मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, चंद्रकांत बावकर, जे डी तांडेल यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर आघाडीची घोषणा करण्यात आली.

Congress Alliance With OBC bahujaj Aghadi: नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसने वंचित बहुजन आघाडी सोबत आघाडी करताना लातूर महापालिका काबीज केली. राज्यामध्ये विविध मनपा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात या आघाडीला यश मिळालं. दरम्यान आता वंचितला सोबत घेतल्यानंतर आणखी एक पक्ष काँग्रेसने सोबत घेतला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसने ओबीसी बहुजन आघाडीसोबत आघाडीची घोषणा केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, चंद्रकांत बावकर, जे डी तांडेल यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर आघाडीची घोषणा करण्यात आली. या बैठकीसाठी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील ऑनलाईन उपस्थित होते.
वारे कोणत्या देशाने वाहत आहे ते लक्षात घ्या
आघाडी झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चांगलाच हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ओबीसींचा केलेला विश्वासघात लक्षात आल्यानंतर आता ओबीसी काँग्रेस सोबत येत आहे. वारे कोणत्या देशाने वाहत आहे ते लक्षात घ्या असा इशारा त्यांनी दिला. त्यांनी सांगितले की हा आमचा संघर्षाचा काळ असून वैचारिक पातळीवर आम्ही एकत्रित आलो आहोत. दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हॉटेल पॉलिटिक्सवर सुद्धा जोरदार टीका केली. ते म्हणाले की हॉटेल पॉलिटिक्स त्यांची राजकीय शैली असेल. मात्र, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत सदस्यांना सुद्धा हॉटेलमध्ये ते घेऊन जाणार का? लोकशाहीवर विश्वास नाही का? अशी विचारणा केली. एकनाथ शिंदे यांच्याकडून भाकरी फिरवण्याची शक्यता नसल्याचं ते म्हणाले. त्यांच्याकडून अपेक्षा नसल्याचेही ते म्हणाले.
समविचारी पक्षांसोबत आम्ही जात आहोत
प्रकाश शेंडगे आघाडीची घोषणा होताच म्हणाले की शासन निर्णय काढून ओबीसींच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. 27% आरक्षण ओबीसींना मिळाले. मात्र, त्यावर घाला घालण्याचं काम केलं जात आहे. कुणबी दाखले देण्याचे काम केलं जात आहे. ओबीसी बहुजन आघाडी आता पक्ष निर्माण झाला असून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढवण्याचा आम्ही ठरवलं आहे. समविचारी पक्षांसोबत आम्ही जात आहोत. आरक्षणाचा मुद्दा असेल, आमचे प्रश्न असतील, यावर आवाज उठवण्याचं काम राहुल गांधी यांनी केलं असल्याचे त्यांनी सांगितलं. आमची चर्चा मागील दोन दिवसापासून सुरु होती.. काँग्रेससोबत सगळी चर्चा झाली आणि त्यानंतर जिथं जिथं शक्य तिथं तिथं जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये काँग्रेस आणि ओबीसी बहुजन आघाडी एकत्र निवडणूक लढवतील, अशी घोषणा त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या

























