Bhandup Railway Station : भांडुप रेल्वे स्थानक परिसरात रिक्षांना नो एन्ट्री, प्रवाशांना करावी लागणार धावपळ; नेमकं कारण काय?
Bhandup Railway Station : भांडुप रेल्वे स्थानक परिसरात रिक्षांना येण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Bhandup Railway Station : भांडुप रेल्वे स्थानक परिसरात (Bhandup Railway Station) दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बेस्ट बस अपघातानंतर (Bus Accident) प्रशासनाने वाहतूक नियंत्रणासाठी महत्त्वाच्या उपाययोजना अमलात आणल्या आहेत. अपघातानंतर स्थानकाबाहेरील वाढती गर्दी आणि तीव्र वाहतूक कोंडी लक्षात घेता रिक्षांना थेट स्टेशन प्रवेशद्वारापर्यंत येण्यास बंदी घालण्यात आली आहे. स्थानकाच्या पश्चिमेकडील बाजूस ठराविक अंतरावर सीमारेषा आखण्यात आली असून ती ओलांडणाऱ्या रिक्षाचालकांकडून 1,500 रुपयांचा दंड आकारला जात आहे. या निर्णयामुळे रिक्षांच्या अनियंत्रित गर्दीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळाल्याचे दिसून येत आहे.
Bhandup Railway Station : फेरीवाल्यांवर कारवाई; रस्ते मोकळे
अपघातापूर्वी स्थानक परिसर फेरीवाल्यांनी व्यापलेला होता. त्यामुळे पादचारी आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अपघातानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेत फेरीवाल्यांवर कारवाई केली आणि रस्ते मोकळे करण्यास सुरुवात केली. या कारवाईमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी रिक्षांची अनियंत्रित वर्दळ ही मुख्य समस्या कायम होती. नव्या बंदीनंतर मात्र वाहतूक कोंडीत काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
Bhandup Railway Station : बेस्ट बसचे धोकादायक वळण कायम
दरम्यान, BEST बसचे स्थानकाबाहेरील धोकादायक वळण हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. बस प्रवाशांच्या रांगेजवळील फुटपाथलगत वळण घेत असल्याचे चित्र आजही दिसून येते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक रहिवाशांनी रिक्षा बंदीचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगत रिक्षाचालकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
Bhandup Railway Station : फलाट क्रमांक 1 वर छताचे काम अपूर्ण
स्थानकावरील फलाट क्रमांक 1 वरील छताचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. परिणामी अर्ध्या फलाटावर प्रवाशांना उन्हात उभे राहावे लागत आहे. काही प्रवासी छत्र्यांचा किंवा जवळील शेडचा आधार घेताना दिसतात, तर काही जण उन्हापासून बचाव करण्यासाठी छपराखाली थांबून ट्रेन येताच धाव घेताना दिसतात. एकीकडे वाहतूक नियंत्रणासाठी प्रशासन सक्रिय झाले असले, तरी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि मूलभूत सुविधांसाठी आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
























