Mumbai Rain Red Alert: मुंबई, ठाणे, रायगडसाठी पुढील तीन तास धोक्याचे, हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट
Mumbai Rain Red Alert: मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली असून हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Mumbai Rain Red Alert: महाराष्ट्रात गेल्या 24 तासांपासून पावसाने (Maharashtra Rain) रौद्ररूप धारण केले असून राज्यभर पावसाचे जोरदार धुमशान सुरू आहे. याच दरम्यान भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) आणि रायगड (Raigad) जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' (Red Alert) जारी केली आहे. पुढील 3 तासांत या भागात 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह (Gusty Winds) अत्यंत तीव्र मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
Maharashtra Rain Update: 6 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबईसह संपूर्ण कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला (Vidarbha) मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. 6 जुलैपर्यंत राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज (Heavy Rain Forecast) व्यक्त करण्यात आला आहे. हवामान खात्याने नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Mumbai Rains: मुंबईत जनजीवन विस्कळीत
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांना तलावाचे स्वरूप आले आहे. शहरातील काही रस्ते खचले असून झाडे कोसळण्याच्या गंभीर घटना समोर आल्या आहेत. पश्चिम उपनगरात अंधेरी एमआयडीसी परिसरातील रोल्टा जंक्शनजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सीप्झच्या गेटसमोर पाणी साचल्यामुळे एमआयडीसी ते जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडला जाणारी वाहतूक मंदावली आहे.
Raigad Rains: रायगडमधील अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली
रायगड जिल्ह्यात पाली आणि नागोठणे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीवरील भेरव-खुरावले फाटा येथील छोट्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने महागाव, वाघोशी, भेरव, ताडगाव या गावांचा पाली शहराशी असलेला संपर्क तुटला आहे.
Thane Rains: मुंब्रा जलमय
मुसळधार पावसामुळे डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसर पूर्णपणे जलमय झाला आहे. स्टेशन परिसरातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ठाण्यातील मुंब्रा अमृतनगर परिसरातही दुकाने पाण्याखाली गेली असून गेल्या 6 तासांत मुंब्रा येथे 88.84 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Maharashtra Dam Water Level : राज्यातील धरणांची स्थिती
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. मात्र, ही वाढ अद्याप समाधानकारक नसल्याचे चित्र आहे. राज्यातील 3 हजार 28 मोठे, मध्यम आणि लघु धरण प्रकल्पांमध्ये सध्या एकूण 10 हजार 443 दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणीसाठा असून, तो एकूण साठवण क्षमतेच्या 25.56 टक्के इतका आहे.
गेल्या वर्षी याच दिवशी राज्यातील धरणांमध्ये 49.76 टक्के पाणीसाठा होता. विभागनिहाय पाहिल्यास अमरावती विभागात सर्वाधिक 41.04 टक्के, तर नागपूर विभागात 39.07 टक्के पाणीसाठा नोंदवला गेला आहे. कोकण विभागात 32.52 टक्के, नाशिक विभागात 25.46 टक्के आणि छत्रपती संभाजीनगर विभागात 24.76 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. दरम्यान, पुणे विभागातील स्थिती सर्वाधिक चिंताजनक असून येथील धरणांमध्ये केवळ 16.13 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी काळात पुरेशा पावसाची आवश्यकता कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.
आणखी वाचा
Before You Go
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला






















