Ramgiri Maharaj : सनातनी जागे झाले तर जगात उलथापालथ करतील, अमेरिकेचा अध्यक्ष आम्ही निवडू; हिंदू मोर्चातून रामगिरी महाराजांचा हल्लाबोल
Ramgiri Maharaj on Bangladesh Crisis : बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात हिंदू जनजागरण समितीतर्फे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये रामगिरी महाराजांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर : सनातन एकत्र आले आणि 23 तारखेला निकाल पाहिला. सगळे जागे झाले तर जगात उलथापालथ करतील. अमेरिकेचा अध्यक्ष आम्ही निवडू, असे वक्तव्य सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी केले. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात हिंदू जनजागरण समितीतर्फे आज छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
रामगिरी महाराज म्हणाले की, बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आपण एकत्र आलोय. 1971 मध्ये सुद्धा अत्याचार झाले, 35 लाख महिलांवर पाकिस्तानी लोकांनी बलात्कार केले. त्यावेळी हा देश आपण स्वतंत्र केला आणि आज तिथेच हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत. ज्या इस्कॉन मंदिरांनी कोरोनात या लोकांना जेवायला घातले तेच लोक आता उलटले आहेत. एक एक महिलेवर 20-30 लोकांनी बलात्कार केला. सनातन कुठल्या धर्माचा द्वेष करत नाही. पण, आम्हाला शिकवले कुणी एक गालात मारली तर दुसरा गाल पुढे करा, मात्र, शास्त्र हे सांगत नाही. समोर कुणीही असू द्या. अन्याया विरोधात लढायचं आपलं काम आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
जगात एकच धर्म, तो म्हणजे सनातन धर्म
भगवद्गीतेतही हे सांगितलं आहे की, सनातन संस्कृती एक गालात मारल्यावर पुढचा गाल पुढं करत नाही. हिंसा कुणी करत असेल तर ती सहन का करावी? आपण आजपर्यंत अन्याय सहन करत आलोय हे दुर्दैव आहे. मी नाशिकमध्ये काही बोललो ते अत्याचाराबाबत बोलत होतो. त्यावेळी काही लोक पुढं आले, एकीकडे म्हणतात संविधानावर विश्वास आहे आणि रस्त्यावर उतरतात, सोयीने संविधानाचे नाव घेतात. जगात एकच धर्म आहे तो म्हणजे सनातन धर्म. बाकी सगळे फक्त पंथ आहेत. अन्याय करणारे अधर्मी आहेत, असा धर्म असूच शकत नाही, असा हल्लाबोल रामगिरी महाराजांनी यावेळी केला.
बांगलादेशमध्ये जे घडतंय त्याचा निषेध
आम्ही कुणाच्या विरोधात नाही. सनातन एकत्र आले आणि 23 तारखेला निकाल पाहिला. सगळे जागे झाले तर विश्व उलथापालथ करतील. अमेरिकेचा अध्यक्ष आम्ही निवडू, असेही त्यांनी म्हटले आहे. बांगलादेशमध्ये जे घडतंय त्याचा निषेध. आपण सावध राहावे, आपण वेगळे झालो तर आपल्या देशात ही हे होऊ शकते. पालघरला दोन मारण्यात आले. मारणाऱ्यांना शिक्षा झाली का? आता सरकारने सावध असायला हवे, तुम्हाला निवडून दिले आहे. आम्हाला बोलण्याचा हक्क आहे, अत्याचार होत असेल तर त्यांना भारतात त्यांना भारतात आश्रय द्यायला हवा, असेही रामगिरी महाराजांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

