Maharashtra Monsoon Rain LIVE : अहमदनगर जिल्ह्यात मान्सूनची जोरदार हजेरी, शेतीचं मोठं नुकसान
Maharashtra Monsoon Rain LIVE : मुंबई, उपनगर आणि परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Background
Maharashtra Monsoon Rain LIVE : सर्वांना प्रतिक्षा असलेला मान्सून अखेर मुंबईत दाखल झाला आहे. हवामान विभागानं याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, मुंबई, उपनगर आणि परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
राज्याच्या विविध भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरासह, पुणे, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, परभणी, औरंगाबाद, अहमदनगर, जालना या जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण या पवसामुळं शेतकरी आता खरीपाच्या पेरणीच्या तयारीला लागणार आहेत.
राज्यातील शेतकरी पावसाची वाट बघत होते. अखेर राज्यातील बहुतांश भागात पावसाचं आगमन झालं आहे. त्यामुळं शेतीकामांना वेग आला आहे. पावसाअभावी शेतीची काम खोळंबली होती, त्या कामांना आता वेग आला आला आहे. दरम्यान, 100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीची घाई करु नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दुबार पेरणीची अडचण टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी हा सल्ला दिला आहे.
दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी पेरणीची गाई करु नये
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस जरी होत असला तरीसुद्धा 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय कुठेही शेतकर्यांनी पेरणी करु नये. पेरणीची घाई करु नये असे मत परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी तथा व्यवस्थापन तज्ञ कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे गजानन गडदे व्यक्त केलं आहे. जोपर्यंत शेतामध्ये तीन ते चार इंच ओल निर्माण होत नाही तोपर्यंत पेरणी करणे हे धोकादायक ठरु शकते. दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर येऊ शकतं जे आज परवडणार नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी आत्ताच पेरणीची घाई करु नये असे आवाहन गजानन गडदे यांनी केलं आहे.
पेरणी करताना नेमकी काय काळजी घ्याल?
पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतातील जमिनीची ओल तपासावी. ती ओल जर एक वीतभर गेली असेल तर पेरणी करण्यास काही हरकत नसल्याचा सल्ला हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिला आहे. वितभर ओल गेल्यास पेरणी करायला काही अडचण नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकासन होणार नसल्याचे डख म्हणाले. बियाणे चांगले वापरा, विद्यापीठानं सांगितलेलं बियाणे वापरा असा सल्लाही डख यांनी दिला.
बीडमधील मच्छिंद्रनाथ मुसळधार पाऊस
बीडमधील मच्छिंद्रनाथ मुसळधार पाऊस झाला आहे. आष्टी आणि नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर सावरगाव, मच्छिंद्रनाथ गड परिसरात शनिवारी मुसळधार पावसामुळे गर्भगिरी पर्वतरांगाखालील सर्व तलाव एकाच पावसात ओव्हरफलो झाले आहेत.
आष्टी तालुक्यामध्ये गेल्या वर्षीपासून वरूण राजाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत दुष्काळ मिटवून टाकला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही तालुक्यात मोठ्या पावसाची सुरुवात झाली आहे.
आष्टी तालुक्यामध्ये रोहिणी नक्षत्र कोरडे गेले. मात्र मृग नक्षत्र सुरू होऊन चार दिवस झाल्यानंतर तालुक्यातील इतर ठिकाणी रिमझिम पाऊस झाला आहे. तर मच्छिंद्रनाथ गड, सावरगाव शेडगेवाडी या परिसरामध्ये एकच पावसात सर्व तलाव तुडुंब भरले आहेत.
Aurangabad : जिल्ह्यातील अनेक भागात पावसाला सुरवात
Aurangabad Rain Update: सलग तिसऱ्या दिवशी औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस पडत आहे. चापानेर, महालगांव, कन्नड, आधानेर या ठिकाणी पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना सुद्धा समोर आल्या आहे.























