![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
दसरा मेळाव्याला वाजत-गाजत, गुलाल उधळत या, पहिल्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Dasara Melava : दसरा मेळाव्याला उत्साहात या, वाजत गाजत या, पण आपल्या पंरपरेला कुठेही गालबोट लागणार नाही याची खबरदारी घ्या, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.
![दसरा मेळाव्याला वाजत-गाजत, गुलाल उधळत या, पहिल्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया Uddhav Thackeray on Shivsena Dasara Melava Verdict latest marathi news update दसरा मेळाव्याला वाजत-गाजत, गुलाल उधळत या, पहिल्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/21/0277d35203b518a92bf1225a2f0468e01663733452958290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Uddhav Thackeray on Shivsena Dasara Melava Verdict : दसरा मेळाव्याला उत्साहात या, वाजत गाजत या, पण आपल्या पंरपरेला कुठेही गालबोट लागणार नाही याची खबरदारी घ्या, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हायकोर्टाच्या निकालानंतर दिली. शिवाजी पार्क मैदानावर मेळावा घेण्याची परवानगी आज उच्च न्यायालयाने ठाकरे यांना दिला. हायकोर्टाच्या निर्णायानंतर राज्यभरात शिवसैनिकांनी जल्लोष केला. काही ठिकाणी पेढे वाटले. राज्यभरात शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला. हायकोर्टाच्या निकालानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसैनिकांना मोलाचा सल्ला दिला.
66 पासून आमचा विजया दशमीचा मेळावा होतो.. न्यायदेवतेने विश्वास सार्थ ठरवला. माझ्या सर्व शिवसैनिकांना आवाहन, उत्साहाने, वाजत गाजत या, पण शिस्तीने या.. आपल्या तेजस्वी परंपरेला, वारस्याला गालबोट लावू नका.. इतर काय करतील त्याची कल्पना नाही, पण आपली परंपरा जपा. तेज्याच्या वारस्याला गालबोट लागेल असं कृत्य आपल्याकडून होऊ देऊ नका. दसरा मेळाव्याकडे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशासह जगभरातील मराठी माणसाचं लक्ष असतं. त्यामुळे उत्साहात या, वाजत गाजत या, पण कुठेही गालबोट लागणार नाही याची खबरदारी घ्या, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
इतर काय करतील, त्यांचा आपल्याला माहित नाही. पण आपली परंपरा आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या परंपरेचं प्रतिनिधित्व करत आहोत. या दसऱ्या मेळाव्याकडे महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं आणि जगात राहणाऱ्या बांधवांचं लक्ष लागले आहे. आजच्या निकालाकडेही त्यांचं लक्ष लागलं होतं. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, उत्साहात या, वाजत गाजत या.. पण शिस्तीनं या... कुठेही आपल्या पंरपरेला गालबोट लागेल असं वागू नका, होऊ देऊ नका, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दोन गट नाही, शिवसेना ही शिवसेनाच आहे. ती वाढली आहे. परवचा मेळावा हा मुंबईतल्या गटप्रमुखांचा होता. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोर्टाने राज्य सरकारला बजावली आहे. त्यामुळे राज्य सरकारने कायदा सुव्यवस्था राखावी. प्रत्येकवेळी वाईटाचा विचार करु नये. चांगली सुरुवात झाली आहे. विजया दशमीचा मेळावा... पहिला मेळावाही मला आठवतोय... आजोबांचं भाषण आजही माझ्याकडे आहे.. कोरोनाचा काळ गेला तर ही परंपरा कायम आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)