खेड नगरपरिषदेत महायुतीची एकहाती सत्ता, शिवसेनेचा 17 तर भाजपचा 3 जागांवर विजय, महाविकास आघाडीला खातेही उघडता आलं नाही
हराज्य मंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने खेड नगरपरिषद निवडणुकीत 21-0 असा ऐतिहासिक विजय मिळवला आहे
Ratnagiri Khed Nagarparishad Election : गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने खेड नगरपरिषद निवडणुकीत 21-0 असा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. खेड नगरपरिषदेवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. 2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर खेडमध्ये कोणाची सत्ता येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, निकाल जाहीर होताच महायुतीने 21-0 असा क्लीन स्वीप करत विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे. या निकालात महाविकास आघाडीला खातेही उघडता आले नाही.
निवडणुकीत शिवसेनेचे 17 उमेदवार विजयी तर भाजपचे 3 उमेदवार विजयी
महायुतीने खेड नगरपरिषद निवडणुकीत 21-0 असा ऐतिहासिक विजय मिळवल्यामुळं माधवी भुटाला या नगराध्यक्षा पदावर विराजमान होणार आहेत. जनतेने दिलेल्या या स्पष्ट कौलातून विकासाभिमुख नेतृत्वावरचा विश्वास अधोरेखित झाला आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे 17 उमेदवार विजयी तर भाजपचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत. 21-0 हा निकाल खेडच्या राजकारणात मैलाचा दगड ठरणारा असून, महायुतीच्या एकसंध नेतृत्वावर जनतेचा ठाम विश्वास दर्शवतो. राज्यातील नगरपरिषद आणि पंचायतींचे निकाल जवळपास लागले असून राज्यात भाजपा हा सर्वात मोठा पक्ष या निवडणुकीत ठरला आहे. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना शिंदे गट आहे. महायुतीने जोरदार मुसंडी नगरपरिषद निवडणुकीमध्ये मारली आहे. चिपळूणमध्ये शुभम पिसे यांचा एका मताने विजय झाला असून ही निवडणूक राज्यभर चर्चेत आहे. आळंदी नगरपरिषदेमध्ये भाजप विजयी झाले.
रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगर परिषदा आणि तीन नगर पंचायतींमधील झालेल्या निवडणुकीचा अखेर निकाल लागला असून महायुतीने विरोधकांची धुळधान केली आहे. जिल्ह्यातील सात पैकी सहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगराध्यक्ष पदावर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर राजापूर नगरपरिषदेवर विधानपरिषदेच्या माजी आमदार हुस्नबानू खलिपे यांनी विजय मिळवत काँग्रेसला तारले आहे.
राज्यातील 246 नगरपालिका आणि 54 नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल हाती
राज्यातील 246 नगरपालिका आणि 54 नगरपंचायतींच्या निवडणुकांचे (Election) निकाल आज हाती आले आहेत. बहुतांश जागेवर नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यानंतर, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवारांच्या उमेदवारांना यश मिळाले आहे. तर, काँग्रेसला 34, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 7 आणि ठाकरेंच्या शिवसेनेला 8 जागांवर विजय मिळाला आहे. भाजपने (BJP) 100 पेक्षा जास्त जागांवरील नगरपालिकेत सत्ता काबिज केली असून जवळपास 120 नगराध्यक्ष भाजपचे झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:























