Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मराठ्यांचं पाणी बंद केल्यास आयुक्तांना सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा बीएमसी आयुक्तांना थेट इशारा; म्हणाले, त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा!
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : चांगल्या चांगल्यांची जिरली आहे तर तुमचा काहीच विषय नाही. कधी ना कधी बदल होत असतो, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय.

Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली सध्या मुंबईच्या आझाद मैदानात मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. शुक्रवारी मराठा आंदोलक (Maratha Reservation) मुंबईत दाखल झाले आणि त्यांनी आझाद मैदानात ठिय्या मांडला आहे. मराठा आंदोलक काल रात्रभर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकातील फलाटांवर झोपले होते. मात्र, आज सकाळी आझाद मैदानाच्या परिसरात असलेल्या अनेक शौचालयांमध्ये पाणी नव्हते. तसेच मुंबई महानगरपालिकेने या परिसरातील हॉटेल्स आणि खाऊगल्ली बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी मराठा आंदोलकांचे खाण्याचे प्रचंड हाल झाल्याचे दिसून आले आहे. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीएमसी आयुक्तांना थेट इशारा दिलाय.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्हाला राजकारण करायचे नाही, आरक्षण पाहिजे आहे. मुख्यमंत्र्यांना राजकारणच करायचे आहे, आरक्षण द्यायचे नाही. माझे सर्वांना विनंती आहे की, तुमच्या गाड्या दिलेल्या पार्किंगमध्ये लावा. संयम बाळगा, शांत रहा, आपण वाट बघू. तुमच्या गाड्या सरकारने दिलेल्या मैदानावर लावा. आता सगळ्या मुंबईत मराठे आले आहेत. त्यांनी मुंबईत येऊ नये का? ते काही वाईट करणार नाहीत हा माझा शब्द आहे. माझं पोरांना सांगणे आहे की, अजिबात वाईट करायचे नाही. आता सगळ्या मुंबईत मराठी पसरले आहेत. फक्त आपापले वाहने सुरक्षित लावा. बीपीटी ग्राउंडवर गाड्या लावा. शिवडी येथे देखील गाड्या लावा. वाशीचे मैदान हे 20 ते 22 किलोमीटरवर आहे. तिथे काही गाड्या लावा, असे आवाहन त्यांनी मराठा आंदोलकांना केले आहे.
तुम्ही सगळे शांततेने राहा
आपल्याला हे आंदोलन शांततेत पार पाडून जिंकायचे आहे. गोंधळ घालणाऱ्यांचा काय उद्देश आहे हे मला माहित नाही. पण, त्या गोंधळ घालणाऱ्यांना सांगा की तुम्ही आंदोलनाची दिशा सध्या शांततेत ठेवा. बघू हे लोक आरक्षण देतात की नाही. तुम्ही सगळे शांततेने राहा, असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
मनोज जरांगेंचा बीएमसी आयुक्तांना इशारा
मला जरांगे पाटील म्हणाले की, बीएमसी आणि सीएसएमटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे की, शांततेने घ्या. तुम्हाला जेवायला मिळाले नाही. मुख्यमंत्री तुम्हाला पाणी मिळू देत नाहीत. कारण सध्या प्रशासक आहे. त्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्यांचा आहे. पण कधी ना कधीतरी वेळ बदलेल. तुम्ही सेवानिवृत्त जरी झाले तरी आयुक्त साहेब तुम्हाला सुट्टी देणार नाही. कारण तुम्ही मराठ्यांच्या पोरांचा पाणी बंद केलं. चांगल्या चांगल्यांची जिरली आहे तर तुमचा काहीच विषय नाही. कधी ना कधी बदल होत असतो. त्यावेळेला सगळा हिशोब होणार आहे. त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा. बीएमसीचा आयुक्त कोण आहे? असे म्हणत त्यांनी बीएमसी आयुक्तांना थेट इशारा दिला आहे.
पोरांना डिवचू नका
मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोरांचं पाणी बंद केलं, बाथरूम बंद केले, दुकाने बंद केले. बीएमसी आणि सीएसएमटीच्या परिसरात जमलेल्या पोरांना विनंती आहे की, होऊ द्या हाल. मी पोलिसांना सांगतो की, पोरांना डिवचू नका. विनाकारण ताण देऊ नका, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी पोलिसांना दिला आहे.
आणखी वाचा
























