Talathi Bharti : मोठी बातमी! तलाठी भरतीत महसूल सेवकांना प्राधान्य देणार, अनुभवानुसार काही जागा राखीव; राज्य सरकारचा निर्णय
Talathi Recruitment News : महसूल सेवकांना त्यांच्या अनुभवानुसार 25 अतिरिक्त गुण देण्यात येतील आणि तलाठी भरतीत त्यांच्यासाठी काही जागा राखीव ठेवण्यात येतील असा निर्णय झाला आहे.

मुंबई : राज्यातील महसूल सेवकांचा (Revenue Servants) दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महसूल सेवकांना तलाठी भरतीत (Talathi Recruitment) प्राधान्य देण्याचे आश्वासन दिलं.
Talathi Bharti News : महसूल सेवकांच्या मागण्यांवर चर्चेची बैठक
मंत्रालयात (Mantralay) महसूलमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीस मुख्य सचिव राजेश मिना, अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, तसेच महसूल सेवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणीमध्ये (Class IV category) समाविष्ट करून मानधनाऐवजी वेतनश्रेणी (Pay Scale) मंजूर करण्याची मागणी विचारात घेण्यात आली. मात्र, सध्याच्या नियमांनुसार वेतनश्रेणी लागू करता येत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
Maharashtra Talathi Recruitment : पर्याय म्हणून तलाठी भरतीत प्राधान्य
महसूलमंत्र्यांनी महसूल सेवकांना न्याय देण्यासाठी पर्याय सूचवला. त्यांच्या अनुभवानुसार तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव (Reserved Quota) ठेवून, ज्यांना किमान पाच वर्षांचा अनुभव (Five Years Experience) आहे, त्यांना 25 अतिरिक्त गुण देण्याचा प्रस्ताव मांडला. अधिकाऱ्यांनी या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच शासन निर्णय (GR) निघण्याची शक्यता आहे.
महसूल सेवकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार
बैठकीत महसूलमंत्र्यांनी महसूल सेवकांच्या इतर मागण्यांबाबतही सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. पूर्वीच त्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली असून, सरकार त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवेल, असेही बावनकुळे म्हणाले.
महसूल सेवकांनी जबाबदारीने वागावे
पूरस्थितीच्या काळात अनेक महसूल सेवक संपावर असल्यामुळे प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागला होता, हेही बैठकीत नमूद करण्यात आले. ऑनलाईन सेवांमुळे महसूल सेवकांचे काम काही प्रमाणात कमी झाले असले, तरी त्यांच्या अनुभवाचा उपयोग राज्य प्रशासन अधिक परिणामकारक करण्यासाठी केला जाणार आहे.
ही बातमी वाचा:
























