एक्स्प्लोर

शिवसेना, भाजपमधलं 'गांजा पुराण' सुरुच, शिवसेनेच्या अग्रलेखाला तरुण भारतमधून उत्तर; ठाकरे, पवार, राऊतांवर टीकास्त्र

Tarun Bharat Editorial : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. सामनाने या टीकेचे उत्तर कमी प्रतीचा गांजा, असा अग्रलेख लिहत उपहास करत दिलं होतं.

Tarun Bharat Editorial : शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये सध्या गांजावरून जुंपलीय. भाजप नेत्याच्या टीकेनंतर 'कमी प्रतीचा गांजा', असा अग्रलेख लिहून सामनातून हल्ला चढवल्यानंतर आता भाजपचं मुखपत्र असलेल्या तरुण भारतमधून 'गांजा कुणी कुणी ओढला?' या शीर्षकाखाली अग्रलेख लिहून उत्तर देण्यात आलं आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. सामनाने या टीकेचे उत्तर कमी प्रतीचा गांजा, असा अग्रलेख लिहत उपहास करत दिलं. आता या अग्रलेखला आज तरुण भारताच्या अग्रलेखातून उत्तर मिळालं आहे. गांजा कोणी कोणी ओढला? या अग्रलेखातून तरुण भारतनं शिवसेनेवर तोफ डागली आहे. 

तरुण भारत हे संघ विचारधारेचे वर्तमानपत्र भाजपाच्या मदतीला धावून आलं असून तरुण भारतनं खास शिवसेना आणि महाविकास आघाडीवर 'गांजा कोणी कोणी ओढला?' असा अग्रलेख लिहत जबरदस्त हल्लाबोल केला आहे. सामनाचा रोख तर फक्त सध्याच्या घडामोडींवर होता. पण तरुण भारतनं तर महाविकास आघाडीच्या सुरुवातीपासूनच घडलेले बरेच घटनाक्रमवर, मंत्र्यांवर, नेत्यांवर गांजा कोणी कोणी घेतला? हे म्हणत हल्लाबोल केला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि संजय राऊत यांच्यावरही टीकास्त्र डागण्यात आलं आहे. 

तरुण भारतचा अग्रलेख : गांजा कुणी कुणी ओढला?

संविधान, लोकशाही आणि कायदा जणू आपणच पाळतो, अशा आविर्भावात अलीकडे काही लोक वागू लागले आहेत. ज्यांना चटके बसले, तेच आज आरोप करताना पाहून तर अधिकच हसू येते. शरद पवारांकडे विधानसभेत पूर्ण बहुमत होते. पण, केवळ आलिया मना म्हणून 17 फेब्रुवारी 1980 रोजी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. सातत्याने रडगाणे गाण्याऐवजी पक्षप्रमुखांनी राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी झटले पाहिजे. परंतु, दुर्दैवाने ते केंद्र सरकारविरुद्ध ओरड करतात आणि स्वत:ची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतात. हा अनुभव आपण सगळेच दररोज घेत आहोत. अतिवृष्टीमुळे राज्यात शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. या शेतक-याला तातडीने मदत देऊन त्याचे मनोबल वाढविण्याची आवश्यकता असताना राज्यातील सत्ताधारी केंद्राकडे बोट दाखवून बेजबाबदारपणे वागत आहेत. 'खासदार संपादक' असलेला नेता सल्ला देतो. वायफळ बडबड करतो आणि पक्षप्रमुख त्यांचीच री ओढतात, हे योग्य नाही.
 
शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, ही बाब मान्य केली तरी जनतेने नाकारल्यानंतरही त्यांचा पक्ष नीतिमत्ता गुंडाळून ठेवत सत्तेवर आला आहे, याचा पवारांना सोयीस्कर विसर पडला आहे. देवेंद्र फडणवीसांबाबत काहीही बोलण्याचा नैतिक अधिकार शरद पवारांना नाही. एवढी वर्षे सत्तेत राहूनही त्यांना सत्तेचा मोह आवरत नाही, हे त्यांच्या वागण्या-बोलण्यावरून स्पष्ट झाले आहे. भारतात आजवर किमान १२० वेळा विविध राज्यांतील सरकारे केवळ केंद्रातील सरकारच्या मनात आले म्हणून बरखास्त करण्यात आली. क्षणोक्षणी लोकशाहीचे मुडदे पाडणा-यांनी जेव्हा असे आरोप करायचे चालविलेले असते, तेव्हाच मनात प्रश्न येतो; ‘गांजा कुणी कुणी ओढला?'
 
आता अनेकांना गांज्याच्या गुणवत्तेचाही अभ्यास झालेला आहे. आम्हाला तो नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करता येणार नाही. पण, एक मात्र नक्की की, विरोधकांचे ‘दम मारो दम' हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विजयादशमीच्या भाषणामुळे खचितच नव्हते. कारण ते भाषण तर नव्या बाटलीतील जुनी दारू याच शैलीतील होते. एक मात्र नक्की, जेव्हा मुख्यमंत्री म्हणतात की, वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री झालो आणि दुस-याच दिवशी शरद पवार सांगतात की, त्यांना मुख्यमंत्री व्हायचेच नव्हते; मीच बळजबरीने हात वर केला... तेव्हा गांजा न ओढताही आपोआपच नशा चढते. आता या दोघांपैकी कोण खरे बोलतो आहे, याचे उत्तर मिळायलाच हवे. उद्धव ठाकरेंना वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे होते, तर एक सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री का झाला नाही, हा प्रश्न जेव्हा विचारला जातो, तेव्हा लोकशाही रक्षणाच्या नावाने गळा काढणारेच म्हणतात, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील हे प्रश्न विचारणारे कोण? अरे बाबा, एक विरोधी पक्षनेते आणि दुसरे एका राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी नाही तर कुणी हे प्रश्न विचारायचे? अशावेळी मनात पुन्हा प्रश्न येतो की, ‘गांजा कुणी कुणी ओढला?'
 
केंद्रीय संस्थांच्या कारवायांवर यांचा कायम आक्षेप आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जेव्हा म्हणतात की, या सरकारच्या मंत्र्यांकडे वसुलीचे सॉफ्टवेअर आहे, तेव्हा ते हवेत तीर मारणारे नेते नाहीत. अतिशय जपून ते शब्द वापरतात आणि जोवर हाती पुरावा येत नाही, तोवर हे बोलत नाहीत. दररोज सकाळी निव्वळ शब्दांची फेकाफेकी करणारे ते नेते नाहीत. आम्ही त्यांना ओळखतो. त्यामुळे हे सॉफ्टवेअर लवकरच महाराष्ट्रातील नागरिकांपुढे येईल आणि त्या मंत्र्यांचेही नाव कळेल, याची आम्हाला आणि महाराष्ट्रालाही खात्री आहे. ईडीच्या केसेस ज्या-ज्या नेत्यांविरोधात आहेत, ते थेट आपली बँक खाती आणि सारी कागदपत्रे घेऊन ईडीच्या कार्यालयात धडक का देत नाहीत? उगाच जर ईडी त्यांना त्रास देते आहे, तर खा. भावना गवळी, अनिल परब, अनिल देशमुख यांनी एकत्रित येऊन ईडीच्या कार्यालयात जावे आणि 'दूध का दूध, पानी का पानी' करून यावे. असे केल्याने त्यांचे स्वच्छ चारित्र्य आणि निर्दोषित्व आपोआपच सिद्ध होईल. केंद्र सरकार यंत्रणांचा गैरवापर करतेय्, हेही सिद्ध होईल. पण, असे न करता केवळ रडत बसले की, आम्हाला पुन्हा प्रश्न पडतो की, 'गांजा कुणी कुणी ओढला?'
 
या राज्यातील मंत्री एखाद्या कार्यकत्र्याला बेदम मारहाण करतात आणि दीड वर्षांनी त्यांना लोकशाही मूल्यांचे पालन करीत अटक होते. पण, अटक कशी तर जामिनाची कागदपत्रे हातात घेऊनच! फार कुठे त्याच्या बातम्याही होत नाहीत. दुसरे मंत्री भाजपाच्या कार्यकत्र्यांचा ऊससुद्धा खरेदी करीत नाही. एक मंत्री तर म्हणतात की, दोन-तीन ग्रॅम गांजा असेल तर कारवाई करायची गरज नाही. आम्हाला काही वाचकांकडून विचारणा झाली की, मोठ्ठी घरफोडी केली आणि लाखोंचा ऐवज न नेता केवळ काही हजारांचीच चोरी केली तर घरफोडीचा गुन्हा दाखल होणार नाही का? आता अशा प्रश्नांची उत्तरं वकीलच देऊ शकतात. पण, आमच्या मनात पुन्हा प्रश्न येतो, ‘गांजा कुणी कुणी ओढला?'
 
भाजपा हा उप-यांचा पक्ष आहे, असा आरोप झाल्यापासून भाजपामधील अनेकांच्या मनात धडकी भरली आहे म्हणे. भाजपाच्या अनेक नेत्यांनी याबाबत उदय सामंत, शंकरराव गडाख, अब्दुल सत्तार, प्रियांका चतुर्वेदी, उर्मिला मातोंडकर, भास्कर जाधव, श्रीनिवास वनगा या शिवसेनेच्या नेत्यांशी सल्लामसलत केली आहे म्हणतात. या सर्व नेत्यांनी भाजपा नेत्यांशी बोलण्यास सपशेल नकार दिला. पण, ‘उप-या' या उपाधीने ते अस्वस्थ झाले असल्याची माहिती आहे. 'मैं भी चौकीदार'च्या धर्तीवर ही सारी मंडळी आपल्या ट्विटर हँडलवर 'आम्ही सारे उपरे,' अशी मोहीम चालविण्याच्या बेतात होती, अशीसुद्धा माहिती आहे. तेव्हा आमच्या मनात प्रश्न येतो, ‘गांजा कुणी कुणी ओढला?'
 
प्राप्तिकर विभागाने एक नव्हे तर दोन प्रसिद्धीपत्रकं जाहीर केलीत. पहिल्यात १०५० कोटींचा उलगडा होतोय्, तर दुसरीत १८४ कोटींचा. त्यावर मात्र कुणीच काही बोलत नाही. विजयादशमीच्या भाषणात यावरही ऊहापोह होईल, अशी अपेक्षा होती. पण, ती भाबडी ठरली. सर्व आघाड्यांवर अंधार असताना इतक्या चांगल्या कल्पना सुचतात तरी कशा? म्हणतात की, एक आण्याचा गांजा मारला की, भरपूर कल्पना सुचतात, असे लोकमान्य एकदा उपहासाने बोलले होते. आता इतक्या अफलातून कल्पना सुचण्यासाठी किती आण्यांचा गांजा मारला गेला असेल, असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे. खरे तर केवळ आणि केवळ विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांकडूनच महाराष्ट्राच्या जनतेला आता केवळ अपेक्षा उरल्या आहेत. वारंवारच्या आपत्तीनंतर सरकार किती भक्कम पाठीशी उभे राहते, हेही जनतेला पुरते कळून चुकले आहे. त्यामुळे लोकांनी आस सोडून दिली आहे. या सरकारच्या आयुष्याची दोरी जनतेच्या हाती यायला निवडणुकांची वाट पाहावी लागेल. इतक्यात निवडणुका होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे सध्या तरी सरकारची दोरी भक्कम आहे. पण, सामान्य माणसाला न्याय द्यायचा असेल तर विरोधी पक्षाकडून ही दोरी भक्कमपणे ओढणे अपेक्षित आहे. गांजा, चरस घेणे हा काही गुन्हा नाही, असे एका आघाडीच्या निर्मात्याने सांगितले आहे. हेच ते लोक आहेत, जे या सरकारसाठी आवर्जून ट्विट करतात आणि सरकारच्या मदतीला धावतात. तेव्हा आम्हाला पुन्हा प्रश्न पडतो, 'खरंच, गांजा कुणी कुणी ओढला?'
 
आमच्या विदर्भाने देशाला राष्ट्रसंत दिले. त्यांची शिकवण आमच्यासाठी सर्वोच्च आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात,
ऐ मानव सुनले बात, व्यसन को छोड दे सारे,
तेरा और बढेगा नाम, प्यारे कर नेकी से काम,
शराब, गांजा पीकर किसने, जीवन सफल बनाया?
लाखो का बिगडा थाट, उतर गये यमराजा के घाट
याच ओवींमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लाखमोलाचा प्रश्न विचारतात. ते म्हणतात, 'तू होगा आखिर चोर, कहके क्या होगा शिरजोर?'
कोरोनानंतर आज महाराष्ट्रात गांजाची प्रत ओळखण्याइतका वेळ कुणाकडेही नाही. शेतक-यांना किती मदत दिली? बारा बलुतेदारांना काय मदत झाली? परतीच्या पावसानेही थैमान घातले; त्यांच्यासाठी आपण काय केले? हेक्टरी ५० हजारांचे काय झाले, हे शेतकरीच विचारताहेत. लोकांना विकास हवा आहे. अन्यथा आज आम्हाला प्रश्न पडतोय, उद्या संपूर्ण महाराष्ट्र हाच प्रश्न विचारेल, 'गांजा कुणी कुणी ओढला?'

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Maharashtra Lavani : अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Embed widget