Maharashtra Breaking News LIVE Updates: आदिवासी क्षेत्रांतील 610 खेड्यांसाठी टेलिकॉम कनेक्टिव्हिटीसाठी निधी जाहीर

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 17 Nov 2021 05:21 PM
आदिवासी क्षेत्रांतील 610 खेड्यांसाठी टेलिकॉम कनेक्टिव्हिटीसाठी निधी जाहीर

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी क्षेत्रांतील 610 खेड्यांसाठी टेलिकॉम कनेक्टिव्हिटीसाठी निधी जाहीर केल्याची माहिती दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ज्यामुळं गडचिरोली 491, नंदूरबार 109, उस्मानाबाद 1, वाशिम 9. या जिल्ह्यांना टेलिकॉम सेवा मिळणार आहे. लवकरच टेंडर प्रक्रिया करून या सेवा सुरू करण्याचे काम सुरू केले जाईल. दुर्गम भागात ज्या ठिकाणी सेवा मिळत नाही, तिथे टेलिकॉम सेवेत दिल्या जातील. टेलिकॉम बेसिक गरज झाल्या आहेत. डेटा कनेक्टिव्हिटी असेल, प्रथम 4जी मिळेल. देशात संपूर्ण सर्वेक्षण केले जाणार आहे. कोणत्याही भाग सेवेपासून वंचित राहणार नाही. टॉवर हे सोलर असेल, डिझेलचा वापर करणार नाही. टेंडर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दीड वर्षांत सर्व टॉवर कार्यान्वित केले जातील.


 

नरेंद्र मोदींना हिंदू हृदयसम्राट म्हणत नाहीत - भास्कर जाधव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिंदू हृदयसम्राट म्हणत नाहीत, असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं आहे. स्वतंत्र्याच्या 75 वर्षांत हिंदू धर्म कधीच धोक्यात नव्हता. पण आज का आहे? असा सवालही जाधव यांनी उपस्थित केलाय. कोरोना काळात भारतीय जनता पार्टीने हैदोस घातला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याना अडचणीत आणणच्या प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या हक्काचे कोट्यावधी रुपये राज्याला दिले नाहीत. निसर्ग चक्रीवादळ,महापूर यावेस भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दौरे केले पण मदत केली नाही. प्रंतप्रधान साधे इकडे फिरकलेही नाहीत.

गैरप्रकार रोखणे आवश्यक, नवाब मलिक यांचं शरद पवारांकडून समर्थनं

भाजपच्या महाविकासआघाडी विरोधातल्या ठरावावर शरद पवार यांनी दिल्लीत खरपूस टीका केली. भाजपच्या राज्य कार्यकारिणीतला कालचा ठराव हा हास्यास्पद असल्याचं मत पवार यांनी व्यक्त केलं. सकाळी वर्तमानपत्रात या बद्दल वाचलं तेव्हा एक जोक ऐकल्याचा आनंद झाल्याची खोचक टीका पवार यांनी व्यक्त केली. अनेक वर्षांपासून भाजपसोबत काम केलेले सहकारी आता आमच्या बाजूला येत आहेत. अधिकारांचा गैरवापर जिथं होत आहे त्याला एक्सपोज करण्याचं काम नवाब मलिक करत आहेत, ही त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर भारत सरकारने तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. गैरप्रकार रोखणे आवश्यक आहे, असं म्हणत शरद पवार यांनी नवाब मलिक यांचं समर्थनं केलं. सीमित कार्य काळाकरता ज्यांना सत्ता मिळाली त्यांनी या सत्तेचा गैरवापर कसा केला हे सगळ्या जनतेने पाहिलं आहे. सत्ता मिळत नसल्याने नैराश्यातून अशा पद्धतीचे आरोप करत आहेत, त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही, असा टोलाही यावेळी शरद पवार यांनी लगावला.


 

रजा अकॅडमी  संघटना पोलिसांच्या रडारवर

मालेगावा शहरात शुक्रवारी झालेल्या दगडफेक प्रकरणी बंद पुकारणाऱ्या रजा अकॅडमी  संघटना पोलिसांच्या रडारवर आली आहे. स्थानिक पाेलिसांनी संघटनेच्या लल्ले चौकातील कार्यालयावर छापा मारीत दाेन तास झडती घेतली.झडतीत बंदचे आवाहन करणारी पत्रके आणि दस्तावेज जप्त केले.पाेलिसांच्या छाप्यामुळे अन्य धार्मिक संघटनाही हादरल्या आहेत. त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ रजा अकॅडमी संघटनेने बंदची हाक दिली हाेती. पाेलिसांनी पंचासमक्ष कार्यालयाचे कुलूप ताेडून झडती घेतली. कार्यालयातील संगणक, रजिस्टर, धार्मिक पुस्तके आदिंसह बंदचे आवाहन करणारी ऊर्दू भाषेतील काही पत्रके पथकाच्या हाती लागली आहेत. यासह एक रजिस्टर आणि काही पुस्तके चाैकशीकामी ताब्यात घेतली आहे

खामगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

खामगाव आगारातील एका एसटी कर्मचाऱ्यानं मंगळवारी रात्री विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विशाल अंबलकर असं या एसटी कर्मचाऱ्याचं नाव असून तो खामगाव आगारात मॅकेनिक म्हणून कामाला आहे. विशालवर खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं समजतेय. विशाल हा अविवाहित असून गेल्या 8 वर्षांपासून एसटीत नोकरीला आहे.

योगानंद शास्त्री यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

नवी दिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश केला आहे.  योगानंद शास्त्री यांनी काँग्रेसमध्ये दोन वेळा मंत्री म्हणून काम पाहिले आहे. नुकतीच दिल्ली काँग्रेसची फेररचना झाली, तेव्हापासून योगानंद शास्त्री काँग्रेसवर नाराज होते. या नाराजीतून योगानंद शास्त्री यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय.


 

ज्यांच्या सभेला परवानगी आहे ते काय कोविड न होणारं जाकीट घालून येतात का? रविकांत तुपकर

144 धारा लागू असतानाही नागपुरात शरद पवार यांच्या सभेला  परवानगी आहे. त्यावर रविकांत तुपकर यांनी नाराजी व्यक्त केली. मोठ्या नेत्यांच्या सभेला परवानगी मिळते, आणि आम्हाला नाही. अमरावती कारण असो किंवा कोविड - ते काय कोविड न होणारे जॅकेट घालून येतात का? असा सवाल तुपकर यांनी उपस्थित केलाय. पोलिसांची परवानगी नसताना रविकांत तुपकर यांनी  नागपुरात संविधान चौकात आंदोलन सुरु केलं आहे.

पॉझिटिव्ह रुग्णाच्या जागी बनावट रुग्ण, सहा जणांच्या विरोधात गुन्हा

औरंगाबाद कोविड पॉझिटिव्ह रुग्णाच्या जागी बनावट रुग्ण पाठवल्याचं प्रकरण. पालिकेच्या तक्रारीनंतर सहा जणांच्या विरोधात गुन्हा .एम सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा. पॉझिटिव्ह असलेले दोन रुग्ण, त्यांच्या जागी उपचार घेण्यासाठी आलेले दोन तरुण आणि या प्रकरणी मध्यस्थी करणारे दोन अशा सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. 4 तरुणांचा शोध सुरू.(2 जण उपचार घेणारे रुग्णल्यात आहेत. या प्रकरणात दोन मध्यस्थ आल्याने अशा प्रकारे बनावट रुग्ण पाठवण्याचे रॅकेट असण्याची दाट शक्यता...

IMD alerts: राज्यात तीन दिवस कोसळधारेचा इशारा

IMD alerts maharashtra rain forecast :  अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यावर पुन्हा एकदा पावसाचं सावट घोंगावत आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. दिवाळीमध्येही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, कमी दाबाचे क्षेत्र समुद्र किनाऱ्यापासून दूर गेल्यामुळे कोकण किनारपट्टीवर त्याचा प्रभाव कमी जाणवला होता. आता पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस वर्तवण्यात येत आहे. 

तेराव्या दिवशी इंधनाच्या किमती स्थिर

सलग तेराव्या दिवशी इंधनाच्या किमती स्थिर असून इंधन दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्ली आणि देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतही इंधनाचे दर स्थिर आहेत... सविस्तर वाचण्यासाठी इथं क्लिक करा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नववा स्मृतीदिन

Balasaheb Thackeray Death Anniversary : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज नववा स्मृतीदिन. या निमित्तानं मुंबईत शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. स्मृतीस्थळावर फुलांची आरास करण्यात आली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी दाखल झाले आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे स्मृतीस्थळावर प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले होते. पण यावर्षी  निर्बंध उठवण्यात आल्यानं शिवसैनिक स्मृतीस्थळावर दाखल झाले आहेत. महाविकास आघाडीचे नेतेही अभिवादनासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. सविस्तर वाचण्यासाठी इथं क्लिक करा

पार्श्वभूमी

अमरावती शहरात चार तासांची संचारबंदीतून शिथिलता
अमरावती शहरात उद्यापासून चार तासांची संचारबंदीतून शिथिलता देण्यात आली आहे. दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानं उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. उद्यापासून शहरातील सर्व बँका उघडणार पण इंटरनेट बंद असल्याने व्यवहार बंद राहण्याची शक्यता आहे.  इंटरनेट सेवा 19 तारखेच्या दुपारी 3 वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती अमरावती पोलिस आयुक्त कार्यालयाने दिली आहे. 


सगळेच मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजत आहेत - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री आहेत पण त्यांना मानायला कुणी तयार नाही. सगळेच मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजत आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होत नाही. गांजा, हर्बल तंबाखू, दंगली, वसुलीवर महाविकास आघाडीचं सरकार चर्चा करत आहे.


नवाब मलिकांचा नवा खुलासा, whatsapp चॅट केलं पोस्ट; म्हणाले काशिफ खानची चौकशी का नाही?
Mumbai Cruise Party : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिका सुरु केली. समीर वानखेडे यांच्या कारवाईवर मलिक यांनी सातत्यानं आक्षेप घेत पुरावे सादर केले. पत्रकार परिषदांमधून मलिकांनी समीर वानखेडे आणि भाजपावर सातत्यानं निशाणा साधलाय. नवाब मलिक यांनी ट्विट करत मंगळवारी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला. नवाब मलिक यांनी के.पी गोसावी आणि एका दिल्लीच्या व्यक्तीच्या संभाषणाचं व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट पोस्ट केलाय. तसेच पुन्हा एकदा काशिफ खान आणि समीर वानखेडे यांच्या संबंधावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. 


ABP Majha Impact : मराठी शाळा वाचवा मोहीम! मराठी भाषा अध्ययन सक्तीने सुरु न करणाऱ्या शाळांवर कारवाई होणार
Marathi School : गेल्या काही दिवसांपासून एबीपी माझानं 'मराठी शाळा वाचवा' ही मोहीम लावून धरली आहे. आता या मोहीमेची दखल शिक्षण विभागानं घेतली आहे. एबीपी माझाच्या मोहिमेनंतर शिक्षण विभागानं परिपत्रक काढून मराठी भाषा अध्ययन आणि अध्यापन सक्तीनं सुरु न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे करण्याबाबत अधिनियम 2020 अंतर्गत सक्तीचा असलेला मराठी विषय शिकवत नसलेल्या शाळांवर कारवाई होणार आहे. एक लाख रुपयांपर्यंत शाळांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच शाळांकडून यासंदर्भात खुलासाही मागितला जाणार आहे. 


दक्षिण मुंबईतील प्रदूषण वाढलं; प्रदूषणाचा निर्देशांक 345 अंकावर
सध्या राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील राज्यांमधल्या प्रदूषणाचा मुद्दा देशभर गाजतोय. प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलंय. मात्र काल, म्हणजे सोमवारी दक्षिण मुंबईतली हवा दिल्लीपेक्षा जास्त प्रदूषित होती.. समुद्रावरुन वाहणारे वारे, वाऱ्याचा मंदावलेला वेग आणि वाहनांमुळं वाढलेलं प्रदूषण. या सगळ्यांचा विपरित परिणाम दक्षिण मुंबईतल्या हवेवर झाला. काल दक्षिण मुंबईतल्या वायू प्रदूषणाचा निर्देशांक ३४५ अंकावर जाऊन पोहोचला होता. तर काल दिल्लीतल्या प्रदूषणाचा निर्देशांक ३३१ अंक इतका होता.  तेव्हा मुंबईची दिल्ली होऊ नये याची जबाबदारी आपल्या सर्वांना घ्यायची आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.