम
उद्यान परिसरात पर्यटकांना सेवा देत अनेक वर्षांपासून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या स्थानिकांच्या वाहनांवरही निर्बंध घालण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या निर्णयामुळे अनेक कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम झाला असून घेतलेल्या कर्जाचे हप्ते कसे भरायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
अधिकाऱ्यांमध्येही असंतोष
आंदोलकांच्या मते, अनिता पाटील यांच्या कारभारामुळे उद्यानातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्येही नाराजी निर्माण झाली आहे. काहींनी इतर विभागात बदली करून घेतली, तर काहींनी नोकरी सोडल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.





















