![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Majha Katta : तृतीयपंथीयांचा कोर्टातला लढा सोपा आहे, समाजासोबत लढणं अवघड आहे; काय म्हणाल्या श्रीगौरी सावंत?
Shree Gauri Sawant On Majha Katta : तृतीयपंथीयांच्या अधिकारांसबंधी न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे महाराष्ट्र सरकार पालन करत नसल्याने हा न्यायालयाचा अवमान असल्याचं श्रीगौरी सावंत यांनी सांगितलं.
![Majha Katta : तृतीयपंथीयांचा कोर्टातला लढा सोपा आहे, समाजासोबत लढणं अवघड आहे; काय म्हणाल्या श्रीगौरी सावंत? abp majha katta shree gauri sawant on supreme court guidlines about lgbtq third gender rights taali marathi news Majha Katta : तृतीयपंथीयांचा कोर्टातला लढा सोपा आहे, समाजासोबत लढणं अवघड आहे; काय म्हणाल्या श्रीगौरी सावंत?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/09/0a3b2508e01e875ebd79b1d1052bd8dd169428147360993_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shreegauri Sawant On Majha Katta : तृतीयपंथीयांच्या हक्कासाठीचा कोर्टातला लढा हा तुलनेने सोपा आहे, पण समाजासोबत लढणे हे अवघड आहे. कायद्याच्या आधारे का असेना आता तृतीयपंथीयांना त्यांचे अधिकार मिळत आहेत असं समाजसेविका श्रीगौरी सावंत म्हणाल्या. एक दिवस असा येईल की समाज आम्हाला माणूस म्हणून स्वीकारले असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. माझ्या लेकरांची आई म्हणून माझी ओळख कायम राहावी अशी इच्छा असल्याचं श्रीगौरी सावंत म्हणाल्या. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात त्यांनी तृतीयपंथीयांच्या आयुष्यात असलेली आव्हानं आणि समाज त्यांच्याकडे कोणत्या नजरेने पाहतो यावर संवाद साधला.
उदरनिर्वाहाचं साधन असताना भीक का मागू?
मला बाई व्हायचं होतं मग त्याबद्दतीने वागायला लागले. शरीरावरून नव्हे तर मनातून हे झालं पाहिजे हे मला समजलं असं श्रीगौरी सावंत यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या की, "हमसफर या एलजीबीटीक्यू संस्थेसाठी मी काम करायला सुरू केलं. वेश्या व्यवसाय ज्या ठिकाणी सुरू असायचा त्या ठिकाणी कंडोम वाटायचे आणि त्या ठिकाणी आरोग्यविषयक शिबीरं घेण्याचं काम करू लागले. त्यावेळी या कामाचे मला महिन्याला दीड हजार रुपये मिळायचे. उदरनिर्वाहाचं साधन मिळाल्यानंतर भीक का मागायचं."
ब्रिटिशांच्या काळात आम्ही गुन्हेगार ठरलो
2002 मध्ये मी सर्वोच्च न्यायालयाच याचिका दाखल केली. तृतीयपंथीयांना त्यांचे अधिकार, त्यांची ओळख मिळावी अशी मागणी मी केली. त्यावेळी माझ्या समाजानेही माझ्या विरोधात भूमिका घेतली असं श्रीगौरी सावंत यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या की, "तृतीयपंथियांच्या इतिहास हा सिग्नलवर भीक मागणे किंवा वेश्या व्यवसाय करणे असा नाही. त्याचा इतिहास हा मोठा आहे. ब्रिटिशांच्या काळात कलम 377 आणलं गेलं. त्याच्या आधी आम्हाला राजाश्रय होता, आम्हाला मान होता. ब्रिटिशांनी आम्हाला गुन्हेगार ठरवलं आणि मग त्यानंतर आमचा समाज हा भीक मागू लागला आणि शरीर विक्री करू लागला."
ताली या वेब सीरिजबद्दल बोलताना श्रीगौरी सावंत म्हणाल्या की, सुश्मिता सेन यांनी ही भूमिका केल्याबद्दल मला खूप आनंद झाला. तुम्ही ही भूमिका का करता असा प्रश्न विचारल्यानंतर सुश्मिता म्हणाली की, तू आई आहेस म्हणून मी ही भूमिका करतेय. ताप आलेला असतानाही तिने पावसामध्ये सीन केला.
महाराष्ट्र सरकारने न्यायालयाचा अवमान केला
तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी कायदेशीर लढा देत असल्याचं सांगताना श्रीगौरी सावंत म्हणाल्या की, "पोलिस भरतीमध्ये मी अनेक तृतीयपंथीयांना तयार केलं, 70 तृतीयपंथीय पोलिस भरतीमध्ये पास झाले. पण अद्याप त्यांना नियुक्ती मिळाली नाही, त्यासाठी मॅटमध्ये जावं लागलंय. सर्वोच्च न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला असला तरी राज्य सरकार त्याची अंमलबजावणी करत नाही आणि न्यायालयाचा हा अवमान आहे. पोलिस भरतीमध्ये पास झालेल्या काही तृतीयपंथीयांनी आता पुन्हा भीक मागावं लागतंय, याला जबाबदार कोण?"
झारखंडमध्ये तृतीयपंथीयांना ओबीसी समाजात स्थान देण्यात आलं आहे, पण महाराष्ट्र एवढा पुरोगामी असतानाही या राज्यात आम्हाला स्वीकारलं जात नाही. राज्य सरकार न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करत नाही हे दुर्दैव असल्याचं श्रीगौरी सावंत म्हणाल्या.
वडील वारल्यानंतर आठ दिवसांनी सांगण्यात आलं
वडील वारल्यानंतर मला एका नातेवाईक असलेल्या भावाने आठ दिवसांनी ते समजलं, त्यावेळी मला खूप वाईट वाटलं असं श्रीगौरी सावंत यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या की, "वडिलांचे अंतिम दर्शन करता आलं नाही याचं वाईट वाटलं. आयुष्याच्या शेवटच्या दिवशी वडिलांना अनाथ आश्रमात घालवावं लागलं हे दुर्दैव आहे. हे सर्व माझ्या भावाने आणि बहिणीने केवळ संपत्तीसाठी केलं. गौरी सावंत हिला जर या गोष्टी भोगाव्या लागत असतील तर सर्वसामान्य तृतीयपंथीयांना काय सहन करावं लागत असेल याचा विचार करा."
आपण जर कुणावर निस्वार्थीपणे प्रेम करू शकलो तर ते मातृत्व आहे, त्यासाठी गर्भाशय असण्याचं गरज नाही असं श्रीगौरी सावंत म्हणाल्या. तृतीयपंथीयांना संधी दिल्यास ते चांगले काम करू दाखवतात असं श्रीगौरी सावंत म्हणाल्या.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)