(Source: ECI | ABP NEWS)
Maharashtra Weather : राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा, वाचा नेमकी का अशी स्थिती निर्माण झाली?
Maharashtra Weather : हवामान विभागानं (Meteorological Department) राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा (rain) इशारा दिला आहे.
Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कधी थंडी तर कधी उन्हाचा कडाका जाणवत आहे. अशातच आता हवामान विभागानं (Meteorological Department) राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा (rain) इशारा दिला आहे. सात एप्रिलपर्यंत राज्यातील विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा यलो अलर्टचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान, आज (4 एप्रिल) विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कधी कुठे पडेल पाऊस?
सध्या उन्हाळा सुरु आहे मात्र, अशातच आता हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उद्या (5 एप्रिल) गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर 6 एप्रिलला पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली आणि विदर्भातील अकोला जिल्ह्यातही हवामान विभागानं पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. तर 7 एप्रिलला देखील पश्तिम महाराष्ट्रसह मराठवाड्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
अचानक पावसाची स्थिती का निर्माण झाली?
हवामान विभागानं मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाली पावसाचा इशारा दिला आहे. अचानक अशी स्थिती का निर्माण झाली, यासंदर्भात हवामान अभ्यासक मयूरेश प्रभुणे यांनी एबीपी माझाला माहिती दिली. पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि दक्षिण पूर्वेकडून वाहणारे वारे यांचा संयोग विदर्भापासून ते तामिळडूपर्यंत होत आहे. त्यामुळं या बागात द्रोणीय स्थिती म्हणजे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या भागात बाष्प जमा होत आहे. तर दुसरीकडे तापमानही वाढत आहे. साधारणत 35 अंशाच्या आसपास तापमान आहे. त्यामुळं या भागात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवल्याची माहिती प्रभुणे यांनी दिली.
या काळात शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी. काळे ढग जमा झाले असताना किंवा वीजा चमकत असताना शेतकऱ्यांनी शेतात काम करु नये. शेतकऱ्यांनी अशा स्थितीत घराचा आश्रय घ्यावा. तसेच शेतकऱ्यांची शेतातील काही अर्धवट कामे राहिली असतील तर ती कामे देखील शेतकऱ्यांनी उरकून घ्यावीत. तसेच काढलेल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहनही हवामान अभ्यासक मयूरेश प्रभुणे यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: