Mumbai Rains: मुंबई, ठाणे, रायगडसाठी पुढील तीन तास महत्त्वाचे, पाऊस अन् वाऱ्याचा वेग वाढणार, हवामान खात्याचा अलर्ट
Mumbai Heavy Rain updates: मुंबईत पुढील तीन ते चार तास अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या काळात पावसाच्या अत्यंत जोरदार सरी बरसू शकतात. या काळात 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील.

Mumbai Heavy Rain news: मुंबई आणि उपनगर परिसरात काल रात्रीपासून तुफान पाऊस बरसत आहे. आज पहाटे या पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. पावसाच्या सरींची जोर इतका आहे की, रस्त्यावरील दृश्यमानता कमी झाली आहे. तसेच सतत सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईतील (Mumbai News) सखल भागांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. अशा परिस्थितीत कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडायचे की नाही, याचा विचार चाकरमनी करत असताना हवामान खात्याकडून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हवामान खात्याने पुढील तीन तासांसाठी मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये जोरदार पावसाचा इशारा (Weather Alert) दिला आहे. यासोबतच वाऱ्याचा वेग देखील 30-40 किमी प्रति तास राहण्याची शक्यता आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून यासंदर्भातील अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने आज सकाळी नवीन अलर्ट जारी केला. त्यानुसार मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हवामान खात्याने संपूर्ण महाराष्ट्रात पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. कोकणात आज सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. संपूर्ण कोकण पट्ट्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातदेखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. याठिकाणी हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे.
मुंबई लोकल ट्रेनबाबत महत्त्वाची अपडेट Heavy Rain Mumbai Local Train
मुंबईत पहाटेपासून सुरु असलेल्या पावसामुळे लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत झाली आहे. माटुंगा रेल्वे स्थानकात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वे रुळ पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तसे घडल्यास मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प होऊ शकते. सध्या मध्य रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेन 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहेत. तर हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक पाच ते दहा मिनिटं उशिराने सुरु आहे. तसेच एरवी सहसा परिणाम न होणाऱ्या पश्चिम रेल्वेमार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली आहे. याठिकाणी लोकल ट्रेन पाच ते दहा मिनिटांच्या विलंबाने धावत आहेत.
दक्षिण मुंबईतील हिंदमाता, किंग्ज सर्कल, दादर, फाईव्ह गार्डन, स्वामीनारायण मंदिर, जे.जे. फ्लायओव्हर आणि माटुंगा येथील सखल भागांमध्ये बऱ्यापैकी पाणी साचले आहे. अनेक सोसायटीमध्ये पाणी शिरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहनांचे नुकसान झालेले आहे. तर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचाही प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे.
आणखी वाचा
मुंबईतील मोनोरेल आज पुन्हा बंद पडली; प्रवाशांना काढलं बाहेर, महिन्याभरात तिसऱ्यांदा बिघाड
मुंबईत धो-धो पाऊस, लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत, घराबाहेर पडताना विचार करा
























