Beed Accident: बीडमध्ये भीषण अपघात, हेल्मेटची क्लिप घुसून प्राध्यापकाचा मृत्यू; दुचाकी हायवावर आदळली
शिरसाळा येथील जैन पेट्रोल पंपाजवळ महामार्गाचे काम अनेक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत पडून आहे. या ठिकाणी वारंवार अपघात घडत असून नागरिकांनी यापूर्वीही रस्त्याच्या कामाबाबत तक्रारी केल्या आहेत.

Beed Accident: बीड-परळी राष्ट्रीय महामार्गावर शिरसाळा गावाजवळ एका दुचाकी अपघातात प्रा. अमोल लव्हाळे यांचा मृत्यू झालाय. दुचाकीवरून जात असताना एका दुचाकीची जोरदार धडक बसल्यामुळे ते समोर चाललेल्या हायवावर आदळले. या धडकेत ते गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना आज सकाळच्या सुमारास घडली. अमोल लव्हाळे हे आपल्या दुचाकीवरून जात असताना मागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर त्यांचे वाहन नियंत्रणात राहिले नाही आणि समोर चाललेल्या हायवावर जोरात आदळले.
हेल्मेटची क्लिप मानेत घुसली...
लव्हाळे यांनी सुरक्षिततेसाठी हेल्मेट घातले होते. मात्र प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हेल्मेटची क्लिप त्यांच्या मानेत घुसल्याने गंभीर रक्तस्त्राव झाला. हीच जखम त्यांच्या मृत्यूचे कारण ठरली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.अपघातानंतर लव्हाळे यांना तातडीने शिरसाळा येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे आवश्यक उपचार न झाल्याने त्यांना पुढे परळी येथील दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तेथे पोहोचेपर्यंत उशीर झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
महामार्गाच्या अर्धवट कामांमुळे अपघात
दरम्यान, शिरसाळा येथील जैन पेट्रोल पंपाजवळ महामार्गाचे काम अनेक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत पडून आहे. या ठिकाणी वारंवार अपघात घडत असून नागरिकांनी यापूर्वीही रस्त्याच्या कामाबाबत तक्रारी केल्या आहेत. मात्र तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. या अपघातानंतर महामार्गाचे अपूर्ण काम तात्काळ पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. अपघातग्रस्त ठिकाणी योग्य सिग्नल, फलक व रस्त्याचे सुस्थितीकरण होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
आठवीतील विद्यार्थ्याकडून दहावीतील विद्यार्थ्याचा खून
राज्यातील अहिल्यानगरमधील (Ahilyanagar Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अहिल्यानगरमध्ये शाळकरी विद्यार्थ्याने त्याच्यात शाळेतील विद्यार्थ्याचा खून केल्याचं समोर आलं आहे. आठवीतील विद्यार्थ्याकडून दहावीतील विद्यार्थ्याचा खून झाला आहे. या घटनेमुळे अहिल्यानगर शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील मध्यवर्ती असलेल्या एका विद्यालयातील ही घटना आहे. आठवीतील विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून केला आहे. दोन्ही विद्यार्थी एकाच भागात राहणारे आहेत. क्रिकेट खेळाच्या करणावरून दोघांमध्ये भांडण झालं होतं. शाळेत जेवणाच्या सुट्टीमध्ये दोघांमध्ये पुन्हा भांडण सुरू झालं. यात आठवीतील विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केला.
हेही वाचा























