Maharashtra Rain Live Updates : उजनी धरणातील विसर्ग वाढवला, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Maharashtra Rain Live : राज्याच्या काही भागात पावसानं (Rain) चांगलीच हजेरी लावली आहे. हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पाऊस पडत आहे.

Background
Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पाऊस पडत आहे. दरम्यान, मुंबईत देखील पावसाची रिपरिपस सुरुच आहे. मध्यरात्री मुंबईत जोरदार पावसानं हजेरी लावली होती. त्याचबरोबर ठाणे, नवी मुंबई, पालघर परिसरात देखील जोरदार पाऊस झाला आहे. तसेच पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलढाणा, परभणी, वर्धा, नांदेड, अकोला या जिल्ह्यात देखील पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. काही ठिकाणी मात्र, या पावसामुळं शेती पिकांचे नुकसान होत आहे.
दरम्यान, आजही राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आज पालघर आणि रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरीसह पुणे आणि विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना हवामान विभागानं दिल्या आहेत. काल राज्याच्या विविध भागात पावसानं धुमाकूळ घातला. अनेक ठिकाणी या पावसामुळ वाहतुकीवर देखील परिणाम झाल्याचे पाहायला मिळालं.
मुंबईत जोरदार पाऊस
मुंबईत जोरदार पावसानं हजेरी लावली. रात्री मुंबईत मुसळधार पाऊस झाला. यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला. पावसामुळं रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकल उशिराने धावत होत्या. दरम्यान, या पावसामुळं ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे.
बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत
बुलडाणा जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळं जिल्ह्यात काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं. जळगाव जामोद , मोताळा , संग्रामपूर ,शेगाव , खामगाव तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली.
परभणीत पावसाची जोरदार हजेरी
परभणीत (Parbhani) पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस बरसत आहे. त्यामुळे अनेक भागात पाणीच पाणी झाले असून छोट्या मोठ्या नदी नाल्या ओसंडून वाहत आहेत. जिल्हाभरातील सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले असून सुरू असलेल्या या पावसामुळे पुन्हा एकदा या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उजनी धरणातील विसर्ग वाढवला, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Pandharpur : उजनी धरणातील विसर्ग वाढवून 1 लाख क्यूसेक करण्यात आला आहे. वीरचा विसर्ग 15 हजार एवढांच ठेवण्यात आल्याने नागरिकांची चिंता परत वाढली आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
पंढरपूरच्या व्यास नारायण झोपडपट्टीत पुराचे पाणी शिरले, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात
पंढरपूर : उजनी आणि वीर धरणातून काल सोडलेल्या पाण्याचा विसर्ग आज पंढरपूरमध्ये पोचू लागल्याने हे पुराचे पाणी शिरू लागलेल्या व्यास नारायण झोपडपट्टी मधील नागरिकांना सुरक्षित जागी हलविण्यास सुरुवात झाली आहे. आज सायंकाळी चंद्रभागा तीरावर असणाऱ्या व्यास नारायण वसाहतीतील अनेक घरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली. रात्री ही पाणी पातळी अजून वाढणार असल्याने प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांनी या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची व्यवस्था केली आहे. पाणी किती वाढणार याचा नेमका अंदाज येत नसला तरी या भागातील बहुतांश घरात आज रात्री पाणी शिरण्याची शक्यता आहे. या भागातील जवळपास शंभर कुटुंबे तसेच महाद्वार घाटावर राहणारे काही कुटुंबांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले आहे.


















