भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा, राष्ट्र प्रथम मंत्रासह विस्तार, रविंद्र चव्हाणांकडून गौरवशाली प्रवासाचा आढावा
BJP Foundation Day : भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पक्षाच्या 46 वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेत ‘राष्ट्र प्रथम’ विचारधारेचा पुनरुच्चार केला.

मुंबई : भारतीय जनता पक्षाने 6 एप्रिल रोडी 47 व्या वर्षात पदार्पण केलं. 6 एप्रिल 1980 रोजी स्थापन झालेल्या पक्षाने 46 वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. या निमित्ताने भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एक्स पोस्टद्वारे पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेत कार्यकर्त्यांच्या योगदानाचा गौरव केला.
रवींद्र चव्हाण यांनी नमूद केलं की, विचारधारेच्या भक्कम मुळांवर उभा असलेला आणि कार्यकर्त्यांच्या संघर्षातून घडलेला भाजप आज विशाल वटवृक्ष बनला आहे. 6 एप्रिल 1980 रोजी रोवलेलं बीज आज 25 कोटींहून अधिक कार्यकर्त्यांच्या मेहनतीने देशभर विस्तारलं आहे.
सामान्य कार्यकर्त्यापासून नेतृत्वापर्यंतचा प्रवास
रवींद्र चव्हाण यांनी आपल्या प्रवासाचा उल्लेख करत सांगितलं की, सामान्य कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष हा प्रवास केवळ भाजपसारख्या संघटनेतच शक्य आहे. भाजयुमो उपाध्यक्ष, नगरसेवक, आमदार, मंत्री आणि आता प्रदेशाध्यक्ष असा प्रवास करताना पक्षाच्या विचारधारेने कार्यकर्ते घडवले, तर कार्यकर्त्यांनीही पक्ष घडवला, असं त्यांनी म्हटलं.
जनसंघाच्या काळात श्यामा प्रसाद मुखर्जी, दीन दयाळ उपाध्याय आणि अटल बिहारी वाजपेयी यांसारख्या नेत्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन बहुसंख्य समाजाला केंद्रस्थानी ठेवण्याचं काम केलं. त्यांची दूरदृष्टी आजही मार्गदर्शक असल्याचं चव्हाण यांनी नमूद केलं.
महाराष्ट्रातील भाजपच्या प्रवासात उत्तमराव पाटील, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांसारख्या नेत्यांचं मोठं योगदान राहिलं आहे. या नेत्यांनी संघटना तळागाळात नेऊन मजबूत केली, असं त्यांनी सांगितलं.
जातीय राजकारणाला उत्तर
भाजपवर कधी ‘शेटजी-भटजी’ पक्ष अशी टीका झाली होती. मात्र गेल्या 46 वर्षांत महाराष्ट्रात 11 बहुजन समाजातील प्रदेशाध्यक्ष देत भाजपने त्या टीकेला उत्तर दिलं आहे. पक्षाने समाजातील सर्व घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं असल्याचं चव्हाण यांनी नमूद केलं.
भाजप ही केवळ निवडणूक लढवणारी संघटना नसून विचारधारेवर उभी असलेली चळवळ आहे. ‘भारतीयत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व’ हा विचार तळागाळात पोहोचवण्यात पक्ष यशस्वी ठरला आहे. ‘राष्ट्र प्रथम’ हीच पक्षाची मूलभूत भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं लक्ष्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. यात महाराष्ट्राचा 1 ट्रिलियन डॉलरचा वाटा सुनिश्चित करण्यावर भर दिला जात आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं हे कार्यकर्त्यांचं कर्तव्य असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. ‘अंत्योदय’च्या भावनेतून काम केल्यासच ‘विकसित भारत’चं स्वप्न पूर्ण होईल, असंही त्यांनी शेवटी नमूद केलं.






















