मोठी बातमी : ओला दुष्काळाच्या सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना थेट मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
राज्यात गेल्या काही दिवसांत अतिवृष्टी झाली आहे, यासंदर्भात आढावा घेतला असून 60 लाख हेक्टरवरती नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मुंबई : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांत झालेल्या (Rain) मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे (Farmers) अतोनात नुकसान झालं आहे. त्यात, मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, संभाजीनगर जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली असून मोठा फटका शेतकऱ्यांना बसल्याचं दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ बैठकीत काही निर्णय होणार का, याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा पूर्ण प्रयत्न राहिल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जाहीर केले. तसेच, मॅन्यूअलमध्ये ओला दुष्काळ ही संकल्पनाच नाही, तरीही दुष्काळाच्या सर्व सवलती लागू केल्या जातील असे म्हणत एकप्रकारे ओला दुष्काळच जाहीर करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस म्हणाले की, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांत अतिवृष्टी झाली आहे, यासंदर्भात आढावा घेतला असून 60 लाख हेक्टरवरती नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यासाठी, पहिल्या टप्प्यात आपण 2115 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरीत करण्याची कामे सुरू झाले आहेत. काही ठिकाणी पाणी असल्यामुळे योग्य प्रकारचा असेसमेंट घेता येत नव्हतं आणि म्हणून त्यांना अधिकचा वेळ आपण दिलाय पुढच्या दोन-तीन दिवसात ही सगळी माहिती पोहोचेल त्यानंतर शेतकऱ्यांना करावयाची मदत असेल. जसं की खरडून गेलेली जमीन आहे, त्याच्याकरता करायची मदत असेल विहिरींच्या संदर्भात करायची मदत असेल, घरांच्या संदर्भातली मदत असेल, तातडीची मदत जी आपण सुरू केली आहे, त्या संदर्भातले निर्णय असतील. वेगवेगळ्या प्रकारे ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे, त्या सगळ्या नुकसानाच्या संदर्भात एक कॉम्प्रिएनसीव पॉलिसी तयार करून आणि ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यामध्ये घोषणा आम्ही करून आणि शक्यतो शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये ही मदत मिळाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दुसरं महत्त्वाचं म्हणजे, मंत्रिमंडळाने काही निर्णय घेतलेले आहेत. त्यामध्ये, सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही. आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही तथापि आम्ही हा निर्णय घेतला की, ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना, सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. त्यामुळे, जी काही मागणी होती की त्यावेळच्या सवलती लागू झाल्या पाहिजेत किंवा ओला दुष्काळ जाहीर करायचा अर्थ असतो की त्या सवलती लागू करा, तशा सगळ्या सवलती या लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. आता ही सगळी नुकसानाची आकडेवारी जमा होते की पूर्ण जमा पुढच्या दोन-तीन-चार दिवसात होईल. जसं मी सांगितलं लवकरात लवकर, पण कुठल्याही परिस्थितीत पुढच्या आठवड्याच्या आत आपल्याला या संदर्भातली संदर्भातला निर्णय घेणार आहोत आणि त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले.
कर्करोगावर मोफत उपचारासाठी योजना
राज्याच्या मंत्रिमंडळाने आज अजून काही महत्त्वपूर्ण या ठिकाणी निर्णय केलेले आहेत. ज्याच्यामध्ये राज्याची एक सर्वंकष कॅन्सर सेवा पॉलिसी कॉम्पियन्स कॅन्सर केअर पॉलिसी आपण तयार केलेली आहे. या कॅन्सर केअर पॉलिसीच्या माध्यमातून राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांना कॅन्सरच्या उपचार हा उपलब्ध राहिला पाहिजे अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे. यात सेंटर आणि एल थ्री सेंटरचं जाळ आपण तयार करत आहोत, जेणेकरून कोणालाही कॅन्सरसारख्या या बिमारीची ट्रीटमेंट मिळण्याकरता त्यांच्या जिल्ह्यामध्येच जवळपास महत्त्वाच्या गोष्टी उपलब्ध असतील, काहींना काही गोष्टींकरिता सेंटरला काही ठिकाणी जावं लागेल. पण, याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात कॅन्सरचे जे रोगनिदान आहे, त्याच्यावर उपचार आहेत. त्याची सुलभता आणि त्याची कॉस्ट कमी करणे हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.



















