![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
राज्यात पावसाचा धुमाकूळ, सकाळपासून मुसळधार, सिंधुदुर्गाला रेड अलर्ट, विदर्भाला यलो अलर्ट
Mumbai, Maharashtra, Weather Forecast : राज्यात मान्सून दाखल झाला असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, पुणे, कोकण, विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
![राज्यात पावसाचा धुमाकूळ, सकाळपासून मुसळधार, सिंधुदुर्गाला रेड अलर्ट, विदर्भाला यलो अलर्ट Mumbai Maharashtra pune solapur Kolhapur vidharbha marathwada Weather Forecast rain alert mumbai kokan marathi news राज्यात पावसाचा धुमाकूळ, सकाळपासून मुसळधार, सिंधुदुर्गाला रेड अलर्ट, विदर्भाला यलो अलर्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/09/339098cd39d03f5e1848db025b9c3e251717905670312265_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai, Maharashtra, India Weather Forecast : राज्यात मान्सून दाखल झाला असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, पुणे, कोकण, विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शनिवारी मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस झाला. तर पुणे शहरात देखील ढगफुटी सदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली. राज्यातील इतर भागात देखील येत्या 2 दिवसात वरुणराजाचे जोरदार आगमन होणार आहे. याबाबत इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील 48 तासांत मान्सून मुंबईत दाखल होणार आहे. सिंधुदुर्गाला आज रेड अलर्ट देण्यात आलाय. तर संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आलाय. मराठवाड्यातही अनेक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सिंधुदुर्गासाठी आज रेड अलर्ट, राज्यात चार दिवस कोसळधारा -
राज्यात पुढील तीन-चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता, सोबतच सरासरी ५०-६० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. रत्नागिरीसाठी आज ऑरेंज अलर्ट, ज्यात १०० मिमीहून अधिक पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो. सिंधुदुर्गासाठी आज रेड अलर्ट, काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यावर देखील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात आज अनेक जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात वादळी वाऱ्यांसह सर्वत्र पावसाची शक्यता, संपूर्ण विदर्भासाठी आज यलो अलर्ट देण्यात आलाय.
मुंबईत पावसाची संततधार
आज पहाटेपासून मुंबईत ठीकठिकाणी पावसाने हजेरी लावली. दादर, कुर्ला, अंधेरी, घाटकोपर, कुलाबा, वांद्र्यात पावसाने हजेरी लावली. पहाटेपासून मुंबई आणि उपनगरात पाऊस कोसळला. पुढील 3-4 तास मुंबईत पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात मध्य आणि मोठ्या सरी बरसण्याचा अंदाज आहे. विजेच्या कडकडाटसह पावसाचा अंदाज आहे. तर तशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं हवामान खात्याने आवाहन केलेय.
कल्याण-डोंबिवलीत पावसाची हजेरी
कल्याण-डोंबिवलीत उकाड्यामुळे हैराण झालेले नागरिक मान्सूनची प्रतीक्षा करत होते. आज पहाटे तासभर कल्याण-डोंबिवलीत पावसाने हजेरी लावली. सुमारे तासभर रिमझिम पाऊस सुरू होता. अधुनमधून पावसाची जोरदार सर कोसळत होती, पावसाला जोर नसला तरी रिमझिम पावासामुळे नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळाला आहे. सकाळी पावसाने उघडीप घेतली आहे.
रिमझिम बरसणाऱ्या पावसामुळे लोकलवर परिणाम
मध्य रेल्वेवरील लोकल 5 ते 10 मिनिटं उशिराने धावत आहे. अंबरनाथ दरम्यान सिग्नल बिघाड झाल्याने आणि सर्वत्र रिमझिम बरसणाऱ्या पावसामुळे लोकलवर परिणाम झाला आहे. तुर्तास सिग्नलमध्ये झालेला तांत्रिक बिघाड मध्य रेल्वेकडून दुरुस्त करण्यात आला आहे.
वसई विरारमध्ये धुवांधार पाऊस -
वसई : वसई विरारमध्ये आज पहाटेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या पहिल्याच पावसात सखल भागातील रस्त्यावर पाणी साचलं होतं. वसईच्या साईनगर, विश्वकर्मा नगर, समता नगर, दिवानमान, माणिकपूर रोड येथे पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी साचलं आहे. पालिकेने नालेसफाईचा दावा केला असला तरी पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी साचू लागल्याने पालिकेचा दावा फोल ठरला आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी आभाळ भरलेलं आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्ग खचला
वसई : पहिल्याच पावसात मुंबई अहमदाबाद महामार्ग खचला आहे. वसई हद्दीतील मालजीपाडा परिसरातील जे के टायर शो रूम जवळ पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू असल्याने हा महामार्ग खचला आहे. खचलेल्या रस्त्यावर वाहनांचे टायर अडकल्याने महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली आहे. आज पहाटे च्या सुमारास ही घटना घडली आहे. महामार्ग पोलिसांकडून वाहन बाजूलाकाडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.
सांगली जिल्ह्यात पडलेल्या दमदार पावसामुळे अग्रणी नदीला पूर
सांगली जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावलीय. त्यामुळे बारमाही कोरडी असणारी अग्रणी नदी वाहती झाली असून अग्रणी नदीला पूर आलाय. तसेच जिल्ह्यातील अनेक ओढे नाल्यांना देखील पूर आला असून पुलावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे अग्रणी नदीच्या बंधार्यावरून होणारी वाहतूक देखील ठप्प झालीय. जिल्ह्यातील मिरज, शिराळा, तासगाव, आटपाडी तालुक्यांना देखील मुसळधार पावसाने झोडपून काढलेय. शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने शेतीची कामे देखील ठप्प झालेत.
सिंधुदुर्गात आज रेड अलर्ट -
जिल्यातील रातभर मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. मात्र आता जिल्हयात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. सिंधुदुर्गात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी योग्य ती कारवाई घेण्याचं आवाहन प्रशासनाने केले आहे. समुद्रात ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असल्याने मच्छिमारांना समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा देखील देण्यात आलेला आहे.
कोल्हापुरात धुवांधार पाऊस
कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. हंबरवाडी-बेरडवाडी रोडवर ओढ्यातून म्हैस गेली वाहून. ओढ्यावर ट्रॅक्टर आणि ट्रॉली देखील बांधून ठेवायची वेळ आली. आजही कोल्हापुरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
पुणे शहर परिसरात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी;
पुणे शहर आणि परिसरात शनिवारी सायंकाळी मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहरातील शिवाजीनगर, पाषाण भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. कमी वेळेत जास्त पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे, त्याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. तरी प्रशासनाच्यावतीने तातडीने उपाययोजना करण्याच्या तसेच पावसात अडकलेल्या नागरीकांना मदत करुन पावसामुळे विस्कळीत झालेली वाहतुक सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
पुण्यात शनिवारी सायंकाळी मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे काही भागात पाणी साचले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले, याची तातडीने दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. त्यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून या विषयीची माहिती घेतली. जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी तसेच विस्कळीत झालेली वाहतुक तातडीने सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. या काळात नागरीकांनी शक्यतो घराच्या बाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. नागरीकांनी काळजी घ्यावी. तसेच येत्या पाच दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस जोरदार हजेरी लावणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याअनुषंगाने राज्यातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सतर्क राहण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)