Maharashtra Rain : परतीच्या पावसानं राज्यातील शेतकरी संकटात, पिकांचं मोठं नुकसान, आजही राज्यात पावसाचा अंदाज
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज कोकणसह मध्य महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट (Yellow alert) देण्यात आला आहे.

Maharashtra Rain : राज्यात परतीच्या पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भुरन वाहत आहेत. तर दुसरीकडं या पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पिकांमध्ये पाणी साचल्यानं पिकं वाया गेली आहेत. त्यामुळं राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. राज्यातील पुणे, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. त्यामुळं वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज कोकणसह मध्य महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट (Yellow alert) देण्यात आला आहे.
परतीच्या पावसाचा सर्वांत मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकं काढणीला आली आहेत. काही ठिकाणी शेतकरी पिकं काढणी करत होते, अशातच गेल्या आठवडाभरापासून परतीच्या पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे. सोयाबीन आणि कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी तर सोयाबीनचा चिखल झाला आहे. तर कापसाच्या वाती झाल्या आहेत. याचबरोबर अनेक ठिकाणी घरांमध्ये देखील पाणी शिरल्यानं नागरिकांचा त्रास सहन करावा लागला.
बारामतीत मुसळधार पाऊस, कऱ्हा नदीला महापूर
बारामती, पुरंदर परिसरात झालेल्या पावसामुळं कऱ्हा नदीला महापूर आला आहे. कऱ्हा नदी ही दुथडी भरुन वाहू लागली असून पाणी नदी पात्राच्या बाहेर आलं आहे. बारामती परिसरातील कऱ्हा नदीची ड्रोन दृश्ये बारामतीतील कुणाल जाधव यांनी त्यांच्या ड्रोनमधे टिपली आहेत.
परभणीच्या पुर्णा तालुक्यात जोरदार पाऊस , वीज पडल्याने भर पावसात जळाली कडब्याची गंजी
परभणी जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून रोजच कोणत्या ना कोणत्या तालुक्यात पाऊस बरसतोय. काल रात्री परभणीच्या पुर्णा तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यात पाऊस सुरु असताना धानोरा काळे येथील शेतकरी नागनाथ रेंगे यांच्या शेतातील कडब्याच्या गंजीवर वीज पडली आणि भर पावसात ही गंजी जळत होती. अगोदरच सततच्या पावसाने सोयाबीन, कापूस हातून गेला असताना आता रेंगे यांच्या कडब्याची गंजी जळाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ही गंभीर होणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस
अहमदनगर जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. संगमनेर तालुक्यातील सावरगावतळ इथं आज सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसानं काढणीस आलेले मका, सोयाबीन, कांदे, वांगे, घेवडा, टोमॅटो, दोडके, फ्लॉवर आदी पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. पावसामुळं अनेक शेताचे बांध फुटून ओढे नाले यांना मोठा पूर आला तर अनेक ठिकाणी शेत रस्तेही वाहून गेले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
Maharashtra Rain : राज्यातील 'या' जिल्ह्यात पावसाचं थैमान, शेती पिकांचं मोठं नुकसान तर काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
