Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांच्या आरोपींना पकडणाऱ्या पोलिसाची भावनिक पोस्ट; म्हणाले, मुलं रोज बोलतात...
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पकडणाऱ्या एका पोलिसाने थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपल्या मनातील भावना मांडल्या आहेत.

Santosh Deshmukh Case : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण (Santosh Deshmukh Murder Case) सध्या राज्यभरात चांगलेच चर्चेत आले आहे. या प्रकरणातील सात आरोपींना अटक करण्यात आली असून. कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे. यावरून बीड पोलिसांची सातत्याने बदनामी केली सुरु असून काही पोलिसांवर वाल्मिक कराडच्या जवळचा व्यक्ती असल्याचा आरोप केला जात आहे. आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पकडणाऱ्या एका पोलिसाने थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपल्या मनातील भावना मांडल्या आहेत.
हवालदार भागवत शेलार यांनी आपल्या पोस्ट करत म्हटले आहे की, संतोष अण्णा भावपूर्ण श्रद्धांजली. गेल्या 9 डिसेंबर 24 रोजी पासून म्हणजेच संतोष भैया देशमुख यांच्या हत्येच्या दिवसापासून रात-दिवस मनात एकच विचार आहे. वरिष्ठांनी सांगितले आहे की, काही झाले तरी शेलार आरोपी सापडले पाहिजेत. आपल्या खात्याची होत असलेली बदनामी पिडीताला न्याय द्यायचा या उद्देशाने गेले 75 दिवस मनात एकच विचार आहे की, आरोपी भेटले पाहिजेत. ऊसात, नाली, नदीत फिरलो. काट्या-कुपाट्या बघितल्या नाहीत.
सरांसमोर निगेटिव्ह बोलायचे नाही म्हणून...
रात्री अपरात्री प्रवास करून थकलो तरी थांबलो नाही का तर डोळ्यासमोर एकच आपल्यावर वरिष्ठांनी विश्वास दाखवला आहे, आरोपी भेटलाच पाहिजे. सर्वच गोष्टी कायदेशीर मार्गाने नाही करता येत आणि मदत कोण करत ओ... बोलायला, नाव ठेवायला सर्वच येतात. परवाच्या दिवशी वडिलांचे मासिक असताना पण थांबता आले नाही, का तर आरोपी शोध. मुंबई जावे लागले, मी म्हणू शकलो असतो सर वडिलांचे मासिक आहे. पण नाही म्हणू शकलो. का तर मला पहिल्यापासून प्रकरण माहिती आहे आणि सरांसमोर निगेटिव्ह बोलायचे नाही म्हणून गप गेलो होतो.
शेलार हा कराड, धसांसाठी काम करतो, अरे बाबांनो...
आरोपी पकडताना कोणाची तरी मदत घ्यावीच लागते (आणि ते आरोपीच्या जवळचे असले तर लवकर यश येते उद्देश फक्त आरोपी पकडणे असतो) आम्ही काही पिचरमधील पोलिस नाहीत की आम्हाला तिसरा डोळा आहे. लगेच दिसले की पकडले. त्यासाठी लोकांवर विश्वास टाकावा लागतो. त्यांचा विश्वास संपादन करावा लागतो आणि काम करतांना चुका ही होऊ शकतात. याच्या बदल्यात काय मिळाले तर शेलार "वाल्मिक कराड" साठी काम करतो. शेलार "सुरेश धस साहेब" यांच्यासाठी काम करतो. अरे बाबांनो मी पोलिस खात्यासाठी काम करतो अन् पगार tax मधील पैशासाठी घेतो आणि काम करताना वडिलांना (भाऊ) आठवतो की त्याचं नाव खराब नाही झालं पाहिजे.
मुलं रोज बोलतात पप्पा... तुमचं नाव काम करून पण टीव्हीला का येतं?
गेल्या 75 दिवसात किती मेहनत घेतली, किती रात्री प्रवास केला आणि किती आर्थिक भार पडला हे माझ्या मनाला माहिती आहे. त्याचे यश म्हणून 7 आरोपी मिळाले. एवढा त्रास घेऊन काय भेटले तर फक्त बदनामी. बायको, मुलं रोज बोलतात पप्पा... तुमचं नाव काम करून पण का टीव्हीला येतं? काय सांगू त्यांना मला किती मानसिक त्रास होत असेल. प्रामाणिक काम करण्याचा, याचा विचार करावा. मी काम करतो हे नक्कीच उपकार करत नाही. त्याचा सरकार मला मोबदला देते. पण, जिथे ईमानदारी केली तिथे कौतुक नाही. पण, किमान ज्यात अर्धी माहिती घेऊन मानसिक त्रास देऊ नका एवढीच विनंती आहे. आज आमचे पोलिस निरीक्षक, Sdop साहेब, Asp साहेब, आणि S.P नवनीत साहेब हे आधार देतात म्हणून जीवात जीव आहे.
किती त्रास होतो हे कोण सांगणार अंजलीताई तुम्हाला?
काम करून बदनामी मिळाली की किती त्रास होतो हे कोण सांगणार अंजलीताई तुम्हाला? आजही S.P साहेब आणि आमचे प्रभारी यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे फरार आरोपीचा शोध घेत आहोत. देव आम्हाला लवकर यश देवो. संतोष अण्णा कोणी काही म्हणो तुम्हाला न्याय व्यवस्था नक्की न्याय देईल हा विश्वास आहे, असे भागवत शेलार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आणखी वाचा























