Tara Rani : महाराणी ताराराणी या जैन समूदायाच्या, आचार्य नयन पद्मसागर यांनी अकलेचे तारे तोडले, नवा वाद निर्माण होण्याची शक्यता
Acharya Nayan Padmasagar Speech On Tara Rani : जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या भाषणातील वक्तव्यावरुन आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुंबई : जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर (Acharya Nayan Padmasagar) यांच्या एका वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराणी ताराराणी (Tara Rani) या जैन समूदायच्या असल्याचं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं. औरंगजेबचा नाश करण्यासाठी जैन महाराणी असलेल्या ताराराणींचा (Tarabai) जन्म झाला असं वक्तव्य आचार्य नयन पद्मसागर यांनी केलं. मुंबईतील जैन समूदायाच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता सामाजिक आणि राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाले आचार्य नयन पद्मसागर?
जैन समूदायाच्या कार्यक्रमात बोलताना आचार्य नयन पद्मसागर म्हणाले की, "मोहम्मद घोरीने देशावर आक्रमण केलं त्यावेळी जैन असलेल्या मेवाड राणीने आपली तलवार काढली. त्यानंतर पुढील अनेक वर्षे आपल्या देशावर कोणी नजर वर करून बघायची हिंमत केली नाही . संस्कार आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी हातात तलवार घेणे याला धर्म म्हणतात. विक्रमादित्यने पूर्ण भारताला स्वतंत्र करण्यात मदत केली. औरंगजेब याने संभाजी महाराजांना पकडून हाल केले. त्यावेळी आणखी एक जैन महाराणीचा जन्म झाला आणि ती म्हणजे ताराराणी."
छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराराणी यांनी 25 वर्षे औरंगजेबशी लढा दिला आणि त्याला जेरीस आणलं. ताराराणी या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. पुढे जाऊन त्यांनी कोल्हापूरच्या गादीची स्थापना केली.
एकीकडे हा सर्व इतिहास असताना आचार्य नयन पद्मसागर यांनी मात्र त्यांच्या अकलेचे तारे तोडले आहेत. महाराणी ताराराणी या जैन समूदायाच्या असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
नरेंद्र मोदींची स्तुती
आचार्य नयन पद्मसागर यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. ते म्हणाले की, "जो समाज धर्माला विसरतो त्याला भविष्य नसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला. त्याच्या आधी स्वातंत्र्य मिळालं पण गुलाम बहरत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर निर्माण केले आणि हिंदुना मोठी भेट दिली. वयाच्या 75 व्या वर्षी सुद्धा मोदीजी काम करतात. तुम्ही ते नाही करु शकत नाही."
आचार्य नयन पद्मसागर पुढे म्हणाले की, "कोणत्याही गल्लीत जा संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर , संत नामदेव ऐकू येतील. आमचा धर्म कोणताही असो पण भारतात राहणारा प्रत्येक हिंदू आहे. जैन धर्म कोणत्या जातीत भेद मानत नाही. संविधान अखंड भारत बनवण्यासाठी महत्त्वाचं आहे. संविधानमध्ये कोणत्याही धर्माला वगळले नाही. मात्र जो धर्म लोकांना मारायला शिकवतो त्यावर बंदी घाला."






















