LPG Cylinder Booking Rule : गॅस सिलेंडर बुकिंगचा नियम बदलला, ग्रामीण भागात 25 नव्हे तर 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग, कालावधी दुप्पट
LPG Cylinder Booking Rule : एलपीजी सिलेंडरच्या साठेबाजी आणि काळाबाजाराची शक्यता लक्षात घेता केंद्र सरकारने ग्रामीण भागातील गॅस बुकिंगचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

LPG Cylinder Booking Rule : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता भारतीय स्वयंपाक घराला बसत असल्याचं दिसतंय. याच पार्श्वभूमीवर एलपीजी गॅस पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या वातावरणात केंद्र सरकारने सिलेंडर बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. नव्या नियमानुसार, ग्रामीण भागात आता 45 दिवसांनंतरच एलपीजी सिलेंडर बुक करता येणार आहे, तर शहरी भागात 25 दिवसांचे अंतर ठेवून बुकिंग करता येईल. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी संसदेत ही माहिती दिली.
यापूर्वी देशभरात सिलेंडर बुकिंगसाठी 21 दिवसांचा कालावधी निश्चित होता, जो अलीकडे 25 दिवसांपर्यंत वाढवण्यात आला होता. आता ग्रामीण आणि शहरी, या दोन्ही भागांसाठी वेगवेगळी कालमर्यादा ठरवण्यात आली आहे.
LPG Booking Interval : ग्रामीण व शहरी भागासाठी वेगळे नियम
नवीन व्यवस्थेनुसार ग्रामीण भागातील ग्राहकांना 45 दिवसांनंतर दुसऱ्या सिलेंडरची बुकिंग करता येणार आहे, तर शहरी भागात 25 दिवसांचा कालावधी ठेवण्यात आला आहे. सरकारच्या मते, या निर्णयामुळे गॅस पुरवठ्यावर अचानक पडणारा दबाव कमी होण्यास मदत होईल.
Gas Shortage Rumours : अफवांमुळे वाढली होती घाईघाईची बुकिंग
गॅस टंचाईच्या अफवांमुळे अनेक ग्राहक गरजेपेक्षा आधीच सिलेंडर बुक करू लागले होते. जे ग्राहक आधी सुमारे 55 दिवसांनी सिलेंडर बुक करत होते, ते आता फक्त 15 दिवसांच्या अंतराने बुकिंग करू लागले होते. यामुळे साठेबाजी आणि काळाबाजाराची शक्यता वाढली होती. याच पार्श्वभूमीवर बुकिंगमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
Parliament Statement On Gas Shortage : संसदेत हरदीप पुरी यांची माहिती
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी संसदेत सांगितले की, देशात पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीचा कोणताही तुटवडा नाही. ब्लॅक मार्केटिंग रोखण्यासाठी सरकारने काही महत्त्वाचे उपाय केले आहेत.
Crude Oil Supply : भारताची कच्च्या तेलाची पुरवठा स्थिती सुरक्षित
लोकसभेत बोलताना हरदीप सिंह पुरी म्हणाले की, जगात सध्या ऊर्जा क्षेत्रात मोठा तणाव निर्माण झाला असला तरी भारताची कच्च्या तेलाची पुरवठा स्थिती सुरक्षित आहे. भारत अनेक देशांकडून कच्चे तेल खरेदी करत आहे, त्यामुळे देशातील ऊर्जा पुरवठा सुरळीत ठेवण्यात यश आले आहे असं ते म्हणाले.
LPG Supply Update : देशात एलपीजीची कमतरता नाही
एलपीजी संकटाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना हरदीप पुरी यांनी सांगितलं की, गेल्या पाच दिवसांत एलपीजी उत्पादनात 28 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. 33 कोटी भारतीय कुटुंबांच्या स्वयंपाकघरात गॅसची कमतरता भासू नये ही सरकारची प्राथमिकता असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
Opposition Reaction On LPG Shortage : राहुल गांधी यांच्याकडून मुद्दा उपस्थित
लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एलपीजीबाबत चिंता व्यक्त करत रेस्टॉरंट बंद होत असल्याचं आणि लहान व्यापाऱ्यांवर परिणाम होत असल्याचं सांगितलं. यावर उत्तर देताना हरदीप सिंह पुरी म्हणाले की, हा अफवा पसरवण्याचा किंवा चुकीची माहिती देण्याचा काळ नाही, आणि देशात गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
ही बातमी वाचा:
Before You Go
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा





















