एक्स्प्लोर
राज्यात लवकरच प्लास्टिक बंदी!
प्लास्टिक नैसगिक आणि जैविकदृष्ट्या विघटनशील नसतो. प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिकच्या इतर उत्पादनांच्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो.

मुंबई : संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी होण्याची शक्यता आहे. प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम रोखण्यासाठी, प्लास्टिकच्या साठवणूक, वितरण आणि विक्रीवर बंदी घालण्याची अधिसूचना पर्यावरण विभागाने काढली आहे. त्यामुळे प्लास्टिकपासून बनवल्या जाणाऱ्या पिशव्या, थर्माकॉलच्या प्लेट्स, ताट, वाट्या, कप, ग्लास, बॅनर, तोरणं आणि ध्वजासह अन्य गोष्टींवर बंदी येऊ शकते. या निर्णयानंतर दुकानं, मॉल्स, तसंच विविध आस्थापनांच्या परवान्यांसाठी प्लास्टिक वापर बंदीची अट घालण्यात येणार आहे. यासोबत संबंधित प्राधिकरण अथवा निरीक्षकांना परवाने नूतनीकरणावेळी प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळण्याबाबतची अट घालण्याच्या सूचना पर्यावरण विभागाने दिल्या आहेत. प्लास्टिक नैसगिक आणि जैविकदृष्ट्या विघटनशील नसतो. प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिकच्या इतर उत्पादनांच्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यात अडथळे निर्माण होऊन पाणी तुंबते. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. प्लास्टिक पिशव्या जनावरांच्या पोटात जाऊन त्यांचा मृत्यू होत असल्याने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय पर्यावरण विभागातर्फे घेण्यात आला आहे.
आणखी वाचा























