Rahul Gandhi : इराण युद्ध आणि तेल संकटावर मोदींनी ट्रम्पच्या विरोधात एक शब्दही उच्चारला नाही; राहुल गांधींची टीका
Rahul Gandhi On Narendra Modi : भारत आणि अमेरिकेदरम्यान झालेल्या व्यापारी करारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगल्याची टीका काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली.

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या तेल संकटावर आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक शब्दही काढला नाही अशी टीका लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. गुजरातमधील वडोदरा येथे आयोजित आदिवासी अधिकार संविधान परिषदेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
लोकसभेत पश्चिम आशियात सुरू असलेल्या संकटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण दिलं. त्यावर राहुल गांधी यांनी टीका केली. देशात एवढं संकट निर्माण झालं असताना मोदींनी अमेरिकेच्या विरोधात एक शब्दही का काढला नाही असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला.
Middle East Crisis : मोदींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
राहुल गांधी यांनी पश्चिम आशियामधील परिस्थितीवर बोलताना मोदी सरकारकडे स्पष्ट धोरण नसल्याचा आरोप केला. देशासमोर उभ्या असलेल्या आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय आव्हानांवर सरकारकडे ठोस दिशा नाही असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं.
US Trade Deal : भारत-अमेरिका करारावर टीका
भारत-अमेरिका व्यापार करारावरही राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले. कृषी क्षेत्र प्रथमच अमेरिकेसाठी खुले केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मोदी सरकारने भारताचा मौल्यवान डेटा अमेरिकेला दिल्याची टीका त्यांनी केली. मोदी सरकारने अमेरिकन कंपन्यांना कर सवलती दिल्या, तर भारतीयांवर कराचा बोजा वाढल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. आपण अमेरिकेला खूप काही दिलं, पण बदल्यात काही मिळालं नाही, असंही ते म्हणाले.
Tribal Issue: ‘आदिवासी’ विरुद्ध ‘वनवासी’ वाद
भाजपवर टीका करत राहुल गांधी म्हणाले की, ‘आदिवासी’ आणि ‘वनवासी’ या शब्दांच्या वापरातून विचारधारात्मक फरक दिसून येतो. ‘आदिवासी’ म्हणजे भूमीचे मूळ मालक. त्यांच्यासाठी ‘वनवासी’ हा शब्द वापरून त्यांचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भविष्यात जंगल नष्ट झाल्यास आदिवासींचे हक्कही हिरावले जाऊ शकतात, असं राहुल गांधी म्हणाले.
Budget Demand: आदिवासींसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पाची मागणी
राहुल गांधी यांनी आदिवासी समाजासाठी स्वतंत्र बजेटची मागणी केली. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी त्यांनी उच्च दर्जाच्या शिक्षणाची गरज अधोरेखित केली. इंग्रजी आणि आधुनिक शिक्षणावर भर देत भविष्यात आदिवासी युवक मोठ्या पदांवर पोहोचावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ही बातमी वाचा:





















