जून-जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट? आरोग्यमंत्री म्हणतात....
कोरोनाची चौथी लाट कदाचित जरी जून-जुलै महिन्यात येईल, असं वाटत असलं तरी त्या दृष्टीने लसीकरण हेच तारणहार आहे, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
जालना : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. चौथी लाट कदाचित जरी जून-जुलै महिन्यात येईल, असं वाटत असलं तरी त्या दृष्टीने लसीकरण हेच तारणहार आहे. लसीकरणाचं प्रमाण वाढवणं हेच महाराष्ट्राच्या समोरचं महत्त्वाचं काम असल्याचं सांगत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चौथ्या लाटेपासून सावध राहण्यासाठी पुन्हा एकदा लसीकरणाचं आवाहन केलं आहे. आरोग्य विभाग लसीकरणाबाबत सजग आणि जागरुक राहून काम करत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. राजेश टोपे जालन्यात बोलत होते.
लसीकरणात अजिबात सहकार्य न करणाऱ्या लोकांपर्यत जाणीवपूर्वक पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "लसीकरणाबाबत रिफ्युजल टेन्डेन्सी काही लोकांची असते, जे नाही म्हणतात, येत नाहीत किंवा सहकार्य करत नाहीत, अशा लोकापर्यंत जाऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. या टेन्डेन्सीमुळे 18 ते 60 वर्षे वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचं प्रमाण कमी दिसतं. त्याबाबतीतही जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे."
शाळकरी विद्यार्थ्यांच्या वयोगटातील लसीकरणात जालना जिल्ह्याची कामगिरी उत्तम
"शाळकरी विद्यार्थ्यांच्या वयोगटातील लसीकरणात जालना जिल्ह्याने चांगलं काम केलं आहे," असं राजेश टोपे यांनी सांगितलं. "या कामासाठी मी जालन्याचे जिल्हाधिकारी, सीईओ, आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी यांचं अभिनंदन करेन. शिक्षकांचंही अभिनंदन करेन कारण शाळेमध्ये जाऊन त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या आहेत," असं ते म्हणाले.
राज्यात सध्या मास्क सक्ती नसली तर मास्क वापरण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. "पुढील काळात जर कोरोना संसर्ग कमी होत असल्याची सकारात्मक आकडेवारी आली तर मास्क संदर्भातील पुढील निर्णय घेतला जाईल," असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
गेल्या महिन्यात राज्यात आणि देशात कोरोनाचे रुग्ण अचानक वाढायला सुरुवात झाली होती. महाराष्ट्र सध्या मास्क मुक्त आहे, परंतु कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे राज्यात पुन्हा मास्क सक्ती करावी लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे सरकारकडून मास्क वापरण्याचं आवाहन केलं जात आहे.