भारत पाकिस्तानातलं युद्ध देशाच्या अर्थव्यवस्थेला किती महागात पडू शकतं; आजपर्यंतचा इतिहास काय सांगतो?
IND VS PAK: भारताला थेट लष्करी खर्चासाठी दररोज सुमारे ₹1,460 कोटी ते ₹5,000 कोटी इतका खर्च येऊ शकतो. असं दुबईच्या परराष्ट्र व्यवहार मंचाच्या विश्लेषणातून समोर येते.

India Pakistan War Economy: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूरअंतर्गत झालेल्या कारवाईत लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यात भारत यशस्वी झाला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर लक्ष्य करत केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर संपूर्ण देशात भारतीय सशस्त्र दलांच्या कृतीचं कौतूक होत आहे. ट्रेन, बस, मेट्रो, महाविद्यालयांसह सोशल मीडियावरील पोस्टवर अभिमानाच्या पोस्ट दिसत आहेत. गरज पडल्याच भारत प्रत्युत्तर देऊ शकतो, जोरदार सशस्त्र बळाचा वापर केल्याने लोकांमध्ये समाधानाची भावना आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात अल्पकालिन किंवा पारंपरिक युद्ध झाल्यास, भारताला थेट लष्करी खर्चासाठी दररोज सुमारे ₹1,460 कोटी ते ₹5,000 कोटी इतका खर्च येऊ शकतो. असं दुबईच्या परराष्ट्र व्यवहार मंचाच्या विश्लेषणातून समोर येते. (Foreign Affairs Forum)
आपत्कालीन युद्ध झाल्यास खर्च किती?
या विश्लेषणानुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यात पारंपरिक स्वरूपाचं अल्पकालीन युद्ध झाल्यास भारताला प्रतिदिन सुमारे ₹1,460 कोटी ते ₹5,000 कोटी इतका थेट लष्करी खर्च सहन करावा लागू शकतो. कारगिल युद्धाच्या अनुभवावरून ही आकडेवारी मांडण्यात आली असून, 1999 मध्ये झालेल्या या संघर्षात भारताने सुमारे ₹10 ते ₹15 कोटी रोजचा खर्च केला होता. हवाई हल्ल्यांवरच सुमारे ₹2,000 कोटींचा खर्च झाल्याची नोंद आहे. भारत पाकिस्तानच्या अल्पकालीन की दीर्घकालीन, कोणत्याही स्वरूपाचं युद्ध देशासाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत महाग ठरू शकतं. असं या विश्लेषणातून समोर येतं.
दीर्घकालीन संघर्ष झाल्यास युद्ध खर्च किती?
संघर्ष दीर्घकाळ चालला तर त्याचे परिणाम केवळ लष्करी पातळीपुरते राहणार नाहीत. जर युद्ध दीर्घकाळ चाललं, तर भारताला केवळ काही आठवडे नव्हे, तर महिन्यांनमहिने युद्धसज्जतेत राहावं लागेल. अशा स्थितीत भारताचा दररोजचा संरक्षण खर्च देशाच्या वार्षिक संरक्षण बजेटपेक्षा दुप्पट होऊ शकतो. सध्या भारताचं वार्षिक संरक्षण बजेट सुमारे $20 अब्ज (₹1.71 लाख कोटी) इतकं आहे.
चार आठवड्यांच्या युद्धामुळे देशाला $500 अब्जपेक्षा अधिक, म्हणजेच सुमारे ₹43 लाख कोटींचं नुकसान होऊ शकतं. GDP मध्ये जवळपास 20 टक्के घट होण्याची शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. दररोजच्या आर्थिक फटक्याचा अंदाज $17.8 अब्ज (₹1.34 लाख कोटी)एवढा आहे.
इतिहास सांगतो काय?
1971 चं भारत-पाक युद्ध – या युद्धात भारताने आठवड्याला सुमारे ₹200 कोटी इतका खर्च केला होता. एकूण अंदाजे खर्च $600 दशलक्षच्या आसपास होता.
1999 चं कारगिल युद्ध – यामध्ये भारताचा एकूण खर्च ₹10,000 कोटींवर गेला. यातील 40% खर्च फक्त हवाई हल्ल्यांवर झाला होता.
2001–02 सैन्य तैनाती – पाकिस्तानसोबत तणाव वाढल्यावर भारताने मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केलं. या दोन महिन्यांत देशाने सुमारे $600 दशलक्ष (₹5,122 कोटी) इतका खर्च केला.
पर्यटन, निर्यात परकीय गुंतवणूकीतून होणारं नुकसान
युद्धजन्य परिस्थितीत परकीय गुंतवणूकीसह पर्यटन, निर्यातीवर होणारा परिणामही मोठा असून या सगळ्याचा एकत्रित परिणाम भारताला बसण्याची शक्यता आहे. फॉरेन अफेयर्स फोरमच्या मते, अशा परिस्थितीत परकीय गुंतवणुकीत 11 अब्ज डॉलर्स म्हणजेच साधारण 93,915 कोटींची घट होण्याची शक्यता हाऊ शकते. व्यापार आणि पर्यटनाचे सुमारे 4.35 लाख कोटींचं नुकसान होण्याची शक्यता असल्याचं या विश्लेषणातून समोर येतं.























