Weather Update : सावध रहा! आज तापमान 47 अंशांवर पोहोचू शकते; 'या' राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी
Weather Update : संपूर्ण उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. राजस्थानच्या बारमेरमध्ये कमाल तापमान 46.9 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.

Weather Update : राजधानी नवी दिल्लीत शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी दिल्ली-एनसीआरमध्ये उष्णतेची लाट कायम राहिली. सफदरजंगमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. येथील कमाल तापमान 43.7 अंश सेल्सिअस होते. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) संपूर्ण परिसरात 'रेड अलर्ट' जारी केला आहे. आज रविवारी (19 मे) रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. सोमवार ते बुधवारपर्यंत ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या काळात शहराच्या काही भागात कमाल तापमान 44 ते 47 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. हवामान खात्याने लोकांना घरी राहण्याचा सल्ला दिला आहे.
मुंगेशपूरचे तापमान सर्वाधिक
वायव्य दिल्लीतील मुंगेशपूर हे 46.8 अंश सेल्सिअससह राजधानीतील सर्वात उष्ण ठिकाण ठरले. यानंतर नजफगडचे तापमान सर्वाधिक होते. येथील तापमान 46.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.
राजस्थानमध्येही उष्णतेने कहर केला
संपूर्ण उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. राजस्थानच्या बारमेरमध्ये कमाल तापमान 46.9 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात कडक उन्हाचा तडाखा बसत असून पुढील आठवडाभरही ही परिस्थिती राहणार असल्याचे विभागाचे म्हणणे आहे. बाडमेरशिवाय फलोदी येथे 46.4 अंश सेल्सिअस, पिलानी (झुंझुनू) येथे 46.3 अंश सेल्सिअस, जालोर, जैसलमेर, करौली येथे 46.2 अंश सेल्सिअस आणि कोटा, चुरू आणि बिकन येथे 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
चंदीगडमध्ये तापमानात वाढ झाली आहे
हरियाणा आणि पंजाबमध्ये वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे चंदीगडमध्ये कमाल तापमान 44.5 अंश सेल्सिअसवर पोहोचले. येथील तापमान सामान्य तापमानापेक्षा सहा अंशांनी अधिक असल्याचे हवामान खात्याने सांगितले.
'आराम मिळण्याची आशा नाही'
आयएमडीने म्हटले आहे की, 'दिल्ली-एनसीआरमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव सतत दिसून येत आहे. राजस्थानमधून कोरडे पश्चिमेचे वारे वाहत आहेत. निरभ्र आकाशामुळे उष्मा झपाट्याने वाढत आहे. बुधवारपर्यंत असेच वातावरण राहील. सध्या तरी तातडीने दिलासा मिळण्याची आशा नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
