![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
प्रितीसंगमावरून आशीर्वाद घेताच शरद पवारांचा एल्गार; पहिली सभा दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात, राज्यव्यापी दौरा करणार
शरद पवार यांनी सामाजिक तीर्थक्षेत्र असलेल्या प्रितीसंगमावर जाऊन पुन्हा एकदा लढ्याचे रणशिंग फुंकले आहे. त्यांनी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली आहे. त्यांची पहिली सभा जुन्नरमध्ये होणार आहे.
![प्रितीसंगमावरून आशीर्वाद घेताच शरद पवारांचा एल्गार; पहिली सभा दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात, राज्यव्यापी दौरा करणार Sharad Pawar will go on a maharashtra tour the first rally will be in Dilip Walse Patil constituency ajit pawar ncp bjp satara karad प्रितीसंगमावरून आशीर्वाद घेताच शरद पवारांचा एल्गार; पहिली सभा दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात, राज्यव्यापी दौरा करणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/03/82c0cac4bcd0082e797780fce88453ea1688377068084736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sharad Pawar: अजित पवार यांनी राष्ट्रवादीत फूट पाडल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सामाजिक तीर्थक्षेत्र असलेल्या प्रितीसंगमावर जाऊन पुन्हा एकदा लढ्याचे रणशिंग फुंकले आहे. त्यांनी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली आहे. त्यांची पहिली सभा जुन्नरमध्ये होणार आहे. ही पहिली सभा अजित पवारांसोबत जाऊन धक्का दिलेल्या माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात होणार आहे. त्यानंतर बीडमधील परळीला मुंडेंच्या मतदारसंघात दुसरी सभा होणार आहे. दरम्यान, काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला असल्यास संख्याबळाचा विचार करता तर उचित असल्याचेही ते म्हणाले. अजित पवार कुणी परके नव्हते, एकत्र काम केल्यानंतरही मतभिन्नता असते. त्यामुळे त्यांच्याविषयी संशय व्यक्त करणार नाही, असेही पवार यांनी नमूद केले.
कोणताही संभ्रम नको, जाहीरपणे पक्षबांधणीसाठी जात असल्याचे शरद पवार यांनी ठामपणे सांगितले. ते पुढे म्हणाले की, आमचे अनेक सहकारी ज्यांना हजारो कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला, ज्यांच्याकडून संघटन मजबूत करावी अशी अपेक्षा होती. मात्र काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे नव्या पिढीतील कार्यकर्ता नाऊमेद होऊ नये म्हणून मी हा दौऱा सुरू केला आहे. कार्यकर्ते आणि त्यातीलही 70-80 टक्के तरूण आमच्या पाठीशी आहेत, हे चित्र आहे. आम्ही कष्ट केले, या तरूणांना दिशा दिल्यास मला खात्री आहे दोन ते तीन महिन्यांत संपूर्ण महाराष्ट्रातील चित्र राष्ट्रवादीला अनुकुल होईल.
अजित पवार कुणी परके नव्हते
शरद पवार म्हणाले की, एखादी महत्वाची मोहिम सुरू करण्यासाठी गुरूपौर्णिमा हा चांगला दिवस असतो. म्हणून आज यशवंतरावांच्या स्मृतींना वंदन करून मी ही मोहिम सुरू केली. भाजपच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नातून राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होता. सामाजिक सलोख्यासाठी प्रयत्न ही आमची अपेक्षा होती. ज्या प्रवृत्तींशी आमचा संघर्ष आहे, त्यांच्यासोबत गेले. पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी मी पुढाकार घेतला आहे. अजित पवार कुणी परके नव्हते, एकत्र काम केल्यानंतरही मतभिन्नता असते. त्यामुळे त्यांच्याविषयी संशय व्यक्त करणार नाही.
ज्यांना एवढं समजत नाही की मी जाहीरपणानं पक्षाच्या बांधणीसाठी निघालो आहे, त्यावरून संभ्रम निर्माण करू नका. महाराष्ट्राच्या विधानसभेत राष्ट्रवादीनं ज्यांना पक्षाचं नेतृत्व दिलं ते जयंत पाटील आहेत. त्यामुळे नेत्यांनी एखादा निर्णय घेतला असले, पत्रव्यवहार केला असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. अडीच वर्षं आम्ही शिवसेनेबरोबर काम केलं तेव्हा त्यांना वाटलं नाही की आम्ही काही चूक करत आहोत.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)