![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Health Department : आरोग्य विभाग भरती प्रक्रिया सुरू; 11 हजार पदांसाठी उद्याच जाहिरात येणार
Nokar Bharati: ठाण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राज्यातील आरोग्य विभागातील भरतीला वेग आला असून मंगळवारी त्यासंबंधित जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं.
![Health Department : आरोग्य विभाग भरती प्रक्रिया सुरू; 11 हजार पदांसाठी उद्याच जाहिरात येणार maharashtra health department recruitment jobs arogya vibhag nokar bharati advertisement latest marathi news update Health Department : आरोग्य विभाग भरती प्रक्रिया सुरू; 11 हजार पदांसाठी उद्याच जाहिरात येणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/bad3aa2e7e1b454768fecc441f12f3dd1673773435989571_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Arogya Vibhag Nokar Bharati : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या आरोग्य विभागातील जवळपास 11 हजार पदांसाठीची जाहिरात उद्या म्हणजे मंगळवारी येणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ही माहिती दिली. ठाण्यात एकाच दिवशी 18 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेला वेग आल्याचं दिसून येतंय.
राज्यातील आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया ही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना या भरती प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. पण काही दिवसांपूर्वी ठाण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरकारने यामध्ये लक्ष घातलं आणि या प्रक्रियेला सुरूवात केली. गेल्या आठवड्यामध्ये ही भरती सुरू होणार असे संकेत देण्यात आले होते. आता त्यासंबंधित जाहिरात मंगळवारी प्रसिद्ध होणार आहे.
'क' आणि 'ड' श्रेणीतील 10,949 जागांसाठी ही जाहिरात निघणार आहे. आरोग्य सेवकांच्या क आणि ड वर्गासाठी होणारी ही भरती एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत केली जाणार आहे. ’क’ वर्गातील 55 प्रकारची विविध पदे, तसेच ‘ड’ वर्गातील 5 प्रकारची विविध पदे भरली जाणार आहेत, अशी एकूण 10 हजार 949 पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे
2011 साली ही भरती प्रक्रिया सुरू असताना पेपर फुटीचा घोटाळा झाला होता, त्यानंतर ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती, आता पुन्हा आरोग्यमंत्री डॉ सावंत यांच्या पुढाकाराने ही भरती पुन्हा सुरु होणार आहे.
गट क' संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर 'गट ड' संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ पदे रिक्त असल्याने त्याचा भार कनिष्ठ अधिकाऱ्यांवर पडत आहे. या कार्यपद्धतीवर अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे ही रखडलेली नोकर भरती पूर्ण करण्यासाठी वेग आलेला पाहायला मिळतंय.
ठाण्यातील रुग्णालयामध्ये 18 रुग्णांचा मृत्यू
ठाणे पालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवसात 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शनिवारी एका रात्रीत 18 जणांचा मृत्यू झाल्याने सर्व स्तरांतून टीका करण्यात येत होती. विरोधकांनीही यावरून प्रशासनाकडे उत्तर मागितलं होतं.
18 रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील हलगर्जीपणा समोर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातच ही धक्कादायक घटना घडली आहे. प्रचंड अनागोंदी, गोंधळ, अपुरी डॉक्टर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे केवळ 10 तासांत 18 जणांनी प्राण गमावले. या रुग्णांचे मृत्यू नेमके कशामुळे झाले, रुग्णालयाच्या प्रशासनाचं दुर्लक्ष झालं का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. त्यामुळे या 18 रुग्णांच्या मृत्यूला नेमकं जबाबदार कोण हे आता तपासानंतर समोर येणार आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)