Maratha Reservation : मराठा समाजाला EWS प्रमाणपत्र देण्याबाबत प्रशासनाकडून टाळाटाळ, अशोक चव्हाण यांचा आरोप
Ashok Chavan : तहसिलदारांकडून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना EWS प्रमाणपत्र देण्याबाबत टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष द्यावं अशी मागणी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केली आहे.
![Maratha Reservation : मराठा समाजाला EWS प्रमाणपत्र देण्याबाबत प्रशासनाकडून टाळाटाळ, अशोक चव्हाण यांचा आरोप Maratha Reservation Congress Ashok Chavan alleges that the administration is reluctant to give EWS certificate to the Maratha community students Maratha Reservation : मराठा समाजाला EWS प्रमाणपत्र देण्याबाबत प्रशासनाकडून टाळाटाळ, अशोक चव्हाण यांचा आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/08/ba9286d84857702af457f02abb6bc8301657241636_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे.
अशोक चव्हाण यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्लूएस प्रमाणपत्र देण्यासाठी तहसिलदार टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी येत असून, राज्य शासनाने जिल्हा व तालुका प्रशासनांना तातडीने निर्देश देऊन मराठा समाजाला ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्याबाबत कोणताही न्यायालयीन अडसर नसल्याचे स्पष्ट करावे."
अशोक चव्हाण यांनी आपल्या पत्रात पुढं म्हटलं आहे की, "सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाचे (एसईबीसी) आरक्षण रद्द केल्यानंतर त्या काळात अपूर्णावस्थेत असलेल्या नोकरभरती प्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना आर्थिक दृष्ट्या मागास वर्गाचे (ईडब्ल्यूएस) लाभ देण्याचा निर्णय मागील राज्य सरकारच्या काळात घेण्यात आला होता. मात्र, त्या निर्णयाला उच्च न्यायालयाने रद्दबातल केले आहे. सदरहू निर्णय केवळ अपूर्णावस्थेत असलेल्या नोकरभरती प्रक्रियेतील तत्कालीन एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी होता. त्या निर्णयाचा मराठा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसचे लाभ मिळण्याविषयी काहीही संबंध नाही. तरी देखील तहसीलदार मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यास नकार देत आहेत. सध्या अनेक शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया तसेच नोकरभरती प्रक्रियांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याने मुख्यमंत्र्यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करावी."
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं 9 सप्टेंबर 2020 रोजी अंतरिम स्थगिती दिली होती. त्यानंतर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक दुर्बल घटकातून आरक्षणासाठी अर्ज करण्याची मूभा देण्यात आली. त्या अंतर्गत आता मराठा समाजातील विद्यार्थी अर्ज करत असून त्यासाठी त्यांना आता ईडब्लूएस प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत आहेत. प्रशासनाकडून तसे प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याची तक्रार या आधी अनेक विद्यार्थ्यानी केली आहे. त्यासंबंधी आता काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून या प्रकरणी लक्ष द्यावं अशी विनंती केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Shivsena : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर, 22 ऑगस्टला सुनावणी होणार
- Sharad Pawar : शिवसेनेच्या धनुष्यबाणावर शरद पवारांचं महत्वाचं वक्तव्य, एकनाथ शिंदेंनाही दिला सल्ला
- नुपूर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, देशभरातील सर्व खटले दिल्लीत केले वर्ग
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)