रावसाहेब दानवेंची हकालपट्टी करा; मोदी, राहुल गांधींवरील 'त्या' विधानानंतर सेना खासदार विनायक राऊतांची मागणी
दानवे गुरूजींची बुद्धी भ्रष्ट झाली असून त्यांच्या विधानाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घ्यावी, अशा शब्दात विनायक राऊत यांनी रावसाहेब दानवेंना लक्ष्य केलं.

रत्नागिरी : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी हे सांड तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करणारे बैल असल्याचं विधान केलं होतं. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना उदाहरण देत असल्याचं सांगितलं होतं. त्यांच्या या विधानानंतर काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं. तर, त्याच वेळी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी रावसाहेब दानवे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. रत्नागिरी येथे त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी हे उत्तर दिलं. दरम्यान, भाजपच्या नेत्यांना सत्तेची मस्ती आली असून त्यातून त्यांची विकृती दिसून येते. दानवे गुरूजींची बुद्धी भ्रष्ट झाली असून त्यांच्या विधानाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घ्यावी, अशा शब्दात त्यांनी यावेळी रावसाहेब दानवेंना लक्ष्य केलं आहे.
'काल, आज, उद्या शिवसेनाच'
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहे. पण, यावेळी त्याचा कोणताही परिणाम शिवसेनेवर होणार नाही. नारायण राणे यांच्या शक्ती प्रदर्शनाला काहीही अर्थ नाही. उलट राणे कोकणात तिसऱ्या लाटेला आमंत्रण देत आहेत. अशा रितीनं आशीर्वाद यात्रा काढून कोकणात शिवसेनेला कोणताही फटका बसणार नाही. कोकणात काल देखील शिवसेना होती. आज देखील आहे. तसेच ती उद्या देखील राहणार असं म्हणत त्यांनी राणेंच्या यात्रेला गंभीरपणे घेण्याचं कारण नसल्याचं म्हटलं आहे.
बाटगा नेहमी कोडगा, राणेंवर टिका
तसेच विनायक राऊत यावेळी नारायण राणे यांच्यावर देखील टीकेचे बाण सोडले आहेत. बाडगा हा नेहमी कोडगा असतो. राणेंकडून मंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी केली जात आहे. सत्तेसाठी द्रोह करणं हा राणेंचा स्थायीभाव आहे. राणेंनी सत्तेसाठी लाचार होत द्रोह केला असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे खंबीर खांब असल्याचं म्हटलं आहे. एकनाथ शिंदे नाराज असून त्यांना प्रत्येक फाईलवर सही करण्यासाठी 'मातोश्री'ची परवानही घ्यावी लागते. भाजपमध्ये आल्यास त्याचं स्वागत असल्याच्या राणेंच्या विधानावर प्रश्न विचारले असता त्यांनी अशा शब्दात राणेंना उत्तर दिलं आहे.
'भाजपनं अंतर्गत नाराजी पाहावी'
एकनाथ शिंदे यांच्यावर बोलताना भाजमधून एकनाथ शिंदे का बाहेर गेले? पंकजा मुंंडे यांचं काय? असा सवाल करत त्यांनी भाजपमधील नाराजीकडे देखील अंगुली निर्देश केले. शिवाय, केंद्रीय नेतृत्वानं नारायण राणे यांना देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर आणून बसवले आहे असं देखील म्हटलं आहे.
Before You Go
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
महत्त्वाच्या बातम्या





















