Manoj Jarange Mumbai March Live Update : मनोज जरांगे पुन्हा आंतरवालीत, मराठवाड्यातील इंटरनेट सेवा बंद, मराठा आंदोलनाची प्रत्येक अपडेट...
Manoj Jarange Mumbai Protest : आक्रमक झालेले मनोज जरांगे मुंबईकडे निघाले असताना, त्यांनी आपला ताफा पुन्हा माघारी वळवत आंतरवाली गाठलं.

Background
Manoj Jarange Mumbai Protest : आक्रमक झालेले मनोज जरांगे मुंबईकडे निघाले असताना, त्यांनी आपला ताफा पुन्हा माघारी वळवत अंतरवाली गाठलं. पोलिसांनी जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यात संचारबंदी लागू केल्याने, जरांगे माघारी फिरले. "अंतरवलीमध्ये जाऊन पुढील निर्णय घेऊ. सर्वांनी शांतता राखावी, हट्टवादी भूमिका घेऊन मला लोकांना अडचणीत आणायचं नाही, फडणवीस तू चूक केली, सागर बंगल्यावरचं आमंत्रण देऊन दार लावून घेतोय, संचारबंदी निघू द्या मुंबईला जाईल, अंतरवलीमध्ये जाऊन उपचार करणार, आंदोलकांना आपापल्या घरी जावं, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) रविवारी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा मला मारण्याचा डाव असून, मला सलाईनमधून विष देण्यात येणार असल्याचा खळबळजनक दावा देखील जरांगे यांनी केला. फडणवीस यांना मला मारायचेच असेल तर मी त्यांच्या सागर बंगल्यावर जाऊन मरतो असे म्हणत जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले होते. आंतरवालीपासून निघालेले जरांगे रात्री भांबेरी गावात पोहचले. मात्र, गावकऱ्यांनी त्यांना तिथेच मुक्काम करण्याचा आग्रह केल्याने जरांगे रात्री तिथेच थांबले होते. आता जरांगे पुन्हा आंतरवालीत पोहचले आहेत.
जरांगे सागर बंगल्यावर येत असतील तर आम्ही सर्व आमदार सागर बंगल्याबाहेर उभे राहू : भरत गोगावले
जरांगे आतापर्यंत मॅनेज होत नव्हतं असं वाटत होतं पण आता जी भाषा बोलत आहेत त्यावरून ते मॅनेज झाले आहेत असं वाटतंय. जरांगेच्या मागे पवार आणि ठाकरे कुटुंबीय आहेत कारण ज्यांना एकनाथ शिंदेंना पराभूत करता आलं नाही ते आता जरांगेंना पुढे करत आहेत . जर जरांगे सागर बंगल्यावर येत असतील तर आम्ही सर्व आमदार सागर बंगल्याबाहेर उभे राहू. मी विनंती करतो आता त्यांनी थांबावं पाणी नाकापर्यंत पोहचलं आहे, असं भरत गोगावले म्हणाले.
Iternet Service Closed In Marathwada : मराठवाड्यातील 'या' भागात इंटरनेट सेवा बंद...
Manoj Jarange Protest : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर देखील याबाबत अनेक पोस्ट, व्हिडिओ, फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्याचा आदेश काढण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 10 तास बंद करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी हे आदेश काढले आहेत.






















