![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
एका गायीसाठी दंगली उसळतात, पण 52 गायींच्या मृत्यूनंतर 'रेडा'प्रेमी सरकार अश्रू ढाळत नाही, हिंदुत्वाचे सोंग आणि ढोंग म्हणायचे ते यालाच; 'सामना'तून हल्लाबोल
सुमंगलम लोकोत्सवात विषबाधा होऊन 52 गायींचा मृत्यू झाल्यानंतर सामनातून कडाडून हल्लाबोल करण्यात आला आहे. कोल्हापुरातील 52 गोमातांना आम्ही श्रद्धांजली वाहत आहोत, असेही अग्रलेखातून म्हटले आहे.
![एका गायीसाठी दंगली उसळतात, पण 52 गायींच्या मृत्यूनंतर 'रेडा'प्रेमी सरकार अश्रू ढाळत नाही, हिंदुत्वाचे सोंग आणि ढोंग म्हणायचे ते यालाच; 'सामना'तून हल्लाबोल in Sumangalam Lokotsav 52 cow died sanjay raut sharp attack on shinde fadnavis goverment kaneri math kolhapur एका गायीसाठी दंगली उसळतात, पण 52 गायींच्या मृत्यूनंतर 'रेडा'प्रेमी सरकार अश्रू ढाळत नाही, हिंदुत्वाचे सोंग आणि ढोंग म्हणायचे ते यालाच; 'सामना'तून हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/27/6dc4fc7515a3b69a8a724c88e4cf05371677473641501444_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sanjay Raut : कणेरी मठावर (Kaneri Math) सुमंगल लोकोत्सवात (Sumangalam Lokotsav) विषबाधा होऊन 52 गायींचा मृत्यू झाल्यानंतर सामनातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. पालघरमधील साधूकांड हे जर हिंदुत्वाचे हत्याकांड ठरवले जात असेल, तर कोल्हापुरातील 52 गोमातांचा मृत्यू सुद्धा हिंदुत्वाला वगैरे धोकादायक मानावा लागेल, असे सामनातून म्हटले आहे. कणेरी मठास घटनाबाह्य सरकारचे पाय लागतात काय आणि विषबाधेचे निमित्त ठरुन पन्नासवर गायींचा मृत्यू होतो काय हे अनाकलनीय आहे. कणेरी मठातील गायींचे सामूदायिक आत्मार्पण हा चिंतेचा विषय आहे. एका गायीसाठी दंगली उसळतात, घडवल्या जातात, पण 52 गायींच्या संशयास्पद मृत्यूनंतरही 'रेडा'प्रेमी सरकार अश्रू ढाळायला तयार नाही, हिंदुत्वाचे सोंग आणि ढोंग म्हणायचे ते यालाच. कोल्हापुरातील 52 गोमातांना आम्ही श्रद्धांजली वाहत आहोत, असेही अग्रलेखातून म्हटले आहे.
अग्रलेखात काय म्हटले आहे?
गायींना गोमाता म्हणाणाऱ्यांचे राज्य सध्या महाराष्ट्रात व केंद्रात सुरु आहे. त्यामुळे माणसांपेक्षा गायींना सर्वाधिक संरक्षण मिळत असेल असा समज होता. अशा परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठातील 52 गायींचा मृत्यू संशयास्पदरित्या झाला, तर आणखी पन्नासेक गायी गंभीर आहेत. गायींच्या मृत्यूने संपूर्ण कोल्हापुरात खळबळ माजली हे खरेच, पण राज्यातही हळहळ निर्माण झाली. गायींशी सगळ्यांचीच एक भावनिक नाते असल्याने हळहळ तर वाटणारच. कणेरी मठात पंचमहाभूत सुमंगलम लोकोत्सव सुरु आहे. या लोकोत्सवात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मंत्री येऊन गेले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही मठात आले आणि सर्व मंडळी येऊन गेल्यावर मठातील गायींनी प्राणत्याग केला.
सध्या महाराष्ट्रावर सध्या संकटाचे काळेकुट्ट ढग स्पष्टपणे दिसत आहेत. गुवाहाटीतील रेडा बळीपासून महाराष्ट्रात तर इतर बळी प्रयोग करुन राजकीय यशाचा मार्ग शोधणारे सध्याचे सरकार आहे. म्हणून कणेरी मठातील 52 गायींच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी असे आहे. पालघरमधील साधूकांड हे जर हिंदुत्वाचे हत्याकांड ठरवले जात असेल, तर कोल्हापुरातील 52 गोमातांचा मृत्यू सुद्धा हिंदुत्वाला वगैरे कादायक मानावा लागेल. कारण गाईंचे मृत्यू नैसर्गिक नसून विषबाधामुळे झाल्याचे उघड झाले आहे हा एक दुर्दैवी अपघात आहे आणि कोणाच्यातरी अज्ञानातून विषबाधेचे प्रकरण घडले असे मठाचे अधिपती काडसिद्धेश्वर स्वामी सांगतात.
मठात असंख्य गायी आहेत आणि गायीचे पालन पोषण तिथे केले जाते. आतापर्यंत गायींचा अशाप्रकारे सामुदायिक मृत्यू झाल्याची घटना कधी घडल्याचे स्मरत नाही. मग राज्यात पाप मार्गाने सरकार आले आणि त्या पापी सरकारचे मुख्यमंत्री व मुख्यमंत्री मठातील गोशाळेत जाऊन आल्यावरच गायीने प्राण सोडावा या दुर्दैवास काय म्हणावे? शिळ्या अन्नामुळे विषबाधा झाली आणि गायींनी जगाचा निरोप घेतला. मग गाईस चारापाण्याऐवजी शिळेपाके घालणारे कोण हा प्रश्न आहे? शिवाय या घटनेचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना व मठाच्या स्वयंसेवकांकडून आधी मनाई केली गेली, नंतर मारहाण करण्यात आली. अनेक माध्यम प्रतिनिधींना धमक्या देण्यात आल्या. आता या संदर्भात कणेरी मठातर्फे दिलगिरी वगैरे व्यक्त करण्यात आली असली तरी मठातील कार्यकर्त्यांची वर्तणूक चव्हाट्यावर यायची ती आलीच.
हल्ली दिल्लीपासून गल्लीपर्यंत पत्रकारापासून टीकाकारापर्यंत सगळ्यांची मुस्कटदाबी सुरु आहे. पुन्हा एरवी गोमातांबद्दल जरा काही खट्ट झालं की रस्त्यावर उतरणारे कथित हिंदुत्ववादी गोरक्षक कोल्हापुरात गोमातांचा असा सामुदायिक संहार होऊनही गप्पच कसे आहेत? या संदर्भात एखादा 'हिंदू आक्रोश मोर्चा' का निघाला नाही? संपूर्ण देशात गोमांस खाणे हा अपराध ठरला आहे. गोहवंशहत्याबंदीचा कायदाच केला गेला आहे, पण 52 गोमातांचा संशयास्पद मृत्यू हा प्रकार काही गोवंशहत्येत मोडत नाही व भाजपमध्ये मिंधे गटातील बाटग्या हिंदूंचे रक्तही त्यामुळे सळसळत नाही.
हिंदुत्वाचे सोंग आणि ढोंग म्हणायचे ते यालाच
दुसरा एखादा राज्यात अशाप्रकारे गोमूत्यू झाले असते, तर महाराष्ट्रात फडणवीसपासून बावनकुळ्यांपर्यंत व मुर्खदुबळ मिंध्यापासून सगळ्यांनीच हिंदुत्व खतऱ्यात आल्याच्या गर्जना केल्या असत्या. ज्या गोव्यात गोमांस खुल्या बाजारात सरकारी कृपेने मिळते त्या राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत कोल्हापूरच्या कणेरी मठात येऊन गायींना चारा घालतात, गायींचा आशीर्वाद घेतात, हे ढोंग नाहीतर काय? वीर सावरकर यांनी गायीस गोमाता म्हणण्यास नकार दिला. गाय हा एक उपयुक्त पशु आहे असे ते म्हणत. वीर सावरकरांचा हा विज्ञानवादी दृष्टिकोन सध्याच्या उथळ आणि बेताल हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे काय? कणेरी मठातील गायींचे सामुदायिक आत्मार्पण पण हा चिंतेचा विषय आहे. एका गायीसाठी दंगली उसळतात, घडवल्या जातात, पण 52 गायींच्या संशयास्पद मृत्यूनंतर रेडा प्रेमी सरकार अश्रू ढाळायला तयार नाही. हिंदुत्वाचे सोंग आणि ढोंग म्हणायचे ते यालाच. कोल्हापुरातील 52 गायींना आम्ही श्रद्धांजली वाहत आहोत.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)