Maharashtra Monsoon Rain LIVE : मुंबईसह पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची दमदार हजेरी, नागरिकांना दिलासा
Maharashtra Monsoon Rain LIVE : मान्सून हळूहळू राज्याच्या इतर भागात पुढे सरकत आहे. मुंबई आणि परिसरात चांगलाच पाऊस झाला.तसेच राज्याच्या इतरही भागाव पावसानं दरदार हजेरी लावली.

Background
Maharashtra Monsoon Rain LIVE : कोकण आणि मुंबईत दाखल झालेला मान्सून हळूहळू राज्याच्या इतर भागात पुढे सरकत असल्याचे चित्र दिसत आहे. काल मुंबई आणि परिसरात चांगलाच पाऊस झाला. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात रिमझिम पाऊस झाला. दोन दिवसांत सात तलाव क्षेत्रात 279 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसानं दमदार हजेरी लावली आहे. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. नाशिक,पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. नाशिकमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्येही जोरदार पावसाने हजेरी लावली. कालपासून राज्यातल्या विविध भागात पावसाचं आगमन झालं आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. तर पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे.
काल झालेल्या मुसळधार पावसानं लोणार तालुक्यातील वळण रस्ता वाहून गेला आहे. लोणार ते महारचिकना मार्गावरील पुलाचे काम चालू आहे. असल्यामुळं वळण रस्ता तयार केला होता, तो वाहून गेला आहे. त्यामुळं या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. नदीवरून पुढे पायी सुद्धा जाता येत नाही, कोणतीच वाहने जात नसल्यामुळं प्रवाशांना खूप त्रास होत आहे. संबंधित ठेकेदारानं आणि प्रशासनानं लवकरात लवकर पर्यायी रस्ता करावा हीच ग्रामस्थांकडून मागणी होत आहे. पहिल्याच पावसात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर सावरगाव, मच्छिंद्रनाथ गड परिसरात देखील मुसळधार पाऊस झाला. गर्भगिरी पर्वतरांगाखालील सर्व तलाव एकाच पावसात ओव्हरफलो झाले आहेत. आष्टी तालुक्यामध्ये गेल्या वर्षीपासून वरुणराजानं मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत दुष्काळ मिटवून टाकला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही तालुक्यात मोठ्या पावसानं सुरुवात झाली आहे.
आष्टी तालुक्यामध्ये रोहिणी नक्षत्र कोरडे गेले, मात्र मृग नक्षत्र सुरु होऊन चार दिवसानंतर तालुक्यातील इतर ठिकाणी रिमझिम पाऊस झाला आहे. तर मच्छिंद्रनाथ गड, सावरगाव शेडगेवाडी या परिसरामध्ये एकच पावसात सर्व तलाव तुडुंब भरले आहेत.
मलकापूर तालुक्यातील देवधाबा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस, अनेकांच्या घरात शिरलं पाणी
रविवारी सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. या पावसानं बुलढाण्याच्या देवधाबा परिसरात नदी नाल्यांना पूर आला होता. यावेळी अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे. काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह व विजांच्या गडगाडाटात आलेल्या पावसानं मात्र शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसह गुरांचीही फजिती झाली आहे. या पावसानं शेतकरी सुखावला असून आगामी काळात पेरणीपूर्व कामांना गती मिळणार आहे.
फुलंब्री तालुक्यातील साताळा इथं अंगावर वीज पडल्यानं दोघांचा मृत्यू
Aurangabad Rain: औरंगाबाद जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान फुलंब्री तालुक्यातील साताळा येथे शेतात काम करणाऱ्या दोघांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कन्नड तालुक्यातील नागद येथे एका झाडाखाली उभा असलेल्या महिलांच्या अंगावर वीज पडल्याने सात महिला आणि एक पुरुष जखमी झाला आहे.























