'चौकीदार चोर है' घोषणेप्रकरणी राहुल गांधींना उच्च न्यायालयाचा दिलासा; गिरगाव दंडाधिकारी कोर्टाला कारवाई न करण्याचे निर्देश
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख "चौकीदार चोर है" म्हणून केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधींच्या विरोधात गिरगाव कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधींना मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरता दिलासा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान केल्याप्रकरणी गिरगाव दंडाधिकारी कोर्टाला 20 डिसेंबरपर्यंत मानहानीच्या खटल्यात कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश देत या प्रकरणी 16 डिसेंबरला सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे. मूळ तक्रारदारानं या याचिकेलाच आक्षेप घेतल्यानं त्यावर दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश हायकोर्टानं जारी केले आहेत.
या याचिकेवर न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यासमोर सोमवारी सुनावणी झाली. त्यावेळी मुळ तक्रारदार महेश श्री श्रीमल यांच्यावतीनं अॅड.रोहन महाडीक यांनी या याचिकेवर आक्षेप घेत आपली भुमिका मांडण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. दरम्यान 25 नोव्हेबरला गिरगाव दंडाधिकारी न्यायालयासमोर यावर सुनावणी असल्यानं दंडाधिकारी न्यायालयाला तूर्तास पुढील कोणतही कारवाई करण्यास मनाई करावी अशी विनंती अॅड. सुदीप पासबोला यांनी राहुल गांधी यांच्यावतीनं कोर्टाकडे केली. याची दखल घेत न्यायालयाने दंडाधिकारी न्यायालयाला 20 डिसेबरपर्यंत कोणतही कारवाई न करण्याचे निर्देश दिलेत.
काय आहे राहुल गांधींची याचिका
राफेल विमान खरेदी व्यवहारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त टीका केल्याच्या आरोप करत राहुल गांधींविरोधात मुंबईत साल 2019 मध्ये मानहानीचा खटला दाखल झाला आहे. या दाव्यावर फौजदारी कारवाई सुरू करण्याचे आदेश गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिले असून त्याबाबत राहुल गांधींना कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले गेले होते. याचप्रकरणी दाखल झालेली तक्रार रद्द करण्यासाठी राहुल गांधी यांच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राफेलबाबत टीका करताना मोदी यांच्यावर 'कमांडर इन थीफ', 'चौकीदार चोर है', 'चोरो का सरदार'अशी टीका केली होती. यामुळे मोदी यांच्यासह भारतीय जनता पार्टी व त्यातील सदस्यांचीही प्रतिम मलिन झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकत भाजपचे कार्यकर्ते महेश श्री श्रीमल यांनी ही तक्रार दाखल केली आहे. राहुल गांधी यांनी जयपूर, राजस्थान, अमेठी येथील दौऱ्यामध्ये केलेल्या विधानांमध्ये या याचिकेत समावेश आहे. तक्रारदार हे भाजपचे सदस्य असल्यामुळे ते अशाप्रकारची तक्रार करण्याचा अधिकार त्यांना आहे, असं मत व्यक्त करत या गिरगाव दंडाधिकारी कोर्टानं याची दखल घेत राहुल गांधींच्या नावे समन्स जारी केलं होतं. याशिवाय राहुल गांधी यांच्याविरोधात भिवंडी आणि शिवडी न्यायालयातही मानहानीच्या तक्रारी प्रलंबित आहेत.
20 सप्टेंबर 2018 रोजी जयपूरच्या एका सभेत राहुल गांधींनी, "गली गली मे शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है" असा नारा दिला होता. तसेच 24 सप्टेंबरला एक ट्विट करून राहुल गांधींनी मोदींना उद्देशून अपमानकारक, मानहानीकारक विधानं केली होती. ज्यामुळे तमाम भारतीयांची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलीन झाल्याचा दावा या तक्रारीतून करण्यात आला आहे. देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीच्याबाबतीत अशी विधान करून राहुल गांधींनी भाजपच्या तमाम कार्यकर्त्यांचाही अपमान केला आहे. असा दावा या याचिकेतून करत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
- Farm Laws : शेतकरी मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याची विरोधकांची तयारी; काँग्रेस आज 'शेतकरी विजय दिवस' साजरा करणार
- अहंकाराला कोणत्याही लोकशाहीत स्थान नाही; राहुल गांधी यांचे शेतकऱ्यांना पत्र
- Farm Laws : 'अन्नदात्यांच्या सत्याग्रहासमोर अहंकाराची मान झुकली', राहुल गांधींसह विरोधकांकडून शेतकऱ्यांचं अभिनंदन
Before You Go
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली






















