Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्लाप्रकरणी मोठं यश, दहशतवाद्यांना मदत करणारा मोहम्मद कटारिया अटकेत, श्रीनगर पोलिसांची कारवाई
Pahalgam Terror Attack:श्रीनगर पोलिसांनी ज्या व्यक्तीला अटक केली आहे तो लष्कर-ए-तोयबा (टीआरएफ) चा दहशतवादी आहे. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना त्यानं दळणवळणासाठी मदत केली होती.

श्रीनगर: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. श्रीनगर पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचं नाव मोहम्मद यूसुफ कटारिया आहे. 22 एप्रिलला त्यानं लष्कर-ए- तोयबाच्या दहशतवाद्यांची मदत केली होती. श्रीनगर पोलिसांनी त्याला अटक करुन कोर्टात हजर केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
मोहम्मद कटारिया लष्कर-ए-तोयबा (टीआरएफ) चा दहशतवादी (Mohammad Kataria Arrested)
मोहम्मद यूसुफ कटारिया हा लष्कर-ए- तोयबा- चा दहशतवादी अटक केली आहे. ज्याच्यावर बैसरन घाटीत 26 भारतीय पर्यटकांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना मदत केल्याचा आऱोप आहे.
यूसुफ कटारियाला कसं पकडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसा ऑपरेशन महादेवच्या दरम्यान जप्त केलेल्या शस्त्रांच्या आणि इतर साहित्याच्या विश्लेषणानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली. आमच्या चौकशीत याला दुजोरा मिळाला की दहशतवाद्यांच्या दळणवळणात मदत आणि त्यांना सुविधा पुरवण्यात कटारियाची महत्त्वाची भूमिका होती. दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या नेटवर्क विरोधात मोठं यश मिळाल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं.
कटारियाच्या सहकाऱ्यांची ओळख पटवणे आणि लष्कर-ए-तोयबा (टीआरएफ)शी संबंधित नेटवर्क उद्धवस्त करण्यासाठी पुढील चौकशी सुरु आहे. पोलिसांनी दहशतवाद्यांचं मॉड्यूल कमजोर करण्यासाठी आणि जम्मू काश्मीरमध्ये शांतता सुनिश्चित करण्यासाठी अभियान सुरु ठेवणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मोहम्मद यूसुफ कटारिया पहलगाममध्ये स्थानिक मुलांना शिकवण्याचं काम करायचा. मात्र, काही महिन्यांपूर्वी तो दहशतवाद्यांच्या संपर्कात आला आणि त्यांना मदत करु लागला होता.
ऑपरेशन महादेव द्वारे दहशतवाद्यांचा खात्मा
पहलगामच्या बैसरन घाटीत 22 एप्रिलमध्ये दहशतावाद्यांनी धर्म विचारुन 26 पर्यटकांची हत्या केली होती. पाकिस्तानातील टीआरएफ संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले होते. ज्यामध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर 28 जुलै रोजी ऑपरेशन महादेव अंतर्गत सैन्यदलानं दहशतवादी हल्ल्यातील लष्करच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.























