एक्स्प्लोर
2017 मध्ये सात हजार कोट्यधीश भारतीयांनी देशाचं नागरिकत्व सोडलं
‘न्यू वर्ल्ड वेल्थ’च्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, कोट्यधीशांनी देश सोडणाऱ्यांच्या यादीत चीनचा पहिला क्रमांक आहे.

नवी दिल्ली : गेल्या वर्षभरात तब्बल सात हजार कोट्यधीश भारतीयांनी देशाचं नागरिकत्व सोडून, दुसऱ्या देशात स्थलांतर केल्याचं समोर आलं आहे. ‘न्यू वर्ल्ड वेल्थ’च्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, कोट्यधीशांनी देश सोडणाऱ्यांच्या यादीत चीनचा पहिला क्रमांक आहे. ‘न्यू वर्ल्ड वेल्थ’च्या रिपोर्टनुसार, 2016 च्या तुलनेत 2017 मध्ये 16 टक्क्यापेक्षा अधिक कोट्यधीशांनी भारताचं नागरिकत्व सोडून दुसऱ्या देशाचं नागरिकत्व मिळवलं. 2016 मध्ये हा आकडा सहा हजार होता. त्यापूर्वी 2015 मध्ये चार हजार भारतीय कोट्यधीशांनी आपलं नागरिकत्व सोडून इतर देशात स्थायिक झाले होते. या यादीत चीन पहिल्या क्रमांकावर आहे. 2017 मध्ये चीनमध्ये तब्बल दहा हजार कोट्यधीशांनी आपलं नागरिकत्व सोडून दुसऱ्या देशाचं नागरिकत्व मिळवलं. चीन आणि भारतानंतर तुर्कस्थानमध्ये सहा हजार, ब्रिटेन चार हजार, फ्रान्स चार हजार आणि रशियामधील तीन हजार कोट्यधीशांनी आपापल्या देशाचं नागरिकत्व सोडून, दुसऱ्या देशाचं नागरिकत्व मिळवलं. भारत सोडून इतर देशात स्थलांतरित होणाऱ्यांनी सर्वाधिक पसंती अमेरिकेला दिल्याचंही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. त्यापाठोपाठ, इंग्लंड, कॅनेडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसारख्या देशातही अनेक कोट्यधीश स्थायिक झाले आहेत. तर चीनचं नागरिकत्व सोडलेल्या कोट्यधीशांनीही अमेरिकेपाठोपाठ, कॅनेडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांना पहिली पसंती दिली आहे. दरम्यान, ज्या कोट्यधीशांनी आपलं भारतातील नागरिकत्व सोडलं आहे, त्यामुळे देशाला चिंतेची गरज नसल्याचं रिपोर्टमध्ये नमुद करण्यात आलं आहे. कारण, जितक्या कोट्यधीशांनी भारतातून स्थलांतर केलं आहे, त्यापेक्षा जास्त नवे अब्जाधीश भारताशी जोडले जात असल्याचं रिपोर्टमधून सांगण्यात आलं आहे.
Before You Go
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?






















