एक्स्प्लोर
'गले की हड्डी दूर', स्वतंत्र विदर्भाचा निर्णय घ्या: आशिष देशमुख
येत्या केंद्रीय अर्थसंकल्पात स्वतंत्र विदर्भाच्या संदर्भातलं विधेयक सादर व्हावं अशी मागणीही आपण केल्याचं आमदार आशिष देशमुख यांनी म्हटलं.

नवी दिल्ली: शिवसेनेनं स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यातली ‘गले की हड्डी’ दूर झाली असून, आता भाजपनं स्वतंत्र विदर्भाचा निर्णय तातडीनं घ्यावा अशी मागणी भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी केली आहे. देशमुख यांनी या मुद्द्यावर 7 जानेवारीपासून स्वतंत्र विदर्भ आत्मबळ यात्रा सुरु केली असून, त्याच दरम्यान केंद्र पातळीवर लक्ष वेधण्यासाठी ते दिल्लीत आले होते. मुख्यमंत्र्यांना या मुद्द्यावर पत्र लिहून आता साडेतीन महिने झाले, पण काही प्रतिसाद येत नाहीय, त्यामुळे जे आश्वासन विदर्भाच्या लोकांना दिलंय, त्याचा विसर पक्षाला पडू नये यासाठी आपण ही यात्रा सुरु केल्याचं देशमुख म्हणाले. येत्या केंद्रीय अर्थसंकल्पात स्वतंत्र विदर्भाच्या संदर्भातलं विधेयक सादर व्हावं अशी मागणीही आपण केल्याचं त्यांनी म्हटलं. ही मागणी मंजूर झाली नाही तर आपलं पुढचं काय असेल याबद्दल मात्र त्यांनी तूर्तास सावध भूमिका घेतलीय. सध्या तरी मी पक्षाच्या व्यासपीठावरच भूमिका मांडत असून गरज पडल्यास विदर्भाच्या जनतेचा कौल घेऊन भूमिका ठरवेन, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय. विदर्भात जे विविध प्रकल्प येत आहेत ते केंद्र सरकारच्या माध्यमातून असं सांगत त्यांनी गडकरींच्या कामाचं कौतुक केलं, पण फक्त नागपूरचा विकास म्हणजे सगळ्या विदर्भाचा होत नाही असं सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कामगिरीबद्दल अप्रत्यक्ष टीका केली. भंडारा-गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले यांच्यानंतर आता भाजपचे आणखी नेते आ. आशिष देशमुख हे स्वत:च्या पक्षावर जाहीर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.
Before You Go
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा






















