तौक्ते, निसर्गसारख्या वादळांमुळे माशांचे प्रमाण घटले, पालघरमधील स्थानिक मच्छिमार संकटात
पालघर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात समुद्र किनारा लाभला असून पश्चिम किनारपट्टीवरील बरीच गाव मासेमारीवर अवलंबून आहेत. त्यामुळे मासेमारी हा येथील मुख्य व्यवसाय आहे.
पालघर : मागील दोन वर्षात विविध प्रकारची वादळं महाराष्ट्रात येऊन गेली. यामध्ये तौक्ते, निसर्ग या वादळांचा समावेश असून यामुळे समुद्रातील माशांचे प्रमाण कमी झाल्याचं समोर आलं आहे. शिवाय पर्ससीन नेटमुळे मासेमारी केल्याने ही माशांच्या प्रजातीला धोका होत असल्याचं समोर येत आहे. या साऱ्यामुळे पालघरमधील किनारपट्टी भागातील स्थानिक मच्छिमारांवर संकट आलं आहे. माशांचे प्रमाण जवळपास 20 हजार टनने घटल्याचे स्थानिक मच्छीमार सांगत आहेत.
पालघर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात समुद्र किनारा लाभला असून पश्चिम किनारपट्टी वरील बहुतांशी गाव ही मासेमारीवर अवलंबून आहेत. पालघरमध्ये सापडणारे पापलेट, घोळ, सुरमई, रावस हे मासे उत्तम दर्जाचे असल्याने या माशांना सर्वत्र मोठी मागणी आहे. या मासेमारीतून वर्षभरातकोट्यवधींची उलाढाल होते. मात्र मागील दोन वर्षांपासून हवामानातील बदल आणि वारंवार येणारी चक्रीवादळ तसंच इतर मानवनिर्मित संकटामुळे मासेमारीला प्रचंड नुकसान सहन करावं लागत आहे. माशांच्या उत्पादनात प्रचंड घट झाली असून आठ ते दहा दिवस बोट समुद्रात राहून देखील स्थानिक मच्छिमारांना मासे मिळत नाहीत, यामुळे मासेमारी आणि या व्यवसायावर अवलंबून असलेले इतर व्यवसाय संकटात सापडले आहेत.
मच्छिमारांनी व्यक्त केली खंत
पालघर जिल्ह्यातील वसई, नायगाव, अर्नाळा, डहाणू, सातपाटी, मुरबे, दांडी इत्यादी बंदरातून मासेमारी केली जाते. जिल्ह्यातील 71 हजार लोकसंख्या असलेल्या 48 गावं आणि त्यामधील विविध व्यवसाय हे याच मासेमारीवर अवलंबून आहेत. मात्र सध्या इतर वर्षांच्या तुलनेत यावर्षी माशांचे उत्पादन घटल्याने मासेमारीवर होणारा खर्चही निघत नसल्याची खंत मच्छीमार व्यक्त करत आहेत. पूर्वीइतके मासे सध्या खलाशांना ही मिळत नसल्याने काही मच्छिमार मासेमारीकडे पाठ फिरवताना दिसता आहेत. त्यामुळे लाखो रुपये खर्चून तयार केलेल्या गोष्टी सध्या समुद्र किनार्यावरच दिसून येत आहेत. त्यातच नेहमी माशांच्या बाजारपेठेने वर्दळ असलेली मच्छी मार्केट ही रिकामे दिसत आहे.
हे ही वाचा
- हजारो किलोमीटरचे अंतर पार करत अमूर ससाणा पालघर मध्ये दाखल; पक्षीप्रेमींसाठी पर्वणी
- ठाणे, पालघर इथं जेट्टी उभारण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, लोकहितासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा : हायकोर्ट
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
महत्त्वाच्या बातम्या






















