वीज बिल सवलत योजनेच्या तारखेत वाढ करा, शेतकऱ्यांची महावितरणकडे मागणी
Electricity Bill : शेतकऱ्यांनी 31 मार्चच्या आत वीज बिल भरले तर त्यांना बिलात 30 टक्क्यांची सवलत देण्यात येणार आहे. मात्र, योजनेच्या तारखेत आणखी वाढ करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Electricity Bill : कृषी पंपाचे वीज बिल (Electricity Bill) भरण्यासाठी शेतकऱ्यांना (Farmers) 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. जर शेतकऱ्यांनी 31 मार्चच्या आत वीज बिल भरले तर त्यांना बिलात 30 टक्क्यांची सवलत देण्यात येणार आहे. मात्र, या वीज सवलती योजनेच्या तारखेत आणखी वाढ करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी महावितरणकडे (Mahavitran) केली आहे. कारण 30 टक्के सवलत मिळाल्यानंतर शेतकरी मोठ्या प्रमाणात वीज बिल भरु शकतात असं काही शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता महावितरण या शेतकऱ्यांच्या मागणीवर नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दोनच दिवस घेता येणार लाभ
महावितरणकडून सातत्यानं शेतकऱ्यांना कृषी पंपाचे वीज बिल (Electricity Bill) भरण्याचे आवाहन केले जात आहे. यासाठी महावितरणकडून वीज बिलात सवलत देण्यात येत आहे. 31 मार्चपर्यंत जर शेतकऱ्यांनी कृषी पंपाचे बिल भरले तर शेतकऱ्यांना महावितरणकडून 30 टक्के सवलत देण्यात येत आहे. ही मुदत शेतकऱ्यांना केवळ 31 मार्चपर्यंत मिळणार आहे. म्हणजे आजचा आणि उद्याचा दिवसच या मुदतीचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे.
कृषी पंपाची देयके वेळेत भरुन घ्यावी, महावितरणचं आवाहन
थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरणचे प्रयत्न सुरु आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे वीज बिल थकीत आहे, त्या शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी 30 टक्क्यांची सवलत दिली आहे. त्यामुळं कृषी पंपधारकांनी आपल्या कृषी पंपाची देयके वेळेत भरुन योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे. कृषी धोरण-2020 योजनेनुसार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज आणि विलंब आकारात माफी, तर सुधारित थकबाकीतही 30 टक्के सूट देण्यात आली आहे.
नेमकी काय आहे योजना?
कृषीपंप शेतकऱ्यांसाठी महावितरणच्या वतीनं कृषी धोरण 2020 राबवण्यात येत आहे. मागीलवर्षी ही योजना सुरु झाली होती. तीन वर्षांसाठी राबवण्यात येत असलेल्या या धोरणाचे दुसरे वर्ष आहे. दुसऱ्या वर्षाची मुदत येत्या 31 मार्चला म्हणजे उद्या संपणार आहे. कृषीपंप ग्राहकांसाठी असलेली योजना तीन टप्प्यात राबवली जात आहे. प्रथम वर्षी थकबाकी भरल्यास त्यांना 50 टक्के अतिरिक्त सूट, दुसऱ्या वर्षी भरल्यास 30 टक्के तर तिसऱ्या वर्षी थकबाकी भरल्यास 20 टक्के अतिरिक्त सूट दिली जाणार आहे. विशेष म्हणजे थकबाकी नसणाऱ्या आणि नियमित वीजबिल भरणाचा कृषी ग्राहकांना या योजनेच्या कालावधीत चालू वीज बिलावर अतिरिक्त पाच टक्के सवलत मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांनो! 31 मार्चपर्यंत वीजबिल भरा अन् 30 टक्के सवलत मिळवा! महावितरणची अनोखी योजना
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
